Why I Killed Gandhi: तो सिनेमा नक्कीच निषेधार्ह; जयंत पाटलांचा आव्हाडांच्या सूरात सूर

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी व्हाय आय किल्ड गांधी या सिनेमात नथुराम गोडसेची भूमिका साकारली आहे. कोल्हेंच्या या भूमिकेला आता राष्ट्रवादीतूनच विरोध होत आहे.

Why I Killed Gandhi: तो सिनेमा नक्कीच निषेधार्ह; जयंत पाटलांचा आव्हाडांच्या सूरात सूर
जयंत पाटील
| Edited By: | Updated on: Jan 21, 2022 | 2:56 PM

मुंबई: राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी व्हाय आय किल्ड गांधी या सिनेमात नथुराम गोडसेची भूमिका साकारली आहे. कोल्हेंच्या या भूमिकेला आता राष्ट्रवादीतूनच विरोध होत आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या पाठोपाठ प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कोल्हेंच्या सिनेमाला विरोध केला आहे. तो सिनेमा नक्कीच निषेधार्ह आहे. नथुरामचं समर्थन करत नाही. कोणी करू शकत नाही. भूमिका केली म्हणजे समर्थन होत नाही, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच आव्हाडांची भूमिका योग्यच आहे, असं त्यांनी सांगितलं.

जयंत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. अमोल कोल्हे यांनी 2017 मध्ये ‘त्या’ सिनेमामध्ये भूमिका केली आहे. त्यामुळे नोटीस काढायची व या गोष्टीचा एवढा बाऊ करण्याची आवश्यकता नाही. तो सिनेमा नक्कीच निषेधार्ह आहे, असं पाटील म्हणाले.

एवढ्या उशिरा सिनेमाचं प्रदर्शन का?

नथुराम गोडसे यांच्या उदात्तीकरणाचा कोणताही सिनेमा निघत असेल तर त्याविषयी जितेंद्र आव्हाड यांनी भूमिका मांडली आहे. हा सिनेमा मी पाहिला नाही किंवा त्यांची भूमिकाही. राष्ट्रवादीत येण्याअगोदरची भूमिका कोल्हे यांनी केली आहे. मात्र त्याचे प्रदर्शन इतक्या उशिरा का होतेय हे माहीत नाही, असंही ते म्हणाले.

तो सिनेमा पाहून वेळ घालवायचा नाही

या भूमिकेवर लोकांच्या प्रतिक्रिया व भावना व्यक्त होत आहेत त्या चुकीच्या नाहीत. परंतु एक कलाकार म्हणून त्यांनी 2017 साली ती भूमिका केली आहे. राष्ट्रवादीत ते त्यानंतर आले आणि लोकसभेची निवडणूक जिंकले. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिका करुन ते घराघरात पोचले. शिवाय लोकसभेत शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांनी प्रभावित होऊन भाषणेही केली आहेत. तो सिनेमा बघण्याची व वेळ घालवण्याची आवश्यकता नाही. आमची भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे, असेही त्यांनी सांगितलं.

पवारांकडून पाठराखण

दरम्यान, या वादात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मात्र अमोल कोल्हे यांची पाठराखण केली आहे. गांधी सिनेमा जगात गाजला. त्यामुळे जगात गांधींना महत्त्व आलं. त्या सिनेमात कुणीतरी गोडसेची भूमिका केली. ती भूमिका करणारा आर्टिस्ट होता. नथुराम गोडसे नव्हता. कोणत्याही सिनेमात आर्टिस्ट एखादी भूमिका करत असेल तर त्याकडे आर्टिस्ट म्हणून पाहिलं पाहिजे. शिवाजी महाराज आणि औरंगजेब संघर्ष झाला. शिवाजी महाराजांच्या सिनेमात जर कुणी शिवाजी महाराजांची भूमिका घेत असेल आणि कुणी औरंगजेबाची भूमिका करत असेल तर औरंगजेबाची भूमिका करतो म्हणून तो मोगल साम्राज्याचा पुरस्कर्ता होत नाही. तो कलावंत म्हणून भूमिका करत असतो. किंवा रामराज्यातील सिनेमा असेल तर राम रावणाचा संघर्ष असेल रावणाची भूमिका करणारा व्यक्ती रावण असू शकत नाही. तो कलाकार असतो. सीतेचं अपहरण दाखवलं म्हणजे त्या कलाकाराने अपहरण केलं असं होत नाही. रावणाचा तो इतिहास या माध्यमातून दाखवला जातो, असं सांगतानाच अमोल कोल्हेंनी भूमिका साकारली असेल तर ती कलावंत म्हणून केली आहे. त्याकडे कलाकार म्हणूनच पाहिलं पाहिजे, असं पवार म्हणाले.

 

संबंधित बातम्या:

Why I Killed Gandhi: अमोल कोल्हे नथुराम गोडसे साकारणार; राजेश टोपे म्हणतात…

Why I Killed Gandhi: अमोल कोल्हेंनी कलावंत म्हणून गोडसे साकारला असेल तर गांधीविरोधक ठरत नाही, शरद पवारांकडून कोल्हेंची पाठराखण

Why I Killed Gandhi: भाजपवाले कधीपासून गांधीवादी झाले?; शरद पवारांचा बोचरा सवाल

Why I Killed Gandhi: अमोल कोल्हे नथुराम गोडसे साकारणार; राजेश टोपे म्हणतात…

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us