ही खुर्ची तुमचीच, प्रोटोकॉल बाजूला ठेवून मुख्यमंत्र्यांकडून तहसीलदाराला खुर्ची!

| Updated on: Jan 20, 2020 | 11:49 AM

मुख्यमंत्र्यांनी सर्व प्रोटोकॉल बाजूला ठेवून एका तालुका तहसीलदाराला खुर्चीत बसविले आणि स्वत: मात्र उभे राहीले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा हा विनम्रपणा सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.

ही खुर्ची तुमचीच, प्रोटोकॉल बाजूला ठेवून मुख्यमंत्र्यांकडून तहसीलदाराला खुर्ची!
Follow us on

सांगली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 17 जानेवारी रोजी सांगली दौऱ्यावर होते. इस्लामपूरच्या तहसीलदार कार्यालयाच्या नव्या इमारतीचे उद्धव ठाकरे यांच्याहस्ते उद्घाटन झाले. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित प्रशासकीय अधिकारी आणि सांगलीकरांना उद्धव ठाकरे यांच्या विनम्रतेचे दर्शन झाले. मुख्यमंत्र्यांनी सर्व प्रोटोकॉल बाजूला ठेवून एका तालुका तहसीलदाराला खुर्चीत बसविले आणि स्वत: मात्र उभे राहिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा हा विनम्रपणा सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.

इस्लामपूरच्या नव्या तहसीलदार कार्यालयाकडे जात असतानाच मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते की, नव्या तहसीलदारांना त्यांच्या खुर्चीवर बसवूनच नव्या कार्यालयाचे उद्घाटन करणार. मुख्यमंत्री तहसीलदार कक्षात आल्यानंतर सर्वांनी आग्रह केली की, उद्घाटक म्हणून त्यांनी तहसीलदार कक्षातील खुर्चीवर बसावे आणि खुर्चीचा बहुमान वाढवावा. मुख्यमंत्र्यांनी सर्वांच्या विनंतीला मान दिला आणि ते या खुर्चीवर बसले.

खुर्चीवर बसल्यानंतर काही क्षणांनी मुख्यमंत्री उठले आणि त्यांनी वाळवाचे तहसीलदार रवींद्र सबणीस यांना आग्रह करत प्रेमळ शब्दात खुर्चीवर बसण्याची सूचनावजा आदेश दिले. तहसीलदारांना खुर्चीवर बसवून ते स्वत: खुर्चीच्या बाजूला उभे राहीले आणि त्यांनी तहसीलदार रवींद्र सबणीस यांच्यासोबत फोटो काढला. मुख्यमंत्र्यांच्या या वागणुकीनंतर तहसीलदार रवींद्र सबणीस भावूक झाले. “हा माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे”, असे रवींद्र सबणीस म्हणाले.

सरकारी यंत्रणेत प्रोटोकॉलचा प्रचंड बागुलबुवा केला जातो. वरिष्ठ अधिकारी किंवा मंत्री दौऱ्यावर आल्यावर त्यांच्या निवासाची आणि इतर व्यवस्था पुरवण्यात तहसीलदार व्यस्त असतात. तहसीलदारांना वेळप्रसंगी मंत्र्यांना बसण्यासाठी आपली खुर्चीदेखील द्यावी लागते. हा प्रोटोकॉल पाळताना बिचारा अधिकारी घायकुतीला येतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याच गोष्टीची जाणीव असल्याचे त्यांच्या सांगली दौऱ्यादरम्यान निदर्शनास आले.