Ketaki Chitle : केतकी चितळे, भावे अन् बागलाणकर… दोन दिवस, तीन पोस्ट आणि टार्गेटवर पवार, जातीय विष कोण पेरतंय?

| Updated on: May 14, 2022 | 2:37 PM

Ketki Chitle : कळवा पोलीस ठाण्यात केतकीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आला असून आता गुन्हे अन्वेषण विभाग या प्रकरणी तपास करणार आहेत.

Ketaki Chitle : केतकी चितळे, भावे अन् बागलाणकर... दोन दिवस, तीन पोस्ट आणि टार्गेटवर पवार, जातीय विष कोण पेरतंय?
दोन दिवस, तीन पोस्ट आणि टार्गेटवर पवार, जातीय विष कोण पेरतंय?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitle) हिने वकील नितीन भावे (nitin bhave) यांची एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांच्यावर अत्यंत आक्षेपार्ह विधान करण्यात आलं आहे. त्यावरून केतकीवर सर्वच स्तरातून टीका होत आहे. राजकीय नेत्यांपासून ते सर्वसामान्य लोकांपर्यंत सर्वांनीच केतकीवर टीका केली आहे. राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील यांनी तर केतकीला जंगी चोप देणार असल्याची धमकीही दिली आहे. सोशल मीडियावर तर केतकीला ट्रोल केलं जात आहे. त्या आधी निखिल भामरे या तरुणानेही पवारांविरोधात अत्यंत आक्षेपार्ह ट्विट केलं होतं. त्यामुळे पवारांना टार्गेट करून जातीय विष कोण पेरतंय असा सवालही नेटकरी करत आहेत. या निमित्ताने तीन पोस्टही चर्चेत आल्या आहेत. शिवाय केतकीवर कळवा पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे केतकीच्या अडचणीत वाढ झाली आहे.

केतकीच्या पोस्टमध्ये काय?

केतकीने वकील भावेची पोस्ट शेअर केली आहे. त्यात पवारांवर अत्यंत आक्षेपार्ह विधान करण्यात आलं आहे. केतकीने शेअर केलेली पोस्ट खालील प्रमाणे…

तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll
ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक
सगळे पडले उरले सुळे l सतरा वेळा लाळ गळे ll
समर्थांचे काढतो माप l ते तर तुझ्या बापाचेही बाप ll
ब्राह्मणांचा तुला मत्सर l कोणरे तू ? तू तर मच्छर ll
भरला तुझा पापघडा l गप! नाही तर होईल राडा ll
खाऊन फुकटचं घबाड l वाकडं झालं तुझं थोबाड ll
याला ओरबाड त्याला ओरबाड l तू तर लबाडांचा लबाड ll
-Advocate Nitin Bhave

हे सुद्धा वाचा

पुणे, ठाण्यात गुन्हे दाखल

केतकीच्या या पोस्टनंतर एकच वादळ उठलं आहे. तिच्याविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. कळवा पोलीस ठाण्यात केतकीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आला असून आता गुन्हे अन्वेषण विभाग या प्रकरणी तपास करणार आहेत. केतकी कुठे आहे याचा शोध लागत नसल्यानेतिला शोधण्यासाठी गुन्हे शाखा युनिट 1 ची टीम तयार करण्यात आली आहे. पुण्यातही केतकीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे शहर राष्ट्रवादीने तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पुणे पोलिसांच्या सायबर सेलने हा गुन्हा दाखल केला आहे. केतकी चितळे आणि इतरांना अटक करण्याची मागणीही राष्ट्रवादीने केली आहे.

बागलाणकरचं ट्विट

दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर ट्विट करणाऱ्या निखिल भामरेला पोलिसांनी अटक केली आहे. नाशिकच्या दिंडोरी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. भामरे याचं ट्विट मनोज बागलाणकर याने रिट्विट केलं होतं. बागलणकर या हेडिंगखाली हे ट्विट होतं. वेळ आली आहे बारामतीच्या गांधीसाठी… बारामतीचा नथुराम गोडसे तयार करायची… असं ट्विट करण्यात आलं होतं.

जातीय द्वेष निर्माण करणारी मानसिकता

पत्रकार अलोक देशपांडे यांनी केतकीच्या पोस्टवर प्रतिक्रिया व्यक्त करणारी पोस्ट केली आहे. केतकी चितळे नामक एका अभिनेत्रीने शरद पवार यांच्या मृत्यूची इच्छा व्यक्त करणारी एक अत्यंत घाणेरडी पोस्ट तिच्या फेसबुक भिंतीवर लिहिली आहे. ही चितळे किंवा त्या पोस्ट खाली ज्या भावेचे नाव आहे, तो या लोकांना दुसऱ्यांच्या मृत्यूचे किंवा विद्ध्वंसाचे इतके आकर्षण का असते? सगळ काही उद्ध्वस्त व्हावं, माणूस मरावा, दंगली व्हाव्यात, लोकांनी एकमेकांना शिव्या घालाव्यात, दुसऱ्या जाती- धर्माच्या माणसाबद्दल सतत द्वेषपूर्ण बोलावे, माझा जो विचार तोच श्रेष्ठ आणि वेगळा विचार मांडणाऱ्या व्यक्ती जगातून नाहीश्या व्हाव्यात याची इच्छा करावी, दुसऱ्याला माझ्या आदेशावर नाचवावे, त्याचे कपडे आणि खाणे मी ठरवावे ही असलीच नीच मानसिकता या लोकांची का असते? ही चितळे किंवा भावे हा मुद्दा नाही. ही झुरळ आहेत. घाणीत तोंड घालणारी आणि त्यावर पोट भरणारी. ते ज्या विचारसरणीला समर्थन करतात तो प्रॉब्लेम आहे. ती आज या देशावर आक्रमकरित्या सत्ता गाजवत आहे. हिंसा, खून, मरण यात आनंद मानणारी ही विचारसरणी आहे. संघटीत जनमताने त्याचा कडाडून विरोध, त्या विचारसरणीचा पुरस्कार करणाऱ्या व्यक्तींना समाजात प्रतिष्ठा नाकारणे आणि राजकीय दृष्ट्या त्या विचारसरणीचा पराभव हा यावर एकमेव उपाय आहे, असं अलोक देशपांडे यांनी म्हटलं आहे. प्रसिद्ध विचारवंत हरी नरके यांनी ही पोस्ट शेअर केली आहे.

लक्षात घ्या, तुम्ही त्यांच्या मानसिकतेवर आघात करत आहात

कँसर हा भयानक आजार आहे. या आजारामुळे केवळ रूग्ण नाही तर संपूर्ण परिवार उद्ध्वस्त होतं. काही थोडेच लोकं या आजारावर मात करून बाहेर पडतात. कँसरग्रस्त रूग्णाच्या सोबत तुम्ही चार महिने काढले की तुम्हाला आयुष्य आणि वेदना काय असते हे समजून येते. जे लोक वाचले त्यांना अनेकदा विकृतींना सोबत घेऊन जगावं लागतं. यामुळे अनेकांचा आत्मविश्वासही जातो आणि अशी माणसं एक जीवंत शवासारखं जगतात. शरद पवार यांनी कँसरवर मात केलीच पण त्या सोबत आलेल्या विकृतीला ही अत्यंत सहजपणे कॅरी केलं. एकेका सर्जरीला किती वेदना होतात हे फक्त रूग्ण जाणतो, तरीही शरद पवार उभे राहिले, लढले. त्यांच्याशी तुमचा वाद असू शकतो, पण त्यांच्या आजारपण, वय, विकृती-व्यंग यावर काहीही टिप्पणी करताना एक लक्षात घ्या या आजाराशी सामना करणाऱ्या लाखों लोकांच्या मानसिकतेवर ही तुम्ही आघात करत आहात, असं पत्रकार रविंद्र आंबेकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.