सर्वात मोठी बातमी! अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीला बेड्या

| Updated on: Mar 16, 2023 | 6:28 PM

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेलिंग आणि फसवणुकीचा प्रयत्न करणाऱ्या एका डिझायनर तरुणीला मुंबईच्या मलबार हिल पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी मोठी नावं समोर येण्याची शक्यता आहे.

सर्वात मोठी बातमी! अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीला बेड्या
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्या फसवणुकीप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी अनिक्षा जयसिंघानीयाला अटक केली आहे. मलबार हिल पोलिसांकडून अनिक्षाला अटक करण्यात आली. मलबार हिल पोलिसांनी अनिक्षाला तिच्या उल्हासनगर येथील घरुन अटक केली आहे. अमृता फडणवीस यांनी याप्रकरणी तक्रार केल्यानंतर एफआयआर दाखल करण्यात आलेला. त्यानंतर पोलिसांनी अनिक्षाला उल्हासनगर येथून ताब्यात घेतलेलं. या तरुणीला सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात आणून अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तिला उद्या कोर्टात हजर केलं जाऊ शकतं.

संबंधित प्रकरणात काही नेते आणि बडे अधिकारी यांचा समावेश असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. त्यामुळे या प्रकरणात नेमके काय-काय खुलासे होतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. “पैशांनी भरलेली बॅग माझ्या घरात काम करणाऱ्या महिलेला दिली. याचा व्हिडीओ तयार करुन ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला”, अशी धक्कादायक माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. हा एक राजकीय कट आहे का ते मी पुरावे सिद्ध झाल्याशिवाय बोलणार नाही. जोपर्यंत पुरावा हाती येत नाही तोपर्यंत बोलणार नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांचे नेमके काय-काय आरोप?

“मी विधानसभेत निवेदन दिलं आहे. माझी पत्नी अमृता फडणवीस यांनी एक एफआयआर दाखल केलं आहे ज्यामध्ये त्यांच्यामाध्यमातून भ्रष्टाचार आणि ब्लॅकमेल करुन दबाव तयार करुन आपले केसेस मागे घ्यायचे, भ्रष्टाचार करायचे प्रयत्न केले गेले. या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली आहे”, अशी देखील माहिती फडणवीसांनी दिली.

हे सुद्धा वाचा

“अनिल जयसिंघानी हे एक बुकी आहेत जे गेल्या चार ते पाच वर्षांपासून अॅबस्कॉन्डिंग आहेत. देशातील विभिन्न राज्यांमध्ये त्यांच्याविरोधात 14 केसेस दाखल आहेत. त्यांची मुलगी अनिक्षा जयसिंघानी जी सुशिक्षित आहे, त्यांनी आधी 2015-16 मध्ये माझ्या पत्नीसोबत संपर्क केलेला. त्यानंतर कोणताही संपर्क केला नाही”, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.

अनिक्षा अमृता फडणवीसांच्या संपर्कात कशी आली?

“महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर अनिक्षा 2021 मध्ये पुन्हा माझ्या पत्नीच्या संपर्कात आली. त्यावेळी त्यांनी सांगितलं की, मी ड्रेस डिझायनर आहे, तुम्ही माझे ड्रेस वापरुन बघा. मी आर्टिफिशअल ज्वेलरीचं काम करते. त्यांनी हळूहळू माझ्या पत्नीचा विश्वास संपादीत करण्याचा प्रयत्न केला. माझ्या आईचं निधन झालंय. तिच्यावर पुस्तक लिहिलंय. त्या पुस्तकाचं तुम्ही विश्लेषण करा, मी 50 प्रमुख महिलांमध्ये आली, माझं स्वागत करा, अशा अनेक गोष्टी सांगून ती खूप जवळ आली आणि एकदा तिने सांगण्याची गोष्ट केली की, माझे वडील पोलिसांना माहिती देत होते. बुकींना पकडून द्यायचे. त्याबदल्यात पैसे मिळायचे. तुम्ही मला या कामात मदत करा, असं तिने पत्नीला सांगितलं”, अशी माहिती फडणवीसांनी दिली.

“माझ्या पत्नीने तिला स्पष्ट नकार दिला. तेव्हा तिने सांगितलं की, माझ्या पित्याला चुकीच्या गुन्ह्यांतर्गत फसवलं गेलंय. तेव्हा माध्या पत्नींनी उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यास सांगितलं. आम्हाला ती चुकीचं काम करत असल्याचं लक्षात आलं. दरम्यान ती बोलून गेली की, मी माझ्या पित्याला सोडवण्यासाठी एक कोटी रुपये देऊ. त्यानंतर माझ्या पत्नीने तिला मोबाईलवर ब्लॉक केलं. त्यानंतर तिने दुसऱ्या फोननंबरवरुन काही मेसेज आणि व्हिडीओ समोर आले”, असं फडणवीसांनी सांगितलं.

“त्यामध्ये अनिल सिंघानीया यांनी काही मागण्या केल्या होत्या. नाहीतर संबंधित व्हिडीओ आम्ही सार्वजनिक करु अशी धमकी दिली होती. त्या व्हिडीओमध्ये नेमकं काय होतं तर ती माझ्या पत्नीला अंगठी घालत आहे, हार घालत आहे. हे सगळं ठिक आहे. पण दोन व्हिडीओ असे तयार केले आहेत की एका व्हिडीओत ती बाहेर कुठेतरी एका बॅगेत पैसे भरत आहे आणि तशाचप्रकारची बॅग ती माझ्या घरात काम करणाऱ्या महिलेला देत आहे. त्यानंतर तिने सांगितलं की मी पैसे दिले. हे सगळे व्हिडीओ आल्यानंतर आम्ही एफआयआर दाखल केले आणि फॉरेन्ससाठी तपासासाठी पाठवलं. त्याचे रिपोर्ट समोर आले. आम्ही अनिल सिंघानीया यांना अँगेज करत होतो. त्यातून काही नेते आणि अधिकाऱ्यांचं नाव समोर आले आहेत”, अशी माहिती त्यांनी दिली.

‘अतिशय खालच्या दर्जाचं राजकारण’

“याची सुरुवात मविआ सरकार काळात आपले केस मागे घेण्यासाठी करण्यात आली होती. पण ब्लॅकमेल केल्यानंतर आपण केसेस मागे घेऊ शकतो, अशी माहिती समोर आली. संबंधित व्यक्ती वीपीएनहून बात करायचा. संबंधित व्यक्तीवर कारवाई झालीय. पण तो अजून सापडलेला नाही. त्याचा शोध सुरु आहे. अतिशय खालच्या दर्जाचं राजकारण आहे. मी कुणावरही आरोप करणार नाही. कारण पुरावे मिळालेली नाहीत. संबंधित व्यक्तीने अशा लोकांची नावे घेतली आहेत, पण ते कितपत सत्य आहे याची शाहनिशा केली जाईल. मी चौकशी केली तेव्हा मविआ सरकार काळात या व्यक्ती विरोधातील केसेस मागे घेण्यासाठी कार्यवाही सुरु झाल्याची माहिती समोर आली. यामध्ये मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांचं देखील नाव समोर आलं आहे”, असा दावा त्यांनी केला.