CBSE Board 12 Exam cancelled : बारावी परीक्षा रद्द; मुख्यमंत्री, शालेय शिक्षणमंत्र्यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार

| Updated on: Jun 01, 2021 | 9:43 PM

केंद्र सरकारच्या या निर्णयाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

CBSE Board 12 Exam cancelled : बारावी परीक्षा रद्द; मुख्यमंत्री, शालेय शिक्षणमंत्र्यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
Follow us on

मुंबई : केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ म्हणजेच सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टाला केंद्र सरकारनं दोन दिवसात निर्णय घेऊ असं म्हटलं होत. त्याप्रमाणं बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. देशातील वाढत्या कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता केंद्रानं हा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. (CM Uddhav Thackeray and Varsha Gaikwad welcome the decision of cancel 12th exam)

कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याबद्धल उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद दिले आहेत. दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी आपल्या लाईव्ह संबोधनातून 12 वी तसेच अशा काही महत्वाच्या परीक्षांच्या आयोजनाच्या बाबतीत संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय स्तरावरून योग्य निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी केली होती. कोरोनाचा संसर्ग अजूनही वाढत आहे. दहावी आणि बारावीसारख्या परीक्षा रद्द करण्याची मागणी पालकांकडूनही होत होती. मुख्यमंत्र्यांनी देखील यासंदर्भात आपले म्हणणे मांडले होते. राज्यातही दहावीच्या परीक्षा न घेता मूल्यांकनाच्या आधारे विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच घेतला आहे.

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या 12 वी परीक्षेबाबतही लवकरच निर्णय

कोरोनाची सध्याची परिस्थिती, मुलांवर होणारा वाढता प्रार्दुभाव आणि परीक्षेच्या संभ्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनात वाढलेला तणाव विचारात घेता परीक्षा ऐवजी पर्यायी व्यवस्थेचा विचार करण्याची मागणी केली जात होती. तसंच केंद्र सरकारने देश पातळीवर या संदर्भात एकसूत्री धोरण निश्चित करावे, अशी मागणीही महाराष्ट्र सरकारने केली होती. या मागण्यांचा विचार करता केंद्रसरकारने CBSE बोर्डाची 12 ची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारचा हा निश्चितच स्वागतार्ह आहे. मुलाच्या शैक्षणिक जीवनातील 12 परीक्षा ही महत्त्वाची पायरी असली तरीही सध्याची परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षा ही आपल्या सर्वांची प्राथमिकता असली पाहिजे. या पुढे महाराष्ट्र शासन ही महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षांबाबत ही विद्यार्थ्यांचे आरोग्य व हित जोपासून लवकरच निर्णय घेईल, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिलीय.

नरेंद्र मोदी काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करत असल्याचं जाहीर केलं. बारावीच्या निकालासाठी कार्यपद्धती लवकरचं जाहीर केली जाईल. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि सुरक्षा आमचं पहिलं प्राधान्य आहे, असं मोदी म्हणाले.

संबंधित बातम्या :

CBSE Board 12 Exam cancelled: बारावीच्या परीक्षा रद्द, मोदी सरकारचा मोठा निर्णय

मोठी बातमी : दहावीचा निकाल जूनमध्ये, नववी-दहावीच्या अभ्यासक्रमावरुन मूल्यांकन, 11 प्रवेशाची प्रक्रियाही ठरली

CM Uddhav Thackeray and Varsha Gaikwad welcome the decision of cancel 12th exam