Mumbai : मध्यरात्री बत्ती गुल झाली, म्हणून मध्यरात्रीच आंदोलन! चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीतील नागरिकांची रस्त्यावर उतरुन घोषणाबाजी

Chembur News : चोर है भाई चोर है, अदानी चोर है, अशा घोषणा देत वाहतूकही यावेळी आंदोलकांनी रोखून धरली होती.

Mumbai : मध्यरात्री बत्ती गुल झाली, म्हणून मध्यरात्रीच आंदोलन! चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीतील नागरिकांची रस्त्यावर उतरुन घोषणाबाजी
रातोरात आंदोलन..
Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Jul 13, 2022 | 8:05 AM

मुंबई : चेंबूरमध्ये (Chembur News) नागरिकांना रस्त्यावर उतरुन जोरदार घोषणा केली. विशेष म्हणजे रातोरात रस्त्यावर उतरलेल्या सिद्धार्थ नगरमधील नागरिकांमुळे वाहतूक खोळंबली. लांबच लांब अवजड वाहनांच्या रांगा त्यामुळे चेंबूर रस्त्यावर लागल्या होत्या. विजेचा (Adani Electricity) सातत्यानं खोळंबा होत असल्याची तक्रार सिद्धार्थ नगरमधील (Chembur Siddharth Nagar) नागरिकांकडून केली जात होती. दरम्यान, पुन्हा एकदा विजेचा मध्यरात्री खोळंबा झाल्यानं अखेर रहिवाशांनी रस्त्यावर उतरुन आपला संताप व्यक्त केला. यावेळी वाहतूकही रोखून धरण्यात आली आहे. त्यामुळे काहीसा तणाव निर्माण झाला होता. शेकडो रहिवाशांनी मध्यरात्री रस्त्यावर उतरत अदानी वीज कंपनीविरोधात जोरदार घोषणा दिल्या. पोलिसांनी आणि अदानी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना कल्पना देऊनही रात्री अवेळी वीज कापली जात असल्याचा आरोपा यावेळी आंदोलकांकडून करण्यात आला.

काय आहे प्रकरण?

रस्त्यावर उतरुन आंदोलन करणाऱ्या आंदोलकांपैकी एकानं अदानी वीज कंपनीवर गंभीर आरोप केले आहे. सातत्यानं अदानी कंपनीकडून अवेळी वीज कापली जाते, असा आरोप आंदोलकांनी केली आहे. वीज बिलं थकीत असल्याचा खोटा दावा करत वीज कापली जाते, असं आंदोलकांनी म्हटलंय. कधी मध्यरात्री एक वाजता, तर कधी मध्यरात्री तीन वाजता तर कधी पाणी येण्याच्या वेळी वीज कापली जात असल्याचा आरोप आंदोलकांनी यावेळी केला.

‘अदानी कंपनी हुकुमशाही पद्धतीन आमच्या दलित वस्तीवर अत्याचार करतेय. हे थांबलं पाहिजे, त्यासाठी आम्ही निदर्शनं केली आहे. अमानवी अत्याचार अदानी कंपनीकडून केला जातो आहे, वारंवार याबाबत तक्रार केली. पण तरिही सिद्धार्थ कॉलनीतील लाईट घालवली जाते’, असं म्हणत आंदोलकांनी संताप व्यक्त केलाय.

पाहा व्हिडीओ :

डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय, चोर है भाई चोर है, अदानी चोर है, अशा घोषणा देत वाहतूकही यावेळी आंदोलकांनी रोखून धरली होती. त्याचा फटका या मार्गावरुन जाणाऱ्या वाहनांना झाला. सुदैवानं रात्रीच्या वेळी अवजड वाहतूक या मार्गावरुन मोठ्या प्रमाणात होते. या अवजड वाहनांची लांबच लांब रांग या मार्गावर लागल्याचं पाहायला मिळालं.