संसार उघड्यावर, जनजीवन विस्कळीत, शेती उद्ध्वस्त, पूरग्रस्तांसाठी अजित पवार अ‍ॅक्शन मोडवर

अजित पवार यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 11 महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. पूरग्रस्तांपर्यंत तातडीने मदत पोहोचावी या हेतून अजित पवारांनी या सूचना दिल्या आहेत. अजित पवार यांनी याबाबत आज विधान परिषदेत माहिती दिली.

संसार उघड्यावर, जनजीवन विस्कळीत, शेती उद्ध्वस्त, पूरग्रस्तांसाठी अजित पवार अ‍ॅक्शन मोडवर
ajit pawar
Image Credit source: tv9 marathi
Chetan Patil | Updated on: Jul 24, 2023 | 5:26 PM

मुंबई | 24 जुलै 2023 : महाराष्ट्रात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमधील शेतकरी हवालदिल झाले आहेत. कारण शेतीचं प्रचंड नुकसान झालंय. अनेकांच्या घरादारामध्ये पाणी शिरल्याने अनेक कुटुंबांचे संसार रस्त्यावर आले आहेत. अशा परिस्थितीत त्यांना मदतीची प्रचंड गरज आहे. याच गोष्टीचं गांभीर्य लक्षात ठेवून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला 11 महत्त्वाच्या सूचना याआधीच दिल्या आहेत. पूरग्रस्तांना तातडीने मदत पोहोचावी यासाठी त्यांनी या सूचना दिल्या. यावेळी अजित पवार यांनी अतिवृष्टीमुळे गेल्या चार दिवसांत राज्यातील कोणकोणत्या जिल्हे आणि तालुक्यात नुकसान झालं, प्रशासनाकडून कशी मदत करण्यात आली, याविषयी देखील माहिती दिली.

विशेष म्हणजे अजित पवार यांनी विधान परिषदेत याबाबत माहिती दिली तेव्हा तीन मोठ्या घोषणा केल्या. पूरग्रस्तांना तातडीची 10 हजार रुपयांची मदत, दुकानांचं नुकसान झाल्यास 50 हजारांची मदत आणि पुरात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना 4 लाखांची मदत दिली जाईल, अशा तीन मोठ्या घोषणा अजित पवार यांनी यावेळी केल्या. यावेळी अजित पवार यांनी प्रशासनाला नेमक्या काय-काय सूचना दिल्या याविषयी त्यांनी स्वत: सविस्तर माहिती दिली.

अजित पवार यांच्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रशासनाला 11 महत्त्वाचे निर्देश

  • धोकादायक परिस्थिती असलेल्या भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात यावे. पुरस्थितीमूळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटूंबियांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत तातडीने द्यावी.
  • शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरु करावेत.
  • ज्या ठिकाणी शेतजमिनी खरडून गेल्या असतील त्या ठिकाणी देखिल पंचनामे त्वरित सुरु करावेत.
  • बाधित व्यक्तींना स्वस्त धान्य दुकानातून धान्याचे वाटप तातडीने, त्याच दिवशी होईल याकरीता प्रशासनाने स्वस्त धान्य दुकानांना पुरेसा धान्याचा पुरवठा करावा.
  • ज्यांच्या घरात पुराचे पाणी शिरले होते त्यांना सध्याच्या दराने पाच हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची कार्यवाही तातडीने सुरु करावी.
  • रोगराई पसरु नये याकरीता स्वच्छता करणे, औषध फवारणी करणे यासारख्या प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात.
  • ज्या ठिकाणी पाणी दुषित झाले आहे, त्याठिकाणी स्वच्छ पाणीपुरवठा होण्यासाठी आवश्यकतेनुसार विहिरी अधिग्रहित कराव्यात.
  • गरज असेल त्या ठिकाणी टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात यावा.
  • ज्या ठिकाणी अतिवृष्टीमुळे रस्त्यांची हानी झाल्याने गावांचा संपर्क तुटलेला आहे, अशा रस्त्यांची बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्ती करावी.
  • पुरामुळे ज्या शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य खराब झाले आहे त्यांना शिक्षण विभागाने शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन द्यावे.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us