लोकसभेच्या जागांवरुन भाजप-शिवसेनेत वादाची खरंच ठिणगी? गिरीश महाजन म्हणतात…

| Updated on: May 30, 2023 | 5:16 PM

खासदार गजानन कीर्तिकर यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केल्यानंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे भाजपच्या गोटातून आज संयोजक नेमण्याची आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेना यांच्याबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

लोकसभेच्या जागांवरुन भाजप-शिवसेनेत वादाची खरंच ठिणगी? गिरीश महाजन म्हणतात...
Follow us on

मुंबई : लोकसभेच्या निवडणुका जसजशा जवळ येणार तसतशा घडामोडी वाढत जाणार. राज्यात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. यापैकी 22 जागांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने दावा केलाय. पण असं असलं तरी भाजपकडूनही मोर्चेबांधणी सुरु झालीय. भाजपने शिवसेनेचे खासदार असलेल्या भागात संयोजक नेमले आहेत. त्यामुळे भाजपच्या या रणनीतीला जास्त महत्त्व प्राप्त झालंय. विशेष म्हणजे शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी चार दिवसांपूर्वीच जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर भाजप नेते, मंत्री गिरीश महाजन यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिलीय.

“मला वाटतं, त्यांना निवडून आणण्याची आमची जबाबदारी आहे. आमचे खासदार निवडून आणण्याची त्यांचीदेखील जबाबदारी आहे. फक्त त्यांची एकट्याची जबाबदारी नाहीय. मला असं वाटतं, ज्या ठिकाणी त्यांचे खासदार आहेत त्या ठिकाणी भाजपची ताकद आहेच. त्यामुळे आम्ही त्यांचे खासदार जिथे आहेत तिथे आम्ही आमचे संयोजक नेमतोय, जेणेकरुन आम्हाला एकत्रितपणे निवडणूक लढायची आहे. आम्हाला आगामी लोकसभा निवडणुकीत 100 टक्के यश मिळणार आहे. आम्ही यावेळी एकही जागा गमवणार नाही”, असं गिरीश महाजन यांनी सांगितलं.

“मी त्यादिवशीच गजानन कीर्तिकर यांच्याशी बोललो. ती बातमी बघितल्यानंतर लगेच बोललो. त्यांनी मला सांगितलं की, माझा असा कोणताही उद्देश नव्हता”, असं स्पष्टीकरण गिरीश महाजन यांनी दिलं.

‘राज ठाकरे-फडणवीस भेटीचा वेगळा अर्थ नाही’

दरम्यान, “मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेय होणं यात काही वाईट नाही. राज्यभरातील अनेक नेते एकमेकांना भेटत असतात, बोलत असतात, चर्चा करत असतात. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस भेटले असतील तर ते काही चुकीचं आहे, असं वाटत नाही किंवा ते मतं फोडण्यासाठी भेटले असतील असं काही नाही”, असंही ते यावेळी म्हणाले.

“राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचे संबंध अतिशय चांगले आहेत. वर्षभरात ते दोन-तीन वेळा भेटलेही आहेत. तसेचे ते एकमेकांच्या घरीही गेले आहेत. त्यामुळे या भेटीचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही”, असं गिरीश महाजन म्हणाले.

गजानन कीर्तिकर नेमकं काय म्हणाले?

“आम्ही एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शिवसेनेत आल्यामुळे आम्ही जे 13 खासदार आहोत ते एनडीएचे घटक आहोत. आम्ही अगोदर होतो तेव्हा एनडीएचे घटक पक्ष नव्हतो. एनडीएचे घटक पक्ष असल्याने त्या पद्धतीने आमची कामे झाली पाहिजेत. घटक पक्षाला तेवढा दर्जा दिला पाहिजे, असा आमचा मुद्दा आहे. आम्हाला सापत्न वागणूक मिळते, असं आमचं म्हणणं आहे”, असं गजानन कीर्तिकर म्हणाले आहेत.

“लोकसभेच्या आमच्या 22 जागा हक्काच्या आहेत. त्याबाबत दावा कशाला करायला हवा? 2019 ला आम्ही शिवसेना-भाजप एकत्रित लढलो. त्यावेळी वाटप झालं, भाजप 26 जागांवर लढली. त्यापैकी 3 पडले, 23 खासदार निवडून आले. तर 22 जागांवर शिवसेना लढली, त्यापैकी 4 पडले, 18 खासदार निवडून आले. तेच राहणार. शिवसेनेची तयारी झालीय”, असा दावा किर्तिकरांनी केलाय.