उद्या अचानक मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गेट वे ऑफ इंडियाचं लोकार्पण केलं नाही म्हणजे मिळवलं : आशिष शेलार

| Updated on: Aug 05, 2021 | 2:27 PM

भाजप आमदार आशिष शेलार यांनी मुंबई महानगरापालिकेच्या एका इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमावरुन बीएमसीवर आणि महाविकास आघाडी सरकारवर हल्ला चढवला आहे.

उद्या अचानक मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गेट वे ऑफ इंडियाचं लोकार्पण केलं नाही म्हणजे मिळवलं : आशिष शेलार
भाजप नेते आशिष शेलार -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us on

मुंबई : भाजप आमदार आशिष शेलार यांनी मुंबई महानगरापालिकेच्या एका इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमावरुन बीएमसीवर आणि महाविकास आघाडी सरकारवर हल्ला चढवला आहे. “1 मे म्हणजे महाराष्ट्र दिनापासून गेले 3 महिने जी वास्तू वापरात आहे त्या वास्तुचे उद्घाटन आज (5 ऑगस्ट) करुन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची फसगत झाली आणि कार्यक्रमाचं हसं झालं. असा प्रकारचं दुर्दैवी वर्तन मुंबई महापालिकेने का करुन दाखवले?” असा सवाल आशिष शेलार यांनी केला आहे.

आशिष शेलार म्हणाले, “आज एच पश्चिम महापालिका कार्यालयाचा लोकार्पण सोहळा पार पडला. जुनी वास्तु अपुरी पडत असल्याने स्थानिक आमदार म्हणून मी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह तत्कालीन महापौर, पालिका आयुक्त, पालिका प्रशासनाकडे गेले 6 वर्षे सतत पाठपुरावा केला. या कामात स्थानिक नागरिक, स्थानिक संस्था यांनीही मोठा पाठपुरावा केला आहे. या कार्यालयाचा ठराव मांडून त्यासाठी निधी उपलब्धतेच्या बैठका, त्याचे टेंडर, प्रत्यक्ष काम व त्यामध्ये आलेल्या अडचणी याबाबत 8 वेळा बैठका घेतल्या.”

“अनेकांच्या मागणी आणि पाठपुराव्यानं नवी अद्ययावत इमारत”

“या कार्यालयाच्या निर्माणात शिवसेनेचा कुठलाच सहभाग नव्हता. मग श्रेय घेण्यासाठी अट्टाहास कशाला? असा सवाल आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. स्थानिक आमदार, एएलएम, संस्था, नागरिकांची मागणी आणि पाठपुराव्याने ही नवी अद्ययावत इमारत उभी राहिली. 1 मे पासून ती लोकांसाठी खुलीही करण्यात आली. आता अचानक 3 महिने वापरात असलेल्या इमारतीचे लोकार्पण आज (5 ऑगस्ट) मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येते आहे,” असंही आशिष शेलार यांनी नमूद केलं.

“महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी स्वतःचे हसे तर केलेच सोबत मुख्यमंत्र्यांची फसगत केली”

आशिष शेलार म्हणाले, “महापालिकेतील सत्ताधारी श्रेय घेण्याच्या नादात काय करुन दाखवतील याचा नेम नाही. मुख्यमंत्र्यांना या इमारतीबाबत वास्तव माहिती न देता अशा प्रकारे कार्यक्रम करुन महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी स्वतःचे हसे तर केलेच सोबत मुख्यमंत्र्यांची फसगत केली आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे. उत्तर महाराष्ट्र दौऱ्यात जळगावला नियोजित कार्यक्रमात असताना काल (4 ऑगस्ट) रात्री 10 वाजता अचानक मला या कार्यक्रमाचे निमंत्रण दुरध्वनीवरुन मिळाले. त्यामुळे कार्यक्रमाला पोहचणे शक्य झाले नाही.”

“श्रेय वादाच्या नादात घेतलेल्या मुंबई महापालिकेच्या निर्णयाबद्दल खेद”

“मुख्यमंत्री आमच्या विभागात येत असताना त्यांच्या कार्यक्रमाला स्थानिक आमदार म्हणून गैरहजर असलो तरी जनमाणसात योग्य संदेश जावा म्हणून मी स्थानिक नगरसेवक अलका केळकर यांच्या हातून पुष्पगुच्छ पाठवून त्यांचे स्वागत केले. पण हे मनाला न पटणारे आहे. मुंबई महापालिका श्रेय वादाच्या नादात हे असे जे काही करुन दाखवते आहे त्याबद्दल खेद वाटतो आहे. मुख्यमंत्री पदाचा सन्मान राखणे आपले कर्तव्य नाही का? केवळ करुन दाखवलेच्या नादात 3 महिने लोकसेवेत असलेल्या इमारतीचे लोकार्पण रातोरात ठरवून मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणणे योग्य आहे का?” असा सवाल आमदार आशिष शेलार यांनी उपस्थितीत केला.

“उद्या अचानक मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गेट वे आँफ इंडियाचं लोकार्पण केलं नाही म्हणजे मिळवले”

“महापालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी करुन दाखवलेच्या नादात उद्या अचानक गेट वे आँफ इंडियाच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आयोजित करु नये म्हणजे मिळवले,” अशा शब्दांत आमदार आशिष शेलार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

हेही वाचा :

पूरग्रस्तांना पॅकेज म्हणजे वृत्तपत्रातील प्रसिद्धीची बातमी; मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरविला, आशिष शेलारांचा टोला

आघाडी सरकार शेतकऱ्यांचे नाही, तर घोटाळेबाज “धर्मभास्कर वाघांचे” आश्रयदाते : आशिष शेलार

‘खावाले काळ, नी भूईले भार म्हणजे ठाकरे सरकार’, नंदुरबार दौऱ्यात आमदार आशिष शेलार यांचा घणाघात

व्हिडीओ पाहा :

Ashish Shelar criticize BMC and Uddhav Thackeray on inauguration program