मध्य रेल्वेला उशीरा शहाणपण, रविवारचं वेळापत्रक रद्द

येत्या 24 तासात मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. त्यामुळे मध्य रेल्वेने रविवारच्या वेळापत्रकाप्रमाणे लोकल चालवण्याचा निर्णय घेतला होता.

मध्य रेल्वेला उशीरा शहाणपण, रविवारचं वेळापत्रक रद्द
| Updated on: Jul 03, 2019 | 2:51 PM

मुंबई : येत्या 24 तासात मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. त्यामुळे मध्य रेल्वेने रविवारच्या वेळापत्रकाप्रमाणे लोकल चालवण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे मध्य रेल्वेच्या प्रत्येक स्टेशनवर तुफान गर्दी पाहायला मिळत होती. पण अखेरीस मध्य रेल्वेने या निर्णयात बदल केला असून रविवारचे वेळापत्रक रद्द केले आहे. तसेच आता सर्व लोकल नियमित वेळेनुसार चालवण्यात येणार असल्याचेही सांगितले. मात्र प्रवाशांचे हाल झाल्यानंतर अखेर रेल्वे प्रशासनला जाग आली आहे.

रेल्वे प्रशासनाने ट्विट करत, “मध्य रेल्वेकडून रविवारचे वेळापत्रक रद्द करण्यात आलं आहे. त्यामुळे आता सर्व लोकल नियमित वेळेनुसार धावणार असल्याचे स्पष्ट केले आहे.”

मुंबईत काल झालेल्या अतिवृष्टीमुळे मध्य रेल्वे ठप्प झाली होती. तसेच आज हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने आज (3 जुलै) सर्व लोकल रविवारच्या वेळापत्रकानुसार चालवण्यात येतील असा निर्णय घेतला होता. या निर्णयानंतर मध्य रेल्वेच्या सर्व स्टेशनवर तुफान गर्दी पाहायला मिळत होती. कल्याण, ठाणे, डोंबिवली, विक्रोळी, घाटकोपर यासह विविध स्थानकांवर लोकलही उशिरा असल्याने नागरिकांची प्रचंड गर्दी जमली होती. याचा सर्वाधिक फटका महिला प्रवाशांना बसला. घाटकोपरमध्ये प्रचंड गर्दीमुळे एका महिला बेशुद्ध पडली. तिला तात्काळ राजवाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर मुंब्रा ते कळवा स्थानकादरम्यान 3 प्रवासी पडले. यात 2 पुरुष तर एका महिलेचा समावेश आहे. नाजिमा शेख असे या महिलेचे नाव आहे.

एवढंच नाही तर काही अज्ञातांनी कांजूरमार्ग ते विक्रोळी स्थानकादरम्यान चालत्या लोकलवर दगडफेक केली. यामुळे एक तरुणी जखमी झाली असून घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केलं आहे.

मुसळधार पावसाच्या मध्य रेल्वेने बुधवारी रविवारच्या वेळापत्रकाप्रमाणे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला. पण रात्री उशिरा घेतलेला निर्णय अनेक लोकांपर्यंत पोहोचलाच नाही आणि पाऊस थांबलेला असल्याने लोकांनी ऑफिस गाठण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दी केली. मात्र तिथे गेल्यावर रविवार प्रमाणे गाड्या धावत असल्याने प्रवाशांचे हाल झाले.

ऑफिसच्या गर्दी वेळात कमी गाड्या आणि त्यातही डाऊन मार्गावरील काही गाड्या उशिराने धावत होत्या. त्यामुळे अप गाड्यांवर देखील त्याचा परिणाम झाला. त्यामुळे गाड्यांमध्ये गर्दी ही वाढतच गेली. पण अखेर उशीरा का होईना मध्य रेल्वे प्रशासनाने जाग आली आणि त्यांनी तात्काळ निर्णय रद्द केला.

यामुळे सकाळच्या वेळेत नागरिकांना त्याचा फटका बसला, तरी कामावरून परतताना तरी प्रवास चांगला होईल अशी आशा अनेकांनी व्यक्त केली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us