प्रवासाचा वेळही कामाच्या वेळेत मोजा, 61 टक्के भारतीय कर्मचाऱ्यांची मागणी : सर्व्हे

| Updated on: Jul 22, 2019 | 1:08 PM

मुंबई आणि पुणेकरांबाबत बोलायचं झालं तर त्यांचा जवळपास 4 तासांचा वेळ प्रवासातच जातो. अशाप्रकारे 9 तासंचं काम आणि सरासरी 3 ते 4 तासांचा प्रवास असा मिळून ऑफिससाठी खर्च होणारा वेळ 12 ते 13 तासांचा होतो.

प्रवासाचा वेळही कामाच्या वेळेत मोजा, 61 टक्के भारतीय कर्मचाऱ्यांची मागणी : सर्व्हे
Follow us on

मुंबई : नोकरदारांसाठी वेळेचं नियोजन हा तसा खूप महत्त्वाचा विषय. मात्र, जसजशी भारतातील महानगरांची वाढ होत आहे, तसतसा प्रवासातील वेळही वाढत आहे. त्यामुळेच नोकरदारांचा दिवसभरातील सर्वाधिक वेळ ऑफिसमधील काम आणि प्रवासातच निघून जातो. मुंबई आणि पुणेकरांबाबत बोलायचं झालं तर त्यांचा जवळपास 4 तासांचा वेळ प्रवासातच जातो. अशाप्रकारे 9 तासंचं काम आणि सरासरी 3 ते 4 तासांचा प्रवास असा मिळून ऑफिससाठी खर्च होणारा वेळ 12 ते 13 तासांचा होतो. म्हणूनच भारतीय कर्मचाऱ्यांनी प्रवासाचा वेळही कामाच्या वेळेत मोजण्याची इच्छा व्यक्त केलीय.

नुकताच समोर आलेल्या एका सर्वेक्षणानुसार 61 टक्के भारतीयांनी प्रवासाचा वेळ कामाच्या वेळेत मोजण्याची इच्छा व्यक्त केली आहे. हे सर्वेक्षण इंटरनॅशनल वर्कप्लेस ग्रुपने (International Workplace Group – IWG) केले. यात 15,000 हून अधिक कार्यालयीन कर्मचाऱ्यांची मतं जाणून घेतली. यात भारतासह 80 देशांच्या कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

या सर्व्हेत कामाचे ठिकाण आणि वेळांचा अभ्यास करण्यात आला. यात भारतातील 61 टक्के नोकरदारांनी प्रवासाचा वेळ कामाच्या वेळेत मोजण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच 41 टक्के नोकरदारांनी ऑफिसमध्ये जाण्यासाठी करावी लागणारी कसरत आणि प्रवासाचा मनस्ताप याचा राग येत, असल्याचं मत नोंदवलं.

भारताच्या तुलनेत जागतिक नोकरदारांचा विचार केल्यास जगातील केवळ 42 टक्के लोकांनी प्रवासाचा वेळ कार्यालयीन कामात मोजण्याच्या मताशी सहमती दर्शवली. कामगारांच्या गरजा लक्षात घेऊन भारतातील 80 टक्के कंपन्यांनी आपल्या कामाच्या वेळेत लवचिकता आणल्याचीही नोंद या सर्वेक्षणानं केली आहे. यात कंपन्यांचा आहे त्या कर्मचाऱ्यांना टिकवणं आणि नव्या कर्मचाऱ्यांना आकर्षित करणं हा हेतू असल्याचं सांगितलं जातं.

कार्यालयीन वेळेत लवचिकता नसल्यानं कंपनीतील महत्त्वाच्या पदांवरील कर्मचारी नोकरी सोडण्याचा धोका वाढत असल्याचंही या संशोधनानं सांगितलं. जागतिक पातळीवर 71 टक्के आणि भारतात 81 टक्के ठिकाणी कार्यालयीन वेळेतील लवचिकतेमुळं कर्मचाऱ्यांची गुणवत्ता आणि क्षमता वाढल्याचीही नोंद करण्यात आली आहे.

जागतिक स्तरावर 32 टक्के आणि भारतात 49 टक्के कर्मचारी मोठ्या आणि प्रतिष्ठेच्या पदांपेक्षा कामाच्या वेळेच्या लवचिकतेला प्राधान्य देत असल्याचेही यातून पुढे आले आहे. काम आणि व्यक्तिगत आयुष्य यांचं संतुलन राखताना कर्मचाऱ्यांची दमछाक होताना दिसते. मात्र, कामाच्या वेळेच्या लवचिकतेमुळे काम आणि व्यक्तिगत आयुष्याचं संतुलन करणं शक्य होत असल्याचंही समोर आलं. हे प्रमाण जागतिक स्तरावर 78 टक्के तर भारतात 86 टक्के आहे.

मुंबई आणि पुणे या मोठ्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात नोकरीची संधी असल्यानं राज्यभरातून तरुणांचा लोंढा येथे येतो. मात्र, यातील बहुतांशी नोकरदारांचा अधिक वेळ प्रवासातच खर्ची पडतो. मुंबईसारख्या ठिकाणी कल्याण, डोंबिवली, बदलापूर, विरार, पनवेल अशा लांबच्या ठिकाणांवरुन कामावर यावे लागते. यातच त्यांचे 3 ते 4 तास खर्च होतात. हेच पुण्यात पाहिले तर पुण्यातून आयटी पार्क असलेल्या हिंजेवाडी परिसरात जाण्यासाठी 2 ते 3 तासांचा वेळ खर्च होतो. त्यामुळे या सर्व्हेतून समोर आलेली इच्छा पूर्ण झाल्यास पुणे आणि मुंबईकरांसाठी ही पर्वणीच ठरेल.