डोंबिवली (ठाणे) : साईबाबांनी पाण्याने पणती प्रज्वलित केल्याची अख्यायिका शिर्डीत आणि सगळीकडेच सांगण्यात येते. अनेकदा ही अख्यायिका साईबाबांवरील सिनेमांमधूनही तुम्ही पाहिली असाल. मात्र, डोंबिवलीत साईंची पाण्याने पणती पेटवण्याची अख्यायिका प्रत्यक्षात आली आहे. मात्र, डोंबिवलीतल्या या प्रयोगाला विज्ञानाची साथ मिळाली आहे.
डोंबिवलीतील सुनील नगर येथे राहाणाऱ्या प्रतिक तिरोडकार या विद्यार्थ्याने पाण्याने पणती पेटवण्याचा ‘चमत्कार’ केला आहे. अर्थात, त्याच्या या चमत्काराला विज्ञान आणि तंत्रज्ञानाची साथ आहे. इलेक्ट्रिक असलेली ही पणती, पाण्याच्या सहाय्याने चालू राहते. मात्र पाणी काढताच पणती विझते.
इंजिनिअर असलेल्या प्रतिकने आतापर्यंत 300 पणत्या तयार केल्या असून, या पणत्यांना मागणीही मोठ्या प्रमाणात आहे. विशेष म्हणजे, या पणतीसाठी जो बोर्ड तयार करण्यात आला आहे, तो प्रतिकने स्वतः तयार केला आहे. ही पणती तयार करण्यासाठी 20 मिनिटांचा कालावधी लागत असून, एका पणतीची किंमत 50 रुपये इतकी आहे.
विज्ञान आणि तंत्रज्ञानाची किमया असलेली पणती प्रतिकने त्याच्या कल्पकतेने तयार केली आहे. त्यामुळे साईबाबांची जी अख्यायिका आपण आतापर्यंत ऐकत आलो, त्या डोंबिवलीच्या प्रतिकने सत्यात उतरवलं आहे.