मायानगरी मुंबईत विस्तीर्ण जंगल फुलणार, आरेकडून वन विभागाला 812 एकर जमिनीचा ताबा

| Updated on: Jun 07, 2021 | 9:19 PM

मुंबई सारख्या महानगराच्या मध्यभागी विस्तीर्ण जंगल फुलविण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. बोरीवली तहसीलदार आणि नगर भूमापन अधिकारी मालाड यांच्या उपस्थितीत ताबा घेण्यात आला.

मायानगरी मुंबईत विस्तीर्ण जंगल फुलणार, आरेकडून वन विभागाला 812 एकर जमिनीचा ताबा
मुंबईत 812 एकरवर जंगल उभारलं जाणार
Follow us on

मुंबई : मुंबईकरांसाठी एक अत्यंत महत्वाची आणि चांगली बातमी आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळची आरेची जागा वनासाठी राखीव ठेवून तिथं वनसंपदेचे संवर्धन करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला होता. आज 286.732 हेक्टर अधिसूचित जागेचा ताबा आरे दुग्ध वसाहतीने वन विभागाला प्रत्यक्ष सोपवला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी, आरे यांच्याकडून मुख्य वनसंरक्षक यांना हा ताबा देण्यात आलाय. त्यामुळे मुंबई सारख्या महानगराच्या मध्यभागी विस्तीर्ण जंगल फुलविण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. बोरीवली तहसीलदार आणि नगर भूमापन अधिकारी मालाड यांच्या उपस्थितीत ताबा घेण्यात आला. (transfer of 812 acres of land from Aarey to Forest Department)

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या बैठकीत दुग्धविकास मंत्री सुनील केदार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत यासंदर्भातील प्रस्तावावर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आला होता. बोरिवलीतील आरे, गोरेगाव तसेच मरोळ मरोशी येथील क्षेत्राचा ताबा देण्यात आला आहे. आरे येथील 125.422 हेक्टर, गोरेगाव येथील 71.631 हेक्टर आणि मरोळ मरोशी येथील 89.679 हेक्टर इतकी जागा वन विभागाच्या ताब्यात देण्यात आली. याव्यतिरिक्त मरोळ मरोशी गावातील 40.469 हेक्टर जागा यापूर्वीच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या ताब्यात देण्यात आली आहे. अशा रीतीने एकूण 812 एकर जागेवर आता वन विभागाला जंगल फुलवता येणार आहे.

यासंदर्भात राखीव वन क्षेत्राबाबत कलम 4 नुसार नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागवण्यात येऊन त्यावर सुनावणीनंतर अंतिम अधिसूचना काढण्यात येणार आहे राखीव वन क्षेत्राचा निर्णय घेताना आदिवासी समुदाय तसेच इतर संबंधितांचे योग्य हक्क अबाधित ठेवावेत, असेही मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत.

मुंबईत दुर्मिळ प्रजातीचे वृक्ष, वेलींचं संगोपन आणि संवर्धन होणार

जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधत निसर्गप्रेमी अभिनेते सयाजी शिंदे यांनी एका नव्या उपक्रमाची घोषणा केली आहे. सह्याद्री देवराई आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने सयाजी शिंदे यांनी हा उपक्रम हाती घेतलाय. या उपक्रमा अंतर्गत दुर्मिळ प्रजातींचे वृक्ष आणि वेलींचं संगोपन आणि संवर्धन कार्यक्रम राबवला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिलीय. सयाजी शिंदे यांनी यांनी पर्यावरण रक्षणासाठी मोठं काम हाती घेतली आहे. त्यांनी बीड जिल्ह्यात माळरानावर नंदनवन फुलवलं आहे. देशातील पहिलं वृक्ष संमेलनही त्यांनी घेतलं आहे.

सयाजी शिंदे यांचा नवा उपक्रम कसा आहे?

सयाजी शिंदे यांनी हाती घेतलेला नवा उपक्रम कसा आहे, याची उत्सुकता अनेक निसर्गप्रेमींना लागली आहे. तर पहिल्या पावसाच्या आगमनानंतर बोरीवलीतील नॅशनल पार्क इथं कृष्णवड, तेंदु, अजानवृक्ष, हुंब यासारख्या 22 दुर्मिळ देशी प्रजातींची लागवड केली जाणार आहे. तसंच हिरडा, बेहेडा, मुचकुंद अशा अनेक औषधी वनस्पती आणि वेलींयुक्त बोटोनिकल गार्डन, शाश्वत आठवणींचा वारसा जपण्याच्या हेतूने उभारण्यात येणारी वृक्षरुपी ऑक्सिजन बँक यांचा या उपक्रमात समावेश असणार आहे. आतापर्यंत साधारण 22 देवराई , 1 वृक्ष बँक , 14 गड किल्ले या सोबतच राज्यभरात अनेक ठिकाणी किमान 4 लाखापेक्षा अधिक वृक्षारोपण करणाऱ्या सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराई या संस्थेनं आता मुंबई हिरवी करण्याचा जणू ध्यास घेतला आहे.

इतर बातम्या :

उद्धव ठाकरे, शरद पवार, अजित पवारांमध्ये ‘वर्षा’ बंगल्यावर तासभर खलबतं, नेमकी चर्चा काय?

रासायनिक कंपनीतल्या आगीतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची घोषणा

transfer of 812 acres of land from Aarey to Forest Department