तरुणांच्या स्वप्नाला लागला सुरुंग, पुरावे कसले मागता, जयंत पाटील यांनी घेतला समाचार

Jayant Patil Talathi | तलाठी परीक्षेवरुन राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये, उमेदवारांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. काही उमेदवारांना एकूण गुणांपेक्षा अधिकचे गुण मिळाले आहेत. त्यावर सरकारने सारवासारव केली आहे. नेमका हाच धागा पकडून या एकूणच प्रकारावर शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी खरपूस समाचार घेतला आहे.

तरुणांच्या स्वप्नाला लागला सुरुंग, पुरावे कसले मागता, जयंत पाटील यांनी घेतला समाचार
Jayant Patil
| Updated on: Jan 09, 2024 | 3:39 PM

मुंबई | 9 जानेवारी 2024 : तलाठी परीक्षेतील अनागोंदीविरोधात शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. या परीक्षेवरुन राज्यातील विद्यार्थी, उमेदवार आणि पालकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. काही विद्यार्थ्यांना या परीक्षेत एकूण गुणांपेक्षा अधिक गुण मिळाल्याने सर्वच चक्रावले आहे. तर या प्रकरणात राज्य सरकारने सारवासारव चालवली आहे. स्पर्धा परीक्षेदरम्यान सातत्याने पेपर फुटी, भ्रष्टाचारामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करून सरकारी नोकरी मिळवण्याची आशा बाळगणाऱ्या तमाम तरुण तरुणींचे स्वप्न भंग होत आहेत आणि उपमुख्यमंत्री पुरावे मागत आहे असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे.

एक्स हँडलवर तीव्र प्रतिक्रिया

जयंत पाटील यांनी त्यांच्या एक्स (ट्विटर) हँडलवरुन सरकारच्या भूमिकेचा समाचार घेतला आहे. नुकताच तलाठी भरती परीक्षेचा निकाल लागला. २०० गुणांच्या परीक्षेत त्यापेक्षा जास्त गुण मिळाल्याची किमया झाली आहे. कसे झाले? यावर उपमुख्यमंत्र्यांनी प्रकाश टाकायला हवा, असा चिमटा त्यांनी काढला. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे सोडून उपमुख्यमंत्री पुरावे मागत असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

अनास्था विद्यार्थ्यांच्या मुळावर

शासकीय आणि प्रशासकीय अनास्थेमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. पेपरफुटीला कारणीभूत असलेले दलाल आपली पोळी भाजून घेत आहेत. “जर तर”ची भाषा करत सत्तेतील जबाबदार व्यक्ती नाममात्र राहण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यातील तरुण पिढीची अवस्था दयनीय करत, भावी प्रशासकीय यंत्रणेची घडी विस्कटून टाकण्याचा प्रयत्न आम्ही हाणून पाडू असा इशारा त्यांनी दिला. सरकारची अनास्थाच विद्यार्थ्यांच्या मुळावर येऊन टेकल्याचा आरोप त्यांनी केला.

तलाठी भरती रद्द करा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अंतर्गत क आणि ड गटातील पदभरतीसाठी स्वतंत्र विभागाची स्थापना करावी, अशी मागणी मी यापूर्वीच केली होती. पण अजून त्याबाबत काही कार्यवाही झाली नाही. सरकार या विषयासाठी गंभीर नाही हेच दिसते आहे. या प्रकरणाची ताबडतोब चौकशी करून संबंधीतांवर कारवाई करावी, तलाठी भरती रद्द करावी आणि विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली.