Farmer Protest : मुंबईत ‘लाल वादळ’ घोंघावणार!, कसा असेल पोलीस बंदोबस्त?

| Updated on: Jan 24, 2021 | 9:40 PM

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला हा मोर्चा होणार असल्यामुळे मुंबई पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

Farmer Protest : मुंबईत लाल वादळ घोंघावणार!, कसा असेल पोलीस बंदोबस्त?
Follow us on

मुंबई : राजधानी दिल्लीच्या सीमेवर गेल्या 2 महिन्यांपासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी सोमवारी मुंबईत शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा निघणार आहे. अखिल भारतीय किसान सभेनं पुकारलेल्या या मोर्चात राज्यभरातील जवळपास 20 हजार शेतकरी सहभागी झाले आहेत. या आंदोलकांनी रविवारी संध्याकाळी मुंबईतील आझाद मैदानात धडक दिली आहे.(Large police security on the backdrop of farmers’ agitation in Mumbai)

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला हा मोर्चा होणार असल्यामुळे मुंबई पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. किसान मोर्चावर ड्रोनची नजर असणार आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर 100 वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि 500 हून अधिक पोलीस शिपाई रस्त्यावर असणार आहेत. शुक्रवारपासूनच पोलिसांनी नाकाबंदी सुरु केली आहे. येणारी वाहणं तपासून ती शहरात सोडली जात आहेत. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

‘लाल वादळ’ आझाद मैदानात दाखल

राजधानी दिल्लीच्या सीमेवर गेल्या 2 महिन्यांपासून सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अखिल भारतीय किसान मोर्चानं हे आंदोलन पुकारलं आहे. सुमारे 20 हजार शेतकरी आणि महिला या मोर्चात सहभागी झाल्या आहेत. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अजित नवले यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा लाँग मार्च नाशिकवरून सुरू झाला. काल संध्याकाळी अखिल भारतीय किसान सभेचा हा लाँग मार्च सुरू झाला. एकूण 21 जिल्ह्यातील 20 हजार शेतकरी या मोर्चात सहभागी झाले. सर्व जण पायी चालत मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. घोषणा देत, गाणी म्हणत, ढोल वाजवत आणि हातात लाल बावटा घेऊन शेतकऱ्यांचा हा जत्था आझाद मैदानात पोहोचला आहे.

शेतकरी मोर्चाला राष्ट्रवादीचा पाठिंबा

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसनं पाठिंबा दिला आहे. इतकच नाही तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईतील शेतकरी मोर्चात सहभागी होणार असल्याची घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या फेसबुक पेजवर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणारी फेसबुक फ्रेम आपल्या डिस्प्ले पिक्चरला लावली आहे. शेतकरी आंदोलनाला राज्यभरातील कार्यकर्त्यांनी आणि इतर नागरिकांनी या आंदोलनात सहभागी व्हावं यासाठी त्यांनी सोशल मीडियावर अभिनव पद्धतीने लोकसहभाग मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. सोशल मीडियावर लाखो नागरिक सक्रिय असतात. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर करत जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे आंदोलन पोहचवण्याचा उद्देश शरद पवार यांचा असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

शेतकऱ्यांचा आसूड कडाडला; शेतकऱ्यांचं ‘लाल वादळ’ नाशिकवरून मुंबईकडे

Photo: शेतकऱ्यांचा एल्गार; हजारोंचा नाशिक ते मुंबई पायी मोर्चा!

Large police security on the backdrop of farmers’ agitation in Mumbai