सिंधुदुर्ग: गणेशोत्सव अगदी तोंडावर आलाय. कोकणात गणपती उत्सवाचा (Kokan Ganeshotsav) जल्लोष काय असतो हे काय वेगळं सांगायची गरज नाही. गणपती जस जसे जवळ येतील. शहरात राहणाऱ्या चाकरमान्यांना गावाकडे, कोकणात जायचे वेध लागतात. अगदी महिनाभर आधीपासून तिकीट बुकिंग (Ticket Booking) वगैरे सगळं सुरु असतं. काही असो, गणपतीला कोकणातच! याच संदर्भातली एक महत्त्वाची बातमी समोर येतीये. पश्चिम महाराष्ट्राला तळकोकणाशी जोडणारा करूळ घाटमार्ग (Karul Ghat) 25 ऑगस्टपर्यंत बंद असणार असल्याची महत्त्वाची माहिती समोर येतीये, जिल्हाधिकाऱ्यांकडून हे आदेश देण्यात आलेत.
पश्चिम महाराष्ट्राला तळकोकणाशी जोडणारा करूळ हा मोठी वर्दळ असलेला सर्वात महत्वाचा घाट. हा घाट 25 ऑगस्टपर्यंत बंद असणार आहे. सिंधुदुर्गातील वैभववाडी येथील हा करूळ घाटमार्ग 25 ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत. घाटात संरक्षण भिंत दरीत कोसळलीये त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आलेला आहे. दरम्यान या मार्गावरील जड व अवजड वाहतूक फोंडाघाट मार्गे वळविण्यात आली आहे.
कोरोनाचे नियम शिथिल झाल्याने गौरी-गणपतीसाठी कोकणात जाण्यासाठी उत्सुक असलेल्या चाकरमान्यांचा उत्साह यंदा द्विगणित झाला आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील कोकणवासीयांच्या मदतीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना धावून आली आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या ठाण्यातील चाकरमान्यांसाठी मनसेकडून तब्बल 100 बसेस मोफत सोडण्यात येणार आहेत. दरम्यान, यंदा कोकणसाठी विशेष ‘मनसे एक्सप्रेस’ देखील मोफत सोडण्याचा संकल्प ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी बोलून दाखवला, अशी माहिती मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी दिली.