वर्षा बंगल्यावर मध्यरात्रीपर्यंत गुप्त खलबतं; परमबीर सिंह, गृहमंत्र्यांशी उद्धव ठाकरेंची 4 तास चर्चा

| Updated on: Mar 17, 2021 | 7:47 AM

अंबानी स्फोटक प्रकरणात 'एनआयए'कडून सुरु असणारा तपास आता निर्णायक वळणावर पोहोचला आहे. | NIA sachin vaze

वर्षा बंगल्यावर मध्यरात्रीपर्यंत गुप्त खलबतं; परमबीर सिंह, गृहमंत्र्यांशी उद्धव ठाकरेंची 4 तास चर्चा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us on

मुंबई: अंबानी स्फोटक प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (NIA) सचिन वाझे यांच्या सुरु असलेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर वर्षा बंगल्यावर मंगळवारी रात्री उशीरापर्यंत गुप्त खलबते सुरु होती. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह पोलीस महासंचालक हेमंत नगराळे, पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि गृहमंत्री अनिल देशमुख उपस्थित होते. (Important meet on Varsha Bunglow about sachin vaze case)

या बैठकीत सचिन वाझे प्रकरणावर दीर्घकाळ चर्चा झाली. मंगळवारी रात्री साधारण आठ वाजता ही बैठक सुरु झाली. मध्यरात्री 12 च्या सुमारास ही बैठक आटोपून मंत्री आणि पोलीस अधिकारी वर्षा बंगल्यावरुन परतले. त्यामुळे आता या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

अंबानी स्फोटक प्रकरणात ‘एनआयए’कडून सुरु असणारा तपास आता निर्णायक वळणावर पोहोचला आहे. या सगळ्या कटाची सूत्रे मुंबई पोलीस दलातील एका IPS अधिकाऱ्याने हलवल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यामुळे आता ‘एनआयए’कडून या वरिष्ठ अधिकाऱ्याची चौकशी होण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी ‘एनआयए’ने गृहमंत्रालयाकडे परवानगी मागितल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे.

ठाकरे सरकार सावध; वर्षा बंगल्यावर शरद पवार-मुख्यमंत्र्यांची भेट

दोन दिवसांपूर्वीच वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट झाली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या या बैठकीत शरद पवार यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरुन परमबीर सिंह यांना दूर करण्याचा आग्रह धरल्याचे समजते. मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात परमबीर सिंह यांनी सचिन वाझे यांना पाठिशी घातल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. याचा मोठा फटका सरकारच्या प्रतिमेला बसत आहे. त्यामुळे परमबीर सिंह यांचा राजीनामा घेतला जावा, असा राष्ट्रवादी काँग्रेसचा आग्रह आहे.

आघाडीत मतभेद नाही

शरद पवार यांनी बुधवारी दिल्लीतील पत्रकारपरिषदेत सचिन वाझे प्रकरणावर भाष्य केले. सचिन वाझेंची शिवसेनेकडून करण्यात येत असलेली पाठराखण आणि हे संपूर्ण प्रकरण हाताळण्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांना आलेलं अपयश यामुळे आघाडी सरकारमध्ये मतभेद आहेत का? असा सवाल पवारांना करण्यात आला. त्यावेळी महाविकास आघाडीत काहीही मतभेद नाहीत. आम्ही सर्व मिळून काम करत आहोत. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात सर्वजण काम करत आहेत. काही गोष्टी इकडच्या तिकडच्या होतात. त्यातून आम्ही मार्ग काढतो, असं पवार म्हणाले.

संबंधित बातम्या:

मुंबई पोलीस दलातील ‘त्या’ बड्या अधिकाऱ्याची चौकशी होणार; परवानगीसाठी NIA ची गृहमंत्रालयाला विचारणा?

सचिन वाझे तपासात सहकार्य करत नाहीत, मोबाईल घरी ठेवून आले, कुटुंबीयही गायब

अंबानींच्या घराबाहेर आरामात सँडविच खाणाऱ्या वाझेंवर एटीएसचा अधिकारी भडकला

(Important meet on Varsha Bunglow about sachin vaze case)