“मंत्रालय मिळालं, मंत्र्याचं काय सांगता;” बच्चू कडू नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Feb 03, 2023 | 6:21 PM

मंत्रिमंडळ विस्तार व्हायला पाहिजे. कारण मंत्र्यांचं प्रमाण कमी झालं म्हणजे कामाचं प्रमाणही कमी होते. असं मत मुख्यमंत्री शिंदे यांचेही आहे.

मंत्रालय मिळालं, मंत्र्याचं काय सांगता; बच्चू कडू नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडू
Follow us on

पंढरपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) आणि सर्व आमदार शिवसेनेत राहिले असते, तर कोर्टाचा वेळ वाचला असता, असं प्रहारचे आमदार बच्चू कडू (Bachu Kadu) यांनी म्हंटलं. मुख्यमंत्री पद एकनाथ शिंदे यांनी घेतलं. पण, पक्षावर दावा करायला नको होता, असं जनमत असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं. लोकांना असं वाटतं की, शिवसेनेत थांबले असते तर कदाचित कोर्ट कचेऱ्यांतील वेळ वाचला असता. बच्चू कडू म्हणाले, मी टेक्निकली माहिती घेतली. ४० आमदार, खासदार आणि संघटन चालविणं कठीण असल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कदाचित पक्षाचं चिन्ह घेण्याचा निर्णय घेतला असावा.

माझी यासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा झाली नाही. पण, मी माझ्या मनातील बोललो की, शिंदे आणि आमदार यांनी शिवसेनेत थांबायला हवे होते.

भाजपसोबत काम करत असताना शिंदे गटाची गळचेपी होते असे आपल्याला वाटते का, यावर बोलताना बच्चू कडू म्हणाले, अंतर्गत राजकारण काय आहे, ते मला माहीत नाही. असं होण्याचं काही कारण नाही.

मंत्रिमंडळ विस्तार व्हायला पाहिजे. कारण मंत्र्यांचं प्रमाण कमी झालं म्हणजे कामाचं प्रमाणही कमी होते. असं मत मुख्यमंत्री शिंदे यांचेही आहे. मंत्रिमंडळ विस्तार होणे गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यांकडेही पाच-सहा खाती आहेत, असंही बच्चू कडू यांनी सांगितलं.

प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्री हवेत

एक पालक आणि चार जिल्हे हे चित्र आहे. प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्री असल्यास लोकं त्यांना भेटतात. तेवढे काम लोकांचे होतात. बच्चू कडू मंत्रिमंडळात असतील का, यावर बच्चू कडू म्हणाले, तुम्ही आमची शिफारस घेऊन जा. मला अपंग मंत्रालय मिळालं. मला मंत्र्याचं काय सांगता, असा सवालही बच्चू कडू यांनी विचारला.

अपंग मंत्रालय मिळाल्याचा आनंद

आम्हाला दिव्यांग मंत्रालय दिलं आहे. याचा आनंद आहे. यासाठी आम्ही उठाव केला होता. आमचा निर्णय लोकांना कडू वाटला असेल. पण, दिव्यांग मंत्रालय देऊन सरकारनं आमचा उठाव गोड केलेला असल्याचंही बच्चू कडू यांनी सांगितलं.