EXCLUSIVE : असं काय घडलं की चिंचवडमध्ये ऐनवेळी उमेदवार बदलावा लागला? अजित पवार म्हणतात…

| Updated on: Feb 08, 2023 | 8:20 PM

राज्यात सध्या पुण्यातील कसबा पेठ (Kasba Peth) आणि पिंपरी चिंचवड (Pimpri Chnichwad) या दोन विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकींवरुन महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे.

EXCLUSIVE : असं काय घडलं की चिंचवडमध्ये ऐनवेळी उमेदवार बदलावा लागला? अजित पवार म्हणतात...
अजित पवार
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : राज्यात सध्या पुण्यातील कसबा पेठ (Kasba Peth) आणि पिंपरी चिंचवड (Pimpri Chnichwad) या दोन विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकींवरुन महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. चिंचवडच्या जागेवरुन राष्ट्रवादीच्या गोटात प्रचंड खलबतं झाली. सुरुवातीला चिंचवडच्या जागेसाठी राहुल कलाटे यांचं नाव चर्चेत होतं. पण आयात केलेल्या नेत्याला उमेदवारी नको, असं म्हणत पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून त्यांच्या उमेदवारीला विरोध झाला. त्यामुळे अखेर शेवटच्या क्षणी अजित पवार यांच्या मर्जीतील पदाधिकारी नाना काटे यांना उमेदवारी निश्चित झाली.

विशेष म्हणजे उमेदवारी अर्जाच्या शेवटच्या दिवशी बरीच खलबतं झाली. पण राष्ट्रवादीने शेवटच्या दिवशीच उमेदवार जाहीर केला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या या भूमिकेवर प्रश्न उपस्थित झाले. या विषयावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी रोखठोक प्रतिक्रिया मांडली आहे. ‘टीव्ही 9 मराठी’चे मुख्य संपादक उमेश कुमावत यांनी घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी आपली भूमिका मांडली.

“एक मिनिट हा पक्षांतर्गत प्रश्न आहे. याबद्दल बाहेरचे लोकं आम्हाला विचारु शकत नाहीत. आम्ही ज्यावेळेस एकत्र बसतो त्यावेळेस आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करतो”, असं अजित पवार म्हणाले.

हे सुद्धा वाचा

“आमच्याकडे 11 नावं होती. अकरा-बारा नावांमध्ये एकच फायनल होणार होतं. तुम्ही मीडियाने ठरवलं की ए नाव कदाचित निश्चित होईल, पण बी नाव निश्चित झालं. पण तुमचा अंदाज चुकला. तुमच्या अंदाजाशी मला काय घेणंदेणं आहे?”, असा सवाल त्यांनी केला.

“बातम्या सगळ्याच खऱ्या नसतात. तो अधिकार आमचा आहे. ती जागा महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेसला सुटल्यानंतर आमचे राष्ट्रीय नेते ज्यांनी अनेक 55 वर्षात निवडणुका लढवले आहेत, अनेकदा सरकार स्थापन केले आहेत, अनेकदा देशाच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे अशा शरद पवारांनी सल्ला-मसलत करुन आमच्या प्रदेशाध्यक्षांनी काही विचार केला असेल. तो आमचा अधिकार आहे ना? तो आम्ही वापरला”, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.

कलाटे विरुद्ध काटेंचं काय?

“याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सागितलं की, माझे शिवसैनिक आणि पदाधिकारी हे नाना काटे यांच्यासाठी काम करतील. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी तिथे त्या पद्धतीने मेसेज दिला आहे. त्यामुळे कुठलीही अडचण येईल, असं मला वाटत नाही”, अशी भूमिका त्यांनी मांडली.

“कधीकधी तिरंगी लढाईने फायदाही होतो. तोटाही होते. काल फॉर्म भरले आहेत, छाननी होईल. जवळपास 40 लोकांनी फॉर्म भरलेले आहेत. त्यापैकी अनेक फॉर्म बाद होतील”, असं पवार म्हणाले.

“ज्यावेळेस तिथले निवडणूक अधिकारी आता चिंचवड विधावसभा मतदारसंघामध्ये एवढे उमेदवार उभे आहेत असं घोषित करतील त्यावेळेस खरं चित्र समोर येईल”, असंदेखील ते म्हणाले.

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नीसाठी सहानुभूतीची लाट?

“आपणच सहानुभूतीबद्दल चर्चा करतो. पंढरपूरलाही दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर सहानुभूतीची लाट पाहायला मिळाली का? नाही बघायला मिळाली. शेवटी मतदार राजा आहे. मतदारांना जे योग्य वाटतं ते करण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे”, असं अजित पवारांनी सांगितलं.

“काही जण असं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात की, सहानुभूती. प्रत्येकाला मतं पाहिजे असतात. तशापद्धतीने प्रपोगांडा तयार केला पाहिजे”, असं पवार म्हणाले.

“भाजपने बिनविरोधचा प्रयत्न केला असेल. पण कोल्हापूर, पंढरपूरची निवडणूक बिनविरोध झाली नाही. देगलूरची निवडणूकही बिनविरोध झाली नाही. अंधेरीच्या निवडणुकीत नोटाला मतदान जास्त झालं”, असंदेखील त्यांनी सांगितलं.

भाजपने कसबा आणि चिंचवडमध्ये काय प्रयत्न करावा तो त्यांचा सर्वस्वी अधिकार आहे, असं पवार म्हणाले.

महाविकाआचे दोन्ही मतदारसंघात उमेदवार कोण?

भाजपने (BJP) ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी मागणी केलीय. पण महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) त्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. महाविकास आघाडीने दोन्ही जागांवर मातब्बर उमेदवार उतरवले आहेत. महाविकास आघाडीकडून कसबा पेठच्या जागेसाठी काँग्रेस रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आलीय. तर पिंपरी चिंचवडच्या जागेसाठी राष्ट्रवादीच्या नाना कोटे यांना उमेदवारी दिलीय.