‘आरे’तील 2700 झाडांच्या कत्तलीविरोधात अमित ठाकरेही मैदानात

| Updated on: Sep 03, 2019 | 8:18 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरेही (Amit Thackeray) आरेतील झाडे वाचवण्यासाठी पुढे आले असून त्यांनी (Amit Thackeray) जनतेला सरकारच्या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरण्याचं आवाहन केलंय.

आरेतील 2700 झाडांच्या कत्तलीविरोधात अमित ठाकरेही मैदानात
Follow us on

मुंबई : मेट्रोचं कारशेड बनवण्यासाठी मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने आरे जंगलातील (save aarey) 2700 झाडं तोडण्याचा निर्णय घेतला. रविवारी हजारो मुंबईकरांनी रस्त्यावर उतरुन याचा (save aarey) निषेध केला, ज्याला बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूसह अनेक सेलिब्रिटींनीही पाठिंबा दिला. यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरेही (Amit Thackeray) आरेतील झाडे वाचवण्यासाठी पुढे आले असून त्यांनी (Amit Thackeray) जनतेला सरकारच्या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरण्याचं आवाहन केलंय.

वृक्ष प्राधिकरण समितीने 2700 झाडे कापण्याचा निर्णय घेतला, बीएमसीचे अधिकारी आणि एमएमआरडीएने त्याअगोदर स्थानिकांशी चर्चा केली. 82 हजार लोकांनी याविरोधात तक्रारी केल्या. एवढ्या लोकांच्या तक्रारी असतानाही आपण झाडे कापण्याचा निर्णय घेत असू तर संशय निर्माण होणारच. आम्ही विकासाच्या विरोधात नाही, पण निसर्गाचा बळी देऊन विकास करु नये. आपल्या मुंबईवरच नव्हे, तर जगावर ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे. अमेझॉन जंगल पेटल्याने सगळे जण हळहळ व्यक्त करत आहेत. आरे नष्ट करणं ही दुर्दैवी बाब आहे, लोकांनी पुढे येऊन याविरोधात आवाज उठवावा, मी तुमच्यासोबत आहे, असं आवाहन अमित ठाकरेंनी केलंय.

PHOTO : ‘आरे’तील 2700 झाडांची कत्तल वाचवण्यासाठी श्रद्धा कपूरही रस्त्यावर

रविवारी अभिनेत्री श्रद्धा कपूरनेही शांततापूर्ण आंदोलनात सहभाग घेऊन आरे वाचवण्याचं आवाहन केलं. जवळपास दीड हजारपेक्षा जास्त मुंबईकरांनी मानवी साखळी करुन आरे वाचवण्यासाठी सरकारला साकडं घातलं.

आरेच्या जंगलात साडे चार लाखांपेक्षा जास्त झाडे असून हे अनेक प्राणी-पक्षी प्रजातींसाठी हक्काचं घर आहे. या झाडांसोबतच या जीवांचंही अस्तित्व संपुष्टात येईल यात शंका नाही. त्यामुळे या जंगलाची जैवविविधताच संपुष्टात येणार असल्याची भीती पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केली आहे.

मुंबईचं फफ्फुस असलेलं आरे जंगल भविष्यातील पिढ्यांचीही महत्त्वाची संपत्ती आहे. कारण, जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये मुंबईचाही क्रमांक लागतो. मुंबईकरांना स्वच्छ श्वास द्यायचा असेल, तर झाडं तोडणं नव्हे, झाडांची संख्या वाढवणे हा पर्याय असल्याचं तज्ञांचं मत आहे.