योगी आदित्यनाथांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, हाथरस पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी संघर्ष- बाळासाहेब थोरात

| Updated on: Oct 04, 2020 | 6:08 PM

हाथरस प्रकरण अत्यंत बेजबाबदारपणे व हुकुमशाही पद्धतीने हाताळण्यात आले, अशी टीका बाळासाहेबत थोरातांनी केली. योगी आदित्यनाथांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, असेही थोरत म्हणाले. (Balasaheb Thorat criticize Yogi Aadityanath)

योगी आदित्यनाथांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, हाथरस पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी संघर्ष- बाळासाहेब थोरात
Follow us on

मुंबई: उत्तर प्रदेशातील हाथरसच्या घटनेने देशाला शरमेनं मान खाली घालायला लावली. पण, भाजपच्या योगी आदित्यनाथ सरकारची थोडीही संवेदना जागी झाली नाही. हे प्रकरण अत्यंत बेजबाबदारपणे व हुकुमशाही पद्धतीने हाताळण्यात आले. योगी आदित्यनाथांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी टीका महसूल मंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेबत थोरात यांनी केली. (Balasaheb Thorat criticize Yogi Aadityanath on Hathras Case)

हाथरस मधील पीडित कुटुंबाला न्याय देण्याऐवजी त्यांना धमक्या देण्यापर्यंत उत्तर प्रदेश सरकारची मजल गेली. पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष संघर्ष करत असून सोमवारी राज्यभरात सत्याग्रह करण्यात येणार आहे. पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष सुरुच राहील,अशी माहिती बाळासाहेब थोरातांनी दिली.

भाजपशासित राज्यात महिला व मुली सुरक्षित नाहीत. ‘बेटी बचाओ’चा नारा देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र मूग गिळून गप्प आहेत, असा सवाल थोरात यांनी विचारला. काँग्रेस पक्ष उत्तर प्रदेशातील भाजपाच्या अहंकारी सरकारला जाब विचारण्यासाठी व पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी सोमवारी राज्यव्यापी सत्याग्रह करण्यात येणार असल्याची माहिती थोरात यांनी दिली. ते मुंबईतील सत्याग्रहात सहभागी होतील. राज्यातल्या सर्व जिल्हा मुख्यालयात हा सत्याग्रह केला जाणार आहे.

सर्वोच्च न्यायालयामार्फत हाथरस प्रकरणाची प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी. हाथरसच्या जिल्हाधिकाऱ्याला निलंबित करावे. पीडितेचा मृतदेह पोलिसांनी परस्पर पेट्रोल टाकून का जाळला? उत्तर प्रदेश प्रशासनाने वारंवार दिशाभूल का केली? पीडित कुटुंबाला धमक्या का दिल्या? आणि जाळण्यात आलेला मृतदेह पीडितेचाच होता यावर विश्वास कसा ठेवायचा? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा पीडित कुटुंबाचा हक्क आहे आणि या प्रश्नांची उत्तरं योगी आदित्यनाथ सरकारला द्यावीच लागतील, असे थोरात यांनी स्पष्ट केले.

योगी आदित्यनाथांच्या अहंकारी व हुकुमशाही प्रवृत्तीने लोकशाहीची लक्तरं वेशीवर टांगली आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी व सरचिटणीस प्रियांका गांधी यांना हाथरसला जाताना अडवून धक्काबुक्की करण्यात आली. उत्तर प्रदेश सरकारच्या या दडपशाहीचा निषेध करत महाराष्ट्रासह देशभरात काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले व संताप व्यक्त केला. शेवटी भानावर आलेल्या यूपी सरकारने राहुल गांधी व प्रियांका गांधी यांना पीडित कुटुंबाला भेटण्याची परवानगी दिली. पण जाताना काँग्रेस कार्यकर्त्यांवर लाठीहल्ला केला.

प्रियांका गांधी यांच्या कपड्याला हात घालण्यापर्यंत पोलीस अधिका-यांची मजल गेली. महिलांबद्दल योगी आदित्यनाथ सरकारची मानसिकता किती हीन पातळीची आहे, हेच यातून दिसले. हा सत्तेचा माज असून भाजपचा हा माज जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही, असे थोरात म्हणाले.

संबंधित बातम्या:

हाथरसप्रकरणी योगी आदित्यनाथांचं मोठं पाऊल, CBI चौकशीचे आदेश

LIVE | पीडित कुटुंबाला पूर्ण साथ, न्याय मिळेपर्यंत संघर्ष : राहुल गांधी

(Balasaheb Thorat criticize Yogi Aadityanath on Hathras Case)