मुंबईकरांना दिलासा, तानसा, मोडकसागर ओव्हर फ्लो, सात तलावांमध्ये 53 टक्के जलसाठा

| Updated on: Jul 22, 2021 | 4:18 PM

बृहन्मुंबई महानगरपालिका नागरिकांना दररोज 385 कोटी लीटर (3850 दशलक्ष लीटर) एवढा पिण्याच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा करते.

मुंबईकरांना दिलासा, तानसा, मोडकसागर ओव्हर फ्लो, सात तलावांमध्ये 53 टक्के जलसाठा
ModakSagar lake
Follow us on

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना विविध नागरी सेवा-सुविधा देणारी आपली बृहन्मुंबई महानगरपालिका नागरिकांना दररोज 385 कोटी लीटर (3850 दशलक्ष लीटर) एवढा पिण्याच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा करते. हा पाणीपुरवठा ज्या 7 तलावांमधून केला जातो, त्यापैकी मोडकसागर तलाव हा आज मध्यरात्री 03.24 वाजता, तर तानसा तलाव हा आज पहाटे 05.48 वाजल्यापासून ओसंडून वाहू लागला आहे. यानंतर मोडकसागर तलावाचे 2 दरवाजे, तर तानसा तलावाचा 1 दरवाजा उघडण्यात आला आहे. (53% water storage in 7 lakes supplying water to Mumbai)

मोडकसागर तलाव गेल्यावर्षी म्हणजेच 2020 मध्ये 18 ऑगस्ट रोजी ओसंडून वाहू लागला होता. तर तानसा तलाव हा 20 ऑगस्टपासून पूर्ण भरुन वाहू लागला होता. या व्यतिरिक्त यंदाच्या वर्षी तुळशी तलाव व विहार तलाव, हे 2 तलाव अनुक्रमे 16 जुलै आणि 18 जुलै पासून पूर्ण भरुन वाहू लागले आहेत. यानुसार यंदाच्या पावसाळ्यात बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱया 7 तलावांपैकी 4 तलाव पूर्ण भरुन वाहू लागले आहेत.

यापूर्वी वर्ष 2019 मध्ये मोडकसागर तलाव हा 26 जुलै रोजी भरुन वाहू लागला होता. तर त्यापूर्वी 2018 व 2017 असे दोन्ही वर्ष हा तलाव 15 जुलै रोजी आणि 2016 मध्ये 01 ऑगस्ट रोजी पूर्ण भरुन वाहू लागला होता. तसेच तानसा तलाव हा 2019 मध्ये 25 जुलै रोजी, 2018 मध्ये 17 जुलै रोजी, 2017 मध्ये 18 जुलै रोजी आणि सन 2016 मध्ये 02 ऑगस्ट रोजी भरुन वाहू लागला होता.

मुंबईकडे 53.86 टक्‍के जलसाठा

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता ही सुमारे 1,44,736.3 कोटी लीटर (14,47,363 दशलक्ष लीटर) इतकी असून यामध्ये आज पहाटे 6.00 वाजता करण्यात आलेल्या मोजणीनुसार 77,956.8 कोटी लीटर (7,79,568 दशलक्ष लीटर) इतका म्हणजेच 53.86 टक्‍के एवढा पाणीसाठा जमा झाला आहे. याअंतर्गत अप्पर वैतरणा तलावामध्ये पाणी साठवण क्षमतेच्या 4.31 टक्के अर्थात 978 कोटी लीटर (9,780 दशलक्ष लीटर), मोडक सागर तलावामध्ये पाणी साठवण क्षमतेच्या 100 टक्के अर्थात 12892.5 कोटी लीटर (128925 दशलक्ष लीटर), तानसा तलावामध्ये पाणी साठवण क्षमतेच्या 99.66 टक्के अर्थात 14,459.3 कोटी लीटर (1,44,593 दशलक्ष लीटर) जलसाठा आहे.

हिंदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशयामध्ये (मध्य वैतरणा) पाणी साठवण क्षमतेच्या 47.71 टक्के अर्थात 9,234.2 कोटी लीटर (92,342 दशलक्ष लीटर), भातसा तलावामध्ये पाणी साठवण क्षमतेच्या 51.35 टक्के अर्थात 36,818.4 कोटी लीटर (3,68,184 दशलक्ष लीटर), विहार तलावामध्ये पाणी साठवण क्षमतेच्या 100 टक्के अर्थात 2,769.7 कोटी लीटर (27,697 दशलक्ष लीटर) आणि तुळशी तलावामध्ये देखील पाणी साठवण क्षमतेच्या 100 टक्के अर्थात 804.6 कोटी लीटर (8,046 दशलक्ष लीटर) एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे.

इतर बातम्या

ज्यांनी लसीचे 2 डोस घेतलेत, त्यांच्यासाठी मुंबई लोकल तातडीने सुरु करा, राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

बदलापूरमध्ये मुसळधार पाऊस, उल्हास नदीला पूर, बाजारपेठेला फटका, दुकानांत पाणी घुसलं!

मुंबईसाठी पुढील 24 तास कठीण, हवामान विभागाचा ‘रेड अलर्ट’

(53% water storage in 7 lakes supplying water to Mumbai)