Bandra Gareeb Nagar : गरीब नगरमध्ये ज्यांनी पोलिसांवर दगड मारण्यासाठी हात उचलले त्यांच्यावर थेट..मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
Bandra Gareeb Nagar : काल वांद्र्यात गरीबनगर झोपडपट्टीत अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू असताना पोलिसांवर जमावाने दगडफेक केली होती. त्यांना पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे.

वांद्रे पूर्वेतील गरीब नगरमध्ये रेल्वेच्या कारवाईचा आज सलग तिसरा दिवस आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सुरू झालेली ही मोहीम निर्णायक टप्प्यात पोहोचलीय. काल 60 टक्के पाडकाम पूर्ण झालं. पण संध्याकाळी अतिक्रमण हटवण्याच्या निषेधार्थ संतप्त स्थानिकांनी पोलिसांवर दगडफेक केली. बुलडोझर पुन्हा एकदा उरलेल्या झोपड्यांवर चालवले जात आहेत. रेल्वेने आज सलग तिसऱ्या दिवशी येथील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केलीय. कालच्या दगडफेकीच्या घटनेनंतर आजही कडक पोलीस बंदोबस्त तैनात आहे. ज्यामध्ये मुंबई पोलीस, RPF, GRP सह रॅपिड अॅक्शन फोर्सच्या तुकड्या तैनात आहेत.
कालच्या दगडफेकी प्रकरणी पोलिसांनी कलम 109 नुसार हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. एकूण 100-150 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी 16 लोकांना अटक करण्यात आली आहे. एफआयआरमध्ये 10 जणांची नावं आहेत. काल झालेल्या दगडफेकीत पाच पोलीस जखमी झाले होते.
किती जणांना अटक?
पोलिसांवर केलेल्या दगडफेक प्रकरणात 16 जणांना अटक झाली आहे. आज कोर्टात सर्व आरोपीना हजर करण्यात येईल. काल वांद्र्यात गरीबनगर झोपडपट्टीत अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू असताना पोलिसांवर जमावाने दगडफेक केली होती. दगडफेक करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. आतापर्यंत 16 जणांची ओळख पटवून अटक करण्यात आली आहे. आज इथे पहाटेपासून रेल्वे प्रशासन आणि पोलीस दल पुन्हा सज्ज आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एकूण 500 बेकायदेशीर अतिक्रमणं हटवली जाणार आहेत.
अतिक्रमणं हटवण्याचं किती टक्के काम बाकी?
आज तिसऱ्या दिवशीही अतिक्रमणाविरोधात कारवाई सुरू झाली आहे. अतिक्रमणं हटवण्याचे सुमारे 85 टक्के काम पूर्ण झाले आहे. कालच्या घटनेनंतर, अतिक्रमणे हटवणे सोपे व्हावे, यासाठी आज यंत्रसामग्री वाढवण्यात आली आहे. 1200 सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत, विविध विभागांतील लोक तेथे आहेत. येथे राहणाऱ्या लोकांना रेल्वेतर्फे पाणी आणि अन्नही पुरवले जात आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिली. काल अतिक्रमणं हटवताना पोलिसांना लाठीचार्ज करावा लागलेला. ही जागा रिकामी केल्यामुळे वांद्रे टर्मिनसचा विस्तार होईल. 5वी-6वी लाईन टाकण्यासाठी जागा उपलब्ध होईल. यामुळे लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांची संख्या वाढेल. वाहतूक कोंडी कमी होईल.