एखाद्याला लटकावयचं, आयुष्यातून उठवायचं असा तपास होता कामा नये; उद्धव ठाकरे यांचा विरोधकांवर निशाणा

| Updated on: Feb 28, 2021 | 7:39 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेते संजय राठोड यांच्या मंत्रिदावर भाष्य केलं आहे. संजय राठोड यांनी माझ्याकडे राजीनामा दिला आहे. (cm uddhav thackeray addressing media on sanjay rathod resign)

एखाद्याला लटकावयचं, आयुष्यातून उठवायचं असा तपास होता कामा नये; उद्धव ठाकरे यांचा विरोधकांवर निशाणा
उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री
Follow us on

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेते संजय राठोड यांच्या मंत्रिदावर भाष्य केलं आहे. संजय राठोड यांनी माझ्याकडे राजीनामा दिला आहे. पण विरोधकांनी गलिच्छ राजकारण सुरू केलं आहे. तपास हा झाला पाहिजे. तो निष्पक्षपातीच असला पाहिजे. पण एखाद्याला लटकवायचं आणि आयुष्यातून उठवायचं असा तपास होता कामा नये, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. तुम्ही म्हणाल तसा तपास होणार नाही. तुम्ही तपासाला दिशा देऊ शकत नाही आणि तपासही भरकटवू शकत नाही, असा हल्लाही त्यांनी विरोधकांवर चढवला. (cm uddhav thackeray addressing media on sanjay rathod resign)

राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनाबाबतची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. यावेली त्यांनी संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर भाष्य केलं. राठोड प्रकरणाचा तपास नीट होऊ द्या. चौकशी होऊ द्या. केवळ आदळआपट करू नका. आज तुम्ही ज्या तपास यंत्रणेवर अविश्वास दाखवत आहात तीच यंत्रणा आताही काम करत आहे, असं सांगतानाच तुमच्याही काळात चांदा ते बांदापर्यंत ज्या घटना घडल्या. त्याच पोलिसांवर तुम्ही अविश्वास दाखवत असाल तर आश्चर्यच आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

तपास यंत्रणेवर दबाव आणू नका

तपास यंत्रणेवर दबाव आणू नका. तुमच्याकडे काही पुरावे असतील तर ते तुम्ही तपास यंत्रणेकडे द्या. पण एखाद्याला लटकवायचेच आहे, त्याला आयुष्यातून उठवायचेच आहे, अशा पद्धतीने कुणालाही वागता येणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना ठणकावलं.

कुणालाही पाठीशी घालणार नाही

सरकार चालवताना आमची जबाबदारी असते की न्यायाने वागणे. प्रत्येक गोष्टीला अनेक बाजू असतात. तुम्ही म्हणत असाल की इतके दिवस का लावले? गुन्हा दाखल करुन मोकळं होणं याला न्याय म्हणत नाहीत. ज्या वेळी घटना कळली. त्यावेळीच तपासाचा निर्णय झाला. पोलिसांना तसा आदेश दिला. तपासातून सत्य बाहेर येईल तेव्हा कुणालाही पाठीशी घालणार नाही. दोषीला कठोर शिक्षा देऊ, असं मुख्यमंत्री म्हणाले.

राठोडांचा राजीनामा स्वीकारला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राठोड यांचा राजीनामा स्वीकारल्याचं सांगितलं. राजीनामा आल्यानंतर तो फ्रेम करून ठेवायचा नसतो. त्यामुळे तो स्वीकारण्यात आला आहे, असंही त्यांनी सांगितलं.

अहवाल आल्यानंतरच निर्णय

विरोधी पक्षनेते हे पूर्वी मुख्यमंत्री होते. त्यामुळे गुन्हा कधी दाखल करतात हे त्यांनाही माहीत आहे. आधी तपासाचा प्राथमिक अहवाल येऊ द्या. अहवाल आल्यानंतर त्यात काही असेल तर त्यानुसार पुढील निर्णय घेतला जाईल, असंही त्यांनी सांगितलं. (cm uddhav thackeray addressing media on sanjay rathod resign)

 

संबंधित बातम्या:

‘राजीनामा तुमच्याकडेच ठेवा, राज्यपालांकडे पाठवू नका’, राठोडांचं अजुनही मुख्यमंत्र्यांवर दबावतंत्र

…म्हणून मी मंत्रिपद सोडलं, संजय राठोड यांची राजीनाम्यानंतर पहिली प्रतिक्रिया

इंधन दरवाढीचा अनोखा निषेध; काँग्रेसचे मंत्री, आमदार सायकलवरून सोमवारी विधानभवनात येणार

(cm uddhav thackeray addressing media on sanjay rathod resign)