Uddhav Thackeray | माजी मंत्री संजय राठोडांचा वनवास संपवा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे कुणी केली मागणी?

पोहरादेवी येथील महंत बाबूसिंग राठोड त्याचप्रमाणे मेहताब सिंग नाईक, अॅड. अभय राठोड, पोपट चव्हाण व बंजारा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली

Uddhav Thackeray | माजी मंत्री संजय राठोडांचा वनवास संपवा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे कुणी केली मागणी?
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Jun 18, 2022 | 5:37 PM

मुंबई : शिवसेनेचे माजी मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळावे, या मागणीसाठी पोहरादेवीच्या महंतांनी आज थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. संजय राठोडांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान देऊन आमच्या समाजाला न्याय द्या, अशी आर्त मागणी बंजारा (Banjara) समाज महंतांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री ठाकरे यांनी राठोडांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान देणार असल्याचा शब्द दिल्याची माहिती पोहरादेवीच्या महंतानी दिला आहे. त्यामुळे आता राठोडांचे मंत्रिमंडळातील ‘कमबॅक’ निश्चित मानले जात आहे.

पूजा चव्हाण प्रकरण काय?

बीडमधील परळी येथील टिक टॉक स्टार पूजा चव्हाण या तरुणीने पुणे येथे आत्महत्या केल्याने खळबळ मााजली होती.
राज्याचे माजी वनमंत्री संजय राठोड यांना पूजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यूप्रकरणी विरोधकांनी केलेल्या आरोपानंतर राजीनामा द्यावा लागला होता. यावेळी पूजा चव्हाणच्या संभाषणाच्या ऑडिओ क्लिपही व्हायरल झाल्या होत्या. त्यातील आवाज संजय राठोड यांचा असल्याचा आरोप होता. या आरोपानंतर संजय राठोड कुटुंबासह नॉट रिचेबल झाले होते. काही काळानंतर ते पुन्हा बंजारा समाजातील कार्यक्रमांमध्ये सक्रीय झाले. दरम्यान, पुण्यातील वानवडी पोलिसांनी पूजा चव्हाण हिचा मृत्यू घातपात नसून अपघाती मृत्यू आहे, असा खुलासा केला. त्यानंतर राठोड यांना दिलासा मिळाला. त्यानंतर आता राठोड यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळवून देण्याची मागणी करण्यात येत आहे.

पोहरादेवी महंतांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पोहरादेवी येथील महंत बाबूसिंग राठोड त्याचप्रमाणे मेहताब सिंग नाईक, अॅड. अभय राठोड, पोपट चव्हाण व बंजारा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. काही दिवसांपूर्वीच राठोडांवरील आरोपांबाबत पोलीस अहवालाच्या मागणीसाठी पोहरादेवी संस्थानचे सहा महंत पुण्याच्या पोलीस आयुक्तांना भेटले होते. या भेटीत पुणे पोलिस आयुक्तांनी संजय राठोड निर्दोष असल्याची माहिती दिली असल्याचा दावा महंतानी केला होता. त्यामुळे लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेवून राठोड यांना पुन्हा मंत्रीपद द्यावे, अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी जाहीर केलं होतं. त्यानुसार त्यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. देशातील संपूर्ण बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी या तीर्थक्षेत्राच्या विकास कामास गती द्यावी आणि त्याचा कालबध्द आढावा घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी शुक्रवारी दिल्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us