‘राज ठाकरे यांच्या भेटीमागे आमचा वैयक्तिक स्वार्थ नव्हता, तरीही आम्हाला त्रास, अखेर बाळासाहेब म्हणाले…’

| Updated on: Jan 23, 2023 | 9:55 PM

मनसे पक्ष निर्माण झाल्यानंतर एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट एकनाथ शिंदे यांनी घेतली होती. या भेटीवरुन आपल्याला त्रास झाला होता. पण त्यावेळी बाळासाहेबांनी आपली पाठराखण केली होती, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

राज ठाकरे यांच्या भेटीमागे आमचा वैयक्तिक स्वार्थ नव्हता, तरीही आम्हाला त्रास, अखेर बाळासाहेब म्हणाले...
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

मुंबई : महाराष्ट्राचे दिवंगत ज्येष्ठ नेते आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंती निमित्ताने आज विधान भवनात विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. बाळासाहेबांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या तैलचित्राचं अनावरण आज करण्यात आलं. यावेळी भाषण करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचे अनेक किस्से सांगत बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. मनसे पक्ष निर्माण झाल्यानंतर एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट एकनाथ शिंदे यांनी घेतली होती. या भेटीवरुन आपल्याला त्रास झाला होता. पण त्यावेळी बाळासाहेबांनी आपली पाठराखण केली होती, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

मुख्यमंत्र्यांनी नेमका काय किस्सा सांगितला?

“मी आणि रामदास कदम एकत्र गेलो बाळासाहेब ठाकरे यांच्या घरी गेलो होतो. त्यावेळी त्यांनी टेप रेकॉर्डर आणलं होतं. ते म्हणाले की, बोला. मी म्हटलं की आता विधान परिषदेची निवडणूक आहे. त्यासाठी आपल्याला मतांची गोळाबेरीज करावी लागेल. ते म्हणाले, हा मग? करा की सगळ्यांनी मिळून”

“मी म्हटलं, तुम्ही एकदा सिग्नल दिला की करता येईल. ते म्हणाले, कशाचं सिग्नन? तुम्ही तुमचा उमेदवार ठरवून आले आहात का? मी म्हटलं नाही. कोण बोलणार तिकडे की उमेदवार ठरवून आलो आहोत असं. रामदास भाईंना काय-काय बोलले. सगळ्यांना काय बोलायचं ते बोलले”

“मी म्हणालो, राज साहेबांनाही आपल्याला सांगायला लागेल. ते म्हणाले, अरे तुझी आणि त्यांची चांगली ओळक आहे ना? तू महापौर निवडणुकीसाठी त्यांच्या घरी जाणार गेला होतास ना?”

“म्हणजे त्यांना सगळं माहिती असतं. आपण जाण्याआधी त्यांनी सगळी माहिती गोळा केलेली असायची. ते दिलदारपणे बोलायचे. ओरडायचे, पण तेवढं प्रेमही करायचे”

“मी राज साहेबांकडे गेलो होतो कारण ठाण्याचं महापौरपद आमचं गेलं असतं. भगवा उतरला असता म्हणून आम्ही गेलो होतो. पण आमचा काही वैयक्तिक स्वार्थ नव्हता. तेव्हा आम्हाला खूप त्रास सहन करावा लागला. शेवटी बाळासाहेबांनी सांगितलं, या पोराने जे केलंय ते भगवा उतरु नये म्हणून केलेलं आहे”

एकनाथ शिंदे आणखी काय-काय म्हणाले?

आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने आज अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण आहे

सगळ्यांची भाषणं झाली आहेत.  सगळ्यांनी चौकार, षटकार लावले आहेत. माझी पंचायत झाली आहे

आजचा दिवस आपल्या सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाचा आहे.

खरं म्हणजे बाळासाहेबांवर प्रेम करणाऱ्या, त्यांच्या विचारांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकसाठी हा कार्यक्रम अनमोल आहे. त्याचं मोल करता येणार नाही. म्हणून मी सुरुवातीलाच बाळासाहेबांना विनम्र अभिवादन करतो.

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे आभार मानतो आणि अभिवादन करतो. त्यांनी बाळासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी हा कार्यक्रम आयोजित केला

शिवसेनाप्रमुखांमुळे माझ्यासारखे असंख्य शिवसैनिक विधानसभा, लोकसभा पर्यंत पोहोचू शकले.

खरं म्हणजे ज्यांना पाहत, ज्यांच्या विचारांनी माझ्यासारखे कार्यकर्ते प्रभावित झाले, त्यांचा प्रभाव, त्यांचे भाषण पाहत, त्यांनी दिलेले आदेश पाळत आम्ही इथपर्यंत पोहोचलो आणि बाळासाहेबांच्या विचारांचं सरकारदेखील आपण स्थापन केलं. मी मुख्यमंत्री असताना आज विधान भवनाच्या सर्वोच्च सभागृहात बाळासाहेबांचं तैलचित्र लावलं जात आहे. हा माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचा क्षण आहे. दुर्मिळ योग आहे. म्हणून मी बाळासाहेबांना पुन्हा एकदा वंदन करतो.

लोकांनी लोकांसाठी चालवलेलं सरकार म्हणजे लोकशाही. बाळासाहेबांनी प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी केली

एकेकाळी महाराष्ट्रात ठराविक घराण्यांची सत्ता होती. पण बाळासाहेबांनी सर्वसामान्यांना इथपर्यंत पोहोचवण्यातं काम केलं. असे अनेक कार्यकर्ते समोर बसले आहेत. बाळासाहेबांच्या परिस्पर्शाने हे सोन्याचे दिवस आले आहेत. नाहीतर एका शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री कसा होऊ शकला असता? ही जादू केवळ बाळासाहेबांचीच.

बाळासाहेबांच्या विचारांनी स्फुर्ती मिळते. अन्यायाविरुद्धल लढा ही बाळासाहेबांची शिकवण. म्हणून त्यांच्याबद्दल बोलताना आज अतिशय कंठ दाटून येतो. त्यांच्या शुभेच्छा, योगदान पाठिशी असताना इथपर्यंत सगळं घडलं आहे

बाळासाहेबांचं म्हणणं होतं की, शब्द दिला की फिरवायचा नाही. तेच आम्ही त्यांच्याकडून शिकलो. त्यांच्यामुळे धाडस करायचो शिकलो. त्यामुळे या महाराष्ट्रात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या.

बाळासाहेब आमचे कुटुंबप्रमुख होते. गुरुस्थानी होते. आज मला आनंद दिघे यांचीही आठवण येते. आनंद दिघे असते तर त्यांना आज वेगळं समाधान असतं. ठाण्याने शिवसेनेला पहिली सत्ता दिली. ठाणे आणि शिवसेना हे नातं काही औरच होतं.

दिघे साहेबांनंतर बाळासाहेब ठाण्यात यायचे तेव्हा एकनाथ शिंदे आहे, चिंता नाही, असं म्हणायचे. त्यामुळे उर भरुन यायचा.

त्यावेळेस पाकिस्तानसुद्धा कोणत्याही पंतप्रधान, मुख्यमंत्र्याला घाबरत नव्हता, पण बाळासाहेबांना घाबरायचा

पाणी प्रश्न असेल,  फुटपाथवर पडलं, कुणी झाडं तोडतंय अशी बातमी वृत्तपत्रात आली की बाळासाहेबांचा फोन यायचा. बाळासाहेबांचा फोन यायचा तेव्हा आमची काय परिस्थिती व्हायची. ते निसर्गप्रेमी होते. त्यामुळे काय चाललंय? असा जाबही विचारायचे. ते सर्व गोष्टींकडे बारकाईने लक्ष द्यायचे.

बाळासाहेब नेहमी सांगायचे की, तुमच्याकडे आत्मविश्वास असेल तर जगाच्या पाठिवर कोणतीही शक्ती तुम्हाला रोखू शकणार नाही. आपण सगळेच त्याचा अनुभव आता घेतोय.

बाळासाहेबांचे विचार आणि शिकवण सोबत घेऊन चाललो आहोत.

बाळासाहेबांनी सत्तेसाठी, मुख्यमंत्रीपदासाठी कधीही आपल्या विचारांशी तडजोड केली नाही. हे देखील आम्ही त्यांच्याकडून शिकलो आहोत. त्यांचाच विचार घेऊन आम्ही पुढे चालत होते.

ते नेहमी म्हणायचे की ते रिमोट कंट्रोल होते. पण त्यांनी सर्वसामान्यांसाठी ते रिमोट कंट्रोल चालवलं. आम्ही स्वत: साक्षीदार आहोत.

संयुक्त महाराष्ट्र चळवळ असेल किंवा महाराष्ट्राची अस्मिताचा मुद्दा असेल बाळासाहेबांनी भरपूर कामं केली. त्यांच्यासोबत अनेकजणं आली. ते पुढे विधानसभेत आली.

बाळासाहेबांनी विविध क्षेत्रातील कलाकार, आणि इतरांना वेळोवेळी पाठिंबा दिला. त्यांच्या पाठिमागे उभे राहिले.

कार्यकर्त्यांच्या पाठीमागे कसं उभं राहायचं ते बाळासाहेबांकडून शिकलं पाहिजे.