मुंबईला दोन पालिका आयुक्त हवे; पालकमंत्री अस्लम शेख यांची मागणी

| Updated on: Jan 09, 2021 | 3:58 PM

अस्लम शेख यांनी शहर विकास विभागाकडे याबाबतची मागणी केली आहे. (Aslam Sheikh Demand Two BMC Commissioner)

मुंबईला दोन पालिका आयुक्त हवे; पालकमंत्री अस्लम शेख यांची मागणी
Follow us on

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राचा होणारा विस्तार आणि वाढणारी लोकसंख्या पाहता बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी दोन आयुक्त असणं गरजेचे आहे, अशी मागणी मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केली आहे. अस्लम शेख यांनी शहर विकास विभागाकडे याबाबतची मागणी केली आहे. (Aslam Sheikh Demand Two BMC Commissioner)

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. देशातील विविध भागांतून लोक रोजीरोटीच्या शोधात मुंबई शहरात येत असतात. याचा परिणाम म्हणून शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे. वाढणाऱ्या लोकसंख्येला नागरी सुविधा पुरविण्याची जबाबदारी ही त्या शहरातील महानगरपालिकेची असते. पण सध्या महानगरपालिकेसाठी एकच आयुक्त असल्याने नागरीकांचे प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित राहतात.

तसेच मुंबई उपनगरात राहणाऱ्या नागरिकांना विविध प्रशासकीय कामांसंदर्भात छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील पालिका मुख्यालयात यावे लागते. यामुळे नागरिकांची गैरसोय होते. यामुळे मुंबई शहर आणि उपनगरासाठी दोन पालिका आयुक्त असणं गरजेचे आहे.

पी-उत्तर वॉर्डच्या विभाजनास राज्य सरकारने नुकतीच मान्यता दिली आहे. त्यानंतर आता पालिकेसाठीही दोन आयुक्तांची मागणी जोर धरू लागली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी दोन आयुक्तांची पद निर्माण करण्यात आल्यास मुंबई उपनगरात राहणाऱ्या नागरिकांना प्रशासकीय व्यवहार करणं सोयीच ठरणार आहे. सध्या मुंबई शहर आणि उपनगरसाठी दोन जिल्हाधिकारी आहेत. याच पार्श्वभूमीवर दोन आयुक्तांची पद निर्माण करावीत, अशी मागणी शेख यांनी केली आहे.

मुंबई तोडण्याचा काँग्रेसचा डाव यशस्वी होऊ देणार नाही; भातखळकरांचा इशारा

तर मुंबईला दोन आयुक्त देण्याची शेख यांची मागणी निंदनीय असून या मागणी आडून मुंबईचे तुकडे करण्याचे काँग्रेसचे षडयंत्र आहे. पण काँग्रेसचे हे षडयंत्र भाजप कधीही यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा भाजप नेते, आमदार अतुल भातखळकर यांनी दिला आहे. (Aslam Sheikh Demand Two BMC Commissioner)

संबंधित बातम्या : 

मुंबई तोडण्याचा काँग्रेसचा डाव यशस्वी होऊ देणार नाही; भातखळकरांचा इशारा