आधी राज्यपालांची भेट, नंतर राजभवनावरच आंदोलन, महाराष्ट्रातील काँग्रेस नेते आक्रमक, नेमकं प्रकरण काय?

| Updated on: Oct 31, 2022 | 10:48 PM

काँग्रेस नेत्यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत त्यांना निवेदन दिलं. त्यानंतर राजभवनातच आंदोलन केलं.

आधी राज्यपालांची भेट, नंतर राजभवनावरच आंदोलन, महाराष्ट्रातील काँग्रेस नेते आक्रमक, नेमकं प्रकरण काय?
Follow us on

मुंबई : महाराष्ट्रातील मोठमोठे प्रस्तावित उद्योग प्रकल्प गुजरातला स्थलांतरीत झाल्याने विरोधकांकडून राज्याच्या शिंदे-भाजप सरकारवर निशाणा साधला जातोय. भाजपकडून या आरोपांवर प्रत्युत्तर देण्यात येत असलं तरी विरोधक चांगलेच आक्रमक झालेले बघायला मिळत आहेत. महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला जाण्यावरुन शिवसेना आणि भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडताना दिसत आहेत. विशेष म्हणजे या लढाईत आता काँग्रेसही तितक्याच ताकदीने उतरली आहे. महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला गेले म्हणून काँग्रेस नेत्यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत त्यांना निवेदन दिलं. या निवदेनात त्यांनी राज्यपालांना शिंदे-भाजप सरकार बरखास्त करण्याची मागणी केली. त्यानंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राजभवन परिसरातच राज्य सरकार विरोधात आंदोलन केलं.

यावेळी काँग्रेस नेत्यांनी राजभवनाबाहेर फलक घेऊन शिंदे-भाजप सरकारवर टीका केली. उद्योगाप्रमाणे शिंदे-फडणवीसांना सुद्धा गुजरातला घेऊन जा. महाराष्ट्र सुखी होईल, अशा आशयाचे फलक त्यांनी आपल्या हाती धरले होते.

“हे सरकार गुजरातधार्जीन आहे. म्हणून उद्योगधंदेच काय शिंदे-फडणवीस तुम्ही पण गुजरातला चालले जा. राज्यपाल महोदयांनी तात्काळ हे सरकार बरखास्त करावं, अशी मागणी आम्ही निवेदनाच्या माध्यमातून केली आहे”, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

“ईडीचं सरकार महाराष्ट्रात आल्यापासून राज्यातील उद्योग मोठ्या प्रमाणात गुजरातला चालले आहेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादमध्ये जाहीरपणे सांगितलं की, आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्तक आहोत. त्याचदिवशी जनतेचा धडधडीत अपमान करण्याचं काम महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केलं. ते महाराष्ट्राच्या जनतेचे हस्तक आहेत. त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेचं रक्षण करायला हवं. पण त्यांनी जाहीरपणे सांगितलं की मोदी-शाहचे हस्तक आहोत”, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

“हे सरकार शेतकरी विरोधी आहे, तरुणांच्या विरोधात आणि गरिबांच्या विरोधात आहेत. राज्यपालांनी हे सरकार तात्काळ बरखास्त करावं”, अशी मागणी नाना पटोले यांनी केली.