…म्हणून थोरातांच्या राजीनाम्याची अजित पवार यांना आधीच माहिती, दादांचा मोठा खुलासा

| Updated on: Feb 08, 2023 | 6:33 PM

काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना याबाबत माहिती नव्हती आणि पवारांनी आधीच याची कल्पना कशी यावरून राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावले गेले. मात्र अशातच टीव्ही9 ला दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांनी याबाबत खुलासा केला आहे.

...म्हणून थोरातांच्या राजीनाम्याची अजित पवार यांना आधीच माहिती, दादांचा मोठा खुलासा
Follow us on

मुंबई :  शिक्षक पदवीधर निवडणुकीमध्ये काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता. सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला त्यानंतर जे झालं ते सर्व राज्याने पाहिलं. यातील सर्वात मोठी घडामोड म्हणजे माजी मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी विधमंडळ नेतेपदाचा राजीनामा दिला. मात्र याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना याबाबत काही माहिती नव्हती. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली होती. पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना याबाबत माहिती नव्हती आणि पवारांना आधीच याची कल्पना कशी यावरून राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावले गेले. मात्र अशातच टीव्ही9 ला दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांनी याबाबत खुलासा केला आहे.

बाळासाहेबांचा वाढदिवस होता. मी वाढदिवसाला सर्वपक्षीय नेत्यांना फोन करुन शुभेच्छा देतो. मी माणुसकी आणि महाराष्ट्राची परंपरा म्हणून वाढदिवसाचा फोन केला होता. फोन करण्याआधी मी सकाळच्या वृत्तपत्रातील बातम्या वाचल्या होत्या. त्यावेळी मी वाढदिवसाच्या निमित्ताने बोललो की मला तुम्हाला जास्त विचारायचं नाही. पण ते म्हणाले मी राजीनामा दिला. एवढेच ते बोलले. त्यानंतर मी दुपारी फॉर्म भरायला गेलो. त्यांनी शुभेच्छा देताना राजीनाम्याचं सांगितलं. मी ते सांगणारच ना, असं अजित पवार यांनी सांगितलं.

बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्याशी माझा काय संबंध? तो त्यांचा पक्षांतर्गत मुद्दा आहे. ते आम्हाला सिनीयर आहेत. बाळासाहेब 1985 ला आमदार झाले. अनेक वर्ष ते पक्षासाठी काम करत असून त्यांच्या अनेक पिढ्या काँग्रेसमध्ये काम करत आल्या आहेत. मी त्यांना कालही शुभेच्छा दिलेल्या होत्या. त्यांचे पक्षातील वरिष्ठ येतील आणि चर्चा करतील, असं पवारांनी स्पष्ट शब्दात सांगितलं.

सत्यजीत तांबेंबाबत काय बोलले दादा?
आता तो चॅप्टर जवळपास संपलेला आहे. त्यावर खूप काही चर्चा झालेली आहे. सुदैवाने ते निवडून आलेले आहेत. त्यांना यश मिळालं आहे. त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे. मी आज एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे. मी राज्याचा विरोधी पक्षनेता आहे. त्यामुळे ज्या गोष्टी झाल्या आहेत त्यावर पुन्हा चर्चा करण्यात, कारण माझ्याकडून काही स्टेटमेंट केलं गेलं आणि त्याला आरेला कारे होणार. त्यामुळे आता त्यावर फार काही बोलायची गरज नाही.