
विधानसभेच्या निवडणुका होऊन सात-आठ महिने झाले आहेत. त्यानंतर या निवडणूक निकालांवर चर्चा सुरु असते. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मतांची हेराफेरी झाल्याचा आरोप केला होता. आता शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभेतील पराभवावर मत व्यक्त केले आहे. ‘सामना’ दैनिकात दिलेल्या मुलाखतीत त्यांनी महाविकास आघाडीतील मतभेदांवर निवडणुकीतील पराभवाचे खापर फोडले आहे. शिवसेना उबाठा नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे.
लोकसभेत विजय आणि विधानसभेत पराभव झाल्याबद्दल संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारला. त्यावर उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, ईव्हीएमच्या घोटाळ्याची चर्चा सुरू आहे. मतदार याद्यांवर त्याच्याबद्दलही चर्चा आहे. बोगस मतदार, मतदार कसे वाढले हे लोकांसमोर आले आहे.
आघाडीतील मतभेदांवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, मतदारसंघ छोटा होतो तसतशी स्पर्धा वाढते. आघाडीत दोन तीन पक्ष एकत्र आल्यावर खेचाखेची सुरू होते. युतीतही होत होती. आम्ही महाविकास आघाडी म्हणून लोकसभेची पहिली निवडणूक लढवली. त्यावेळीही शिवसेनेने जिंकलेले मतदारसंघ सोडले. विधानसभेत शेवटपर्यंत खेचाखेची सुरू होती. त्याचा दुष्परिणाम असा झाला की जनतेला वाटले यांच्यात आताच खेचाखेची आहे तर नंतर काय.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील फरक सांगताना उद्धव ठाकरे म्हणाले, लोकसभेत माझ्याकडे उमेदवार होते, जागा होती, पण निशाणी नव्हती. विधानसभेत निशाणी होती, पण जागा नव्हत्या. जागा कोणत्या हा प्रश्न होता. जागा मिळाल्या तर उमेदवारी कुणाला देणार हे निश्चित नव्हते. तू तू मै मै झाली ती स्वीकारली पाहिजे. आपल्याकडून झालेली ही सर्वात मोठी चूक होती. ही चूक परत करायची असेल तर एकत्र येण्याला काही अर्थ राहत नाही.
समन्वयाचा अभाव म्हणण्यापेक्षा लोकसभेचे यश सर्वांच्या डोक्यात गेले, असे सांगत उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, लोकसभेत महाविकास आघाडीत नेत्यापासून कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांमध्ये आपल्याला जिंकायचे आहे, हा आपलेपणा होता. विधानसभेत नाही नाही मला जिंकायचे आहे. हा आपल्यातून मी पणा आला तेव्हा पराभव झाला. त्याचबरोबर ज्या तांत्रिक बाबी होत्या, त्यांनी योजना जाहीर केल्या. शेतकऱ्यांची कर्ज मुक्तीची घोषणा, असे ठाकरे यांनी सांगितले.