ठाकरे गटाच्या दोन्ही बुलंद तोफा वादाच्या भोवऱ्यात, नेमकं कारण काय…?

| Updated on: Dec 19, 2022 | 10:03 PM

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, सुधांशू त्रिवेदी, अब्दुल सत्तार, मंगलप्रभात लोढा, चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड यांनी केलेली विधानांवरुन त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती.

ठाकरे गटाच्या दोन्ही बुलंद तोफा वादाच्या भोवऱ्यात, नेमकं कारण काय...?
Follow us on

मुंबईः जुनी विधानं आणि चुकीचा व्हिडीओ या दोन कारणांमुळे ठाकरे गटाकडील दोन्ही बुलंद तोफा आता वादात सापडल्या आहेत.
तुम्ही रेड्यांना शिकवलत रे पण माणसांना शिकू दिलं नाही. असं वक्तव्य सुषमा अंधारे यांनी केलं होतं. त्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले. तर मराठा क्रांती मोर्चाच्या व्हिडीओमुळे संजय राऊतही वादात अडकले. त्यामुळेच ठाकरे गटाच्या दोन्ही तोफा सध्या वादात अडकल्या आहेत.

जुन्या विधानांवरुन सुषमा अंधारेंना क्षमा मागावी लागली तर मराठा मोर्चाच्या व्हिडीओवरुन संजय राऊत यांची गोची झाली आहे. सुषमा अंधारे यांनी संत मंडळींवर केलेल्या जुन्या विधानांवरुन सर्वात आधी भाजप, त्यानंतर वारकऱ्यांचा एक गट आणि नंतर महानुभवपंथ आक्रमक झाला होता.

तर संजय राऊत यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओवरुन भाजप, त्यानंतर मराठा मोर्चा आणि छत्रपती संभाजीराजेंनीही त्यांच्यावर निशाणा साधला.मागच्या महिन्याभरापासून नेत्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे विरोधकांनी सरकारला घेरलं होतं.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, सुधांशू त्रिवेदी, अब्दुल सत्तार, मंगलप्रभात लोढा, चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड यांनी केलेली विधानांवरुन त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती.

पण मागच्या 5 दिवसात संजय राऊतही वेगवेगळ्या मुद्द्यांमुळे टीकेचे धनी बनले आहेत. त्यामध्ये पहिला मुद्दा होता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थानाचा तर दुसरा मुद्दा होता किरीट सोमय्यांना आयएनस विराटमध्ये मिळालेली क्लिनचीट.

तिसरा मुद्दा दाव्याप्रमाणे किरीट सोमय्यांनाच राऊतांच्याच व्याह्यानं शौचालय घोटाळ्यात दिलेली क्लिनचीट आणि चौथा मुद्दा म्हणजे महाविकास आघाडीच्या मोर्चानंतर दुसऱ्या दिवशी मराठा मोर्चाचा व्हिडीओ पोस्ट करणं या सगळ्या गोष्टींमुळे आता राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे.

नव्या सरकारवर रोज टीका करणारे संजय राऊत सत्तास्थापनेनंतर तुरुंगात गेले तर त्याच काळात सुषमा अंधारे यांनी महाप्रबोधन यात्रेतून सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. मात्र सध्या हे दोन्ही जणं आपलीच विधानं आणि ट्विट केलेल्या व्हिडीओमुळे आता सरकारच्या रडारवर आहेत.