मुंबईत पाणी टंचाईचं संकट ! फक्त दीड महिन्याचा उरला साठा, अनेक भागात हाहाकार
मुंबईत गंभीर पाणीटंचाई निर्माण झाली असून, मान्सूनच्या विलंबाने चिंता वाढवली आहे. सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये केवळ 12.12% पाणीसाठा शिल्लक आहे, जो फक्त महिनाभर पुरेल. 10% पाणीकपात लागू असूनही परिस्थिती गंभीर आहे. समाधानकारक पाऊस न पडल्यास मुंबईकरांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागू शकतो.

जून महिन्याचे 10 दिवस उलटून गेले असले तरीही पावसाचा मागमूस नाहीये. मान्सूनचं आगमन कधी होणार याकतडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. वाढत्या उन्हाच्या चटक्यांमुळे महाराष्ट्रातील नागिरक त्र्स झाले असून मुंबईकरांच्या घामाच्या धारा वहात आहेत. याच दरम्यान मुंबईकरांसाठी एक महत्वाची आणि चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. मुंबईतील पाणीसाठा 12.12% वर आला आहे. पाणीकपात असूनही फक्त महिनाभराचा साठा उरल्याचे समजते. मुंबईला सात तलावांमधून पाणी पुरवठा होतो खरा, मात्र सध्या या सात तलावांमधील उपयुक्त पाणीसाठा गुरुवारी (11 जून) सकाळी केवळ 1,75,465 दशलक्ष लिटर (12.12%) इतकाच शिल्लक राहिल्याची माहिती समोर आली. 15 मेपासूनच पालिकेने 10 टक्के पाणी कपात लागू केली होती, ती अद्याप कायम असून समाधानकारक पाऊस पडेपर्यंत ही कपात सुरूच राहणार आहे. मात्र वेळेत पाऊस पडला नाही तर मुंबईकरांना संकटाचा सामना करावा लागू शकतो.
सात तलावांमध्ये साठा किती ?
मुंबईतील सात तलावांमध्ये फक्त 12.12% पाणीसाठा शिल्लक आहे. एकूण उपलब्ध साठा 1.75 लाख दशलक्ष लिटर आहे. भातसा तलावात सर्वाधिक 43.36%, तर अप्पर वैतरणामध्ये उपयुक्त साठा शून्य टक्क्यांवर पोहोचला आहे. खरंतर पाणीसाठा कमी होत असल्याचे दिसल्यावरच 15 मे पासून पालिकेने मुंबईत पाणीकपात लागू केली. मात्र आत जोपर्यंत समाधानकारक पाऊस पुडून पुरेसा पाणीसाठी होत नाही तोपर्यंत ही कपात लागूच राहील असे सांगण्यात आले आहे. मे महिन्यात पालिकेने सांगितले होते की 10% पाणी कपात केल्यास उपलब्ध पाणीसाठा 17 ऑगस्टपर्यंत पुरू शकतो; कपात नसती तर साठा 6 जुलैपर्यंतच टिकला असता.
तलावनिहाय स्थिती काय ?
11 जूनपर्यंत तलावनिहाय स्थिती काय आहे, ते जाणून घेऊया.
भातसा – 43.36%
मोडक सागर – 32.44%
तुळशी – 24.66%
मध्य वैतरणा – 14.48%
विहार – 11.33%
तानसा – 7.15%
अप्पर वैतरणा – 0% साठा (उपयुक्त साठा नाही)
मान्सून मुंबईत दाखल झाला असला तरी धरणक्षेत्रात अद्याप मोठा पाऊस झालेला नाही. त्यामुळे पुढील काही दिवसांत तलाव क्षेत्रात जोरदार पाऊस न झाल्यास पाणीपुरवठ्यावरील दबाव कायम राहण्याची शक्यता आहे. सध्या पालिकेची सर्व भिस्त धरणक्षेत्रातील पावसावर आहे.
अंधेरी, घाटकोपर, चेंबूरसह परिसरात पाणीटंचाईचा फटका
पाण्याचा कमी दाबाचा पुरवठा होत असल्यामुळे, मुंबईतील उंच भागांना तसेच मुख्य जलवाहिनीच्या अगदी टोकाच्या भागात असलेल्या वस्त्या आणि गृहनिर्माण सोसायट्यांना पाणीकपातीचा सर्वाधिक फटका बसताना दिसत आहे. अंधेरी, घाटकोपर, चेंबूर, कुर्ला, गोवंडी, साकीनाका, मानखुर्द, वडाळा आणि परळ यांसारख्या दाट लोकवस्तीच्या भागांना पाण्याचा कमी आणि अनियमित पुरवठा झाल्याचा सर्वाधिक तीव्र फटका बसला आहे.
पाऊस आला तरी ‘मिठी’ गाळातच
पावसाळा आता तोंडावर आला असला तरी मिठी नदी अजून गाळातच असल्याचे उघड झाले आहे. नदीसफाई केवळ 82.93 टक्के पूर्ण झाली आहे. मिठी नदीतील गाळ उपसण्याची अंतिम मुदत ही 10 जून होती, ती उलटून गेली असली, तरी अद्याप नदीची सफाई अपूर्णच राहिल्याचे समोर आले आहे. मिठी नदीची केवळ 82.93 टक्केच सफाई पूर्ण होऊ शकली आहे. एकीकडे मान्सून तोंडावर असताना नदीपात्रात शिल्लक राहिलेल्या या गाळामुळे लगतच्या सखल परिसरामध्ये पुरस्थिती निर्माण होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. पूर्वउपनगर-525 या विभागात केवळ75.99 टक्के काम झाले आहे. म्हणजेच या भागात अद्याप सुमारे 24 टक्के गाळ नदीपात्रातच पडून आहे. याशिवाय पूर्व जयनगर-526 विभागात 88.19 टक्के आणि पूर्व उपनगर-527 विभागात 84.20 टक्के काम पूर्ण झाले आहे.