रेल्वेच्या नाकावर टिच्चून उल्हासनगरची नेत्रहीन प्रांजल पाटील उपजिल्हाधिकारीपदी

| Updated on: Oct 15, 2019 | 9:55 AM

केरळमधील पहिली दृष्टीहीन महिला उपजिल्हाधिकारी बनण्याचा बहुमान मराठमोळ्या प्रांजल पाटीलला मिळाला आहे.

रेल्वेच्या नाकावर टिच्चून उल्हासनगरची नेत्रहीन प्रांजल पाटील उपजिल्हाधिकारीपदी
Follow us on

मुंबई : आधी अंधत्व आणि त्यानंतर सरकारची डोळेझाक. अडथळ्यांची शर्यत पार करत पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या नेत्रहीन प्रांजल पाटीलने आणखी एक गड सर केला आहे. केरळमधील तिरुअनंतपुरमची उपजिल्हाधिकारी म्हणून मराठमोळी प्रांजल (Visually Challenged IAS Pranjal Patil) रुजू झाली आहे.

केरळमधील पहिली दृष्टीहीन महिला उपजिल्हाधिकारी बनण्याचा बहुमान प्रांजलला मिळाला आहे. प्रांजलला डावलणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांच्या नाकावर टिच्चून तिने घवघवीत यश मिळवलं.

मूळ जळगावची असलेली प्रांजल उल्हासनगरला राहते. तिची दृष्टी जन्मतःच अधू होती. वयाच्या सहाव्या वर्षी तिने दृष्टी कायमची गमावली. मात्र समस्यांपुढे गुडघे टेकेल, तर ती प्रांजल पाटील कसली.

आयुष्यात काहीतरी करुन दाखवण्याच्या जिद्दीतून तिने एक-एक अडथळे पार केले. दादरच्या कमला मेहता स्कूलमध्ये तिने प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. ब्रेल लिपीमध्ये शिकत प्रांजलने दहावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर उल्हासनगरच्या चांदीबाई महाविद्यालयात ती कला शाखेतून बारावी उत्तीर्ण झाली. यावेळीही तिने थोडे-थोडके नव्हे, तर चक्क 85 टक्के गुण मिळवले होते. मुंबईतील सेंट झेव्हिअर्स कॉलेजमधून प्रांजलने बीए केलं.

पदवीधर झाल्यावर प्रांजलने (Visually Challenged IAS Pranjal Patil) यूपीएससी परीक्षा देण्याचा निश्चय केला होता. दिल्लीत जाऊन जेएनयू महाविद्यालयातून मास्टर्स शिक्षण तिने पूर्ण केलं. त्यानंतर अभ्यास करुन प्रांजलने थेट यूपीएससीची परीक्षा दिली. विशेष म्हणजे पहिल्याच प्रयत्नात ती 773 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली.

मोदी आणि शी जिनपिंग यांचा ‘आवाज’ बनलेली ही महिला कोण आहे?

शारीरिक विकलांग कोट्यातून तिने यूपीएससीची परीक्षा दिली होती. पण रेल्वे विभागात तुझ्यासाठी योग्य काम नसल्याचं सांगून रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी तिच्यावर अविश्वास दाखवला. तेव्हाही प्रांजलने जिद्दीने रेल्वे सेवेतच काम करण्याचा अट्टाहास धरला होता.

हक्काची पोस्ट न देणाऱ्या व्यवस्थेला तिने आपल्या यशाने चपराक लगावली. 2017 मध्ये रँक सुधारत ती 124 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली. रेल्वे मंत्रालयात आपल्या हक्कासाठी चकरा मारत असतानाच तिने परीक्षेची तयारी करत लढाई जिंकली.

यूपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी दिव्यांगांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध होत नाही. तसेच ग्रंथालयातील पुस्तकांवर अनेक विद्यार्थी मार्किंग करत असल्याने, त्याचे कॉम्प्यूटरवर स्कॅन करताना आवश्यक भाग स्कॅन होत नाहीत. अशावेळी महत्त्वाचाच भाग वगळला जातो. ते बंद व्हावं यासाठी तिने वैयक्तिक पातळीवर प्रयत्न केले.