हायकोर्टाचा मुंबई विद्यापीठाला झटका, सिनेटच्या निवडणुका उद्याच घेण्याचे आदेश

मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुका उद्याच घेण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाला मोठा झटका बसला आहे. सिनेटच्या निवडणुका काल रात्री अचानक पुढे ढकलण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला होता. या निर्णयाच्या विरोधात ठाकरे गट हायकोर्टात गेले होते. त्यानंतर कोर्टाने हा निकाल दिला आहे.

हायकोर्टाचा मुंबई विद्यापीठाला झटका, सिनेटच्या निवडणुका उद्याच घेण्याचे आदेश
shailesh musale | Updated on: Sep 21, 2024 | 5:53 PM

मुंबई सिनेटच्या निवडणुका उद्याच होणार असे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. मुंबई विद्यापीठाने सिनेटच्या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. या निर्णयाच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाने हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मुंबई हायकोर्टाने मुंबई विद्यापीठाला फटकारले आहे. त्यामुळे सिनेटच्या निवडणुका उद्याच घ्यावा लागणार आहे. ठाकरे गटाच्या बाजुने कोर्टाने निकाल दिला आहे. ठाकरे गटाच्या वतीने सिद्धार्थ मेहता यांनी बाजु मांडली होती. त्यानंतर आता उद्याच निवडणुका घ्याव्या लागणार आहेत.

सिनेट निवडणूक मंगळवारी घेण्याची विद्यापीठाची तयारी आहे. उद्याच निवडणूक घेण्याचे आदेश दिल्यानंतर एवढ्या अपुऱ्या वेळेत निवडणूक घेणे शक्य नसल्याचं विद्यापीठनं मत मांडले आहे. न्यायमूर्ती आशिष चांदोरकर यांच्या चेंबरमध्ये विद्यापीठाच्या वतीने हे मत मांडण्यात आलं आहे.

मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक दुसऱ्यांदा स्थगित केल्यानंतर ठाकरे गटाने हायकोर्टात धाव घेतली होती. त्यामुळे आता रविवारी 22 सप्टेंबरलाच मुंबई विद्यापीठाची निवडणूक होणार आहे. मुंबई विद्यापीठाने परिपत्रक काढत निवडणुका पुढे ढकल्याचा निर्णय़ घेतला होता. यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. महाराष्ट्राने एवढे घाबरट, गद्दार मुख्यमंत्री याआधी कधीही पाहिलेले नाहीत, अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी हल्लाबोल केला.

‘मुंबई विद्यापीठाचे सिनेट निवडणूक काल स्थगित करण्यात आली होती त्या संदर्भात युवासेनेकडून याचिका दाखल करण्यात आली. उच्च न्यायालयाचे आम्ही आभार मानू इच्छितो. कारण वेळीच त्यांनी सुनावणी घेऊन उद्याच्या उद्या निवडणूक घेण्याविषयी निर्देश दिले. हा विजय केवळ युवा सेनेचा नसून 13 हजार 500 पदवीधरांचा विजय आहे. या सरकारने जे पदवीधरांच्या बाबतीत षडयंत्र रचल होतं ते न्यायालयाने हाणून पाडला आहे. उच्च न्यायालयाचे आम्ही आभार मानतो. त्यासोबतच युवासेना निवडणुकीसाठी सज्ज आहे. दहापैकी दहा जागा जिंकू’ असा विश्वास वरून सरदेसाई यांनी व्यक्त केला आहे.

सरकारच्या मनात भीती असल्याने त्यांना विधानसभेच्या आधी कोणतीही निवडणूक घ्यायची नाही. ते डरपोक आहेत. त्यांना निवडणुकीला सामोरे जायचे नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अजूनही झालेल्या नाहीत. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीतही ते हरतील, हे त्यांना माहिती आहे. त्यामुळेच ते निवडणुका घेत नाहीत”, असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us