Eknath Shinde | आदित्य ठाकरे यांच्या नक्कल, घणाघात आणि चॅलेंजला एकनाथ शिंदे यांचं ‘असं’ उत्तर, पाहा VIDEO

| Updated on: Apr 05, 2023 | 9:38 PM

"शिवसेना उभी करण्यात माझ्यासारखे लाखो कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं. घरादारावर तुळशी पत्रक ठेवलं. त्यामुळे सोन्याच्या चमचा घेऊन आले. त्यांच्यावर मी काय बोलणार?", असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला.

Eknath Shinde | आदित्य ठाकरे यांच्या नक्कल, घणाघात आणि चॅलेंजला एकनाथ शिंदे यांचं असं उत्तर, पाहा VIDEO
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या नेतृत्वात आज महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) ठाण्यात भव्य मोर्चा काढला. ठाण्यात दोन दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्याच्या निषेधात आज महाविकास आघाडीचा ठाण्यात मोठा मोर्चा निघाला. या मोर्चात भाषण करताना आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली. तसेच त्यांनी निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा पराभव करु, असं चॅलेंज दिलं. त्यांच्या या चॅलेंजवर आता एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आलंय.

“लोकशाहीमध्ये कोणालाही कुठेही उभा राहून निवडणूक लढवायच्या अधिकार आहे. जनता ठरवते कोणाला निवडून द्यायचं कोणाला पाडायचं. बोलणाऱ्याचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून मी शाखाप्रमुख म्हणून बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतोय. शिवसेना उभी करण्यात माझ्यासारखे लाखो कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं. घरादारावर तुळशी पत्रक ठेवलं. त्यामुळे सोन्याच्या चमचा घेऊन आले. त्यांच्यावर मी काय बोलणार?”, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला.

“अतिशय फ्रस्टेशन ठाण्यामध्ये काल पाहायला मिळालं. त्यांनी सर्व मर्यादा सोडल्या. सत्ता गेल्यानंतर काय परिस्थिती होते हे त्यांच्या बोलण्यातून जाणवत होतं. ज्यांच्या काळात दोन मंत्री जेलमध्ये गेले, गृहमंत्री जेलमध्ये गेले, पोलीसाची अब्रू गेली, त्यांची धिंड त्यांनी काढली. कोणी विरोधात बोललं त्याला जेलमध्ये टाकलं गेलं”, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला.

हे सुद्धा वाचा

“भाजप नेते नारायण राणेंना जेवणावरून उठवलं. अभिनेत्री कंगना राणावत यांचं घर तोडलं, हनुमान चालीसा बोलणार म्हणून नवनीत राणा आणि रवी राणा यांना जेलमध्ये टाकलं. ही किती गुंडगर्दी होती. ही गुंडगर्दी ते विसरलेत का? जेव्हा ते मुख्यमंत्री होते. आम्ही असं काही केलं नाही. आम्ही आमच्या मर्यादा सोडणार नाही. कारण आमच्याकडे बाळासाहेबांची शिकवण आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

“मी काल जे पाहिलं ते महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. देवेंद्र फडणवीस यांनी संयम बाळगला. ते उद्धव यांना उद्धट किंवा उद्ध्वस्त ठाकरे बोलू शकले असते पण ते बोलले नाही. ही संस्कृती आहे. हे सर्व वैफल्यग्रस्त झालेले आहेच. सत्तेच्या खुर्चीसाठी सगळा हा खेळ सुरू आहे. सहानुभूती मिळवायचा प्रयत्न आहे. महाराष्ट्राची जनता ही सगळ्यांना ओळखते. त्यांच्यापेक्षा तिखट आम्हालाही बोलता येतं. आमच्याकडे बरंच काही आहे. आम्ही योग्यवेळी सगळं बोलू”, असा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला.

“देवेंद्र फडणीस यांच्यावर बोलण्याचा त्यांना अधिकार नाही. त्यांनी कामातून त्यांचं कर्तृत्व सिद्ध करून दाखवलेलं आहे. बोलणाऱ्यांचं काय कर्तृत्व आहे? वडिलांची पुण्याई, बाळासाहेबांची पुण्याई आणि नाव सोडलं तर काय आहे तुमच्याकडे? महाराष्ट्राची जनता कामाला महत्त्व देते. आरोपांना महत्व देत नाही”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.