सरकार आल्यास राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री कोण? जयंतराव पाटील यांनी स्पष्टच सांगितलं

विधानसभा निवडणुकीनंतर सत्तेत महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. परंतु मुख्यमंत्री कोण होणार? हे संख्याबळवर ठरेल. जर संख्याबळानुसार राष्ट्रवादी काँग्रेसकडे हे पद आले तर मुख्यमंत्री कोण असेल...

सरकार आल्यास राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री कोण? जयंतराव पाटील यांनी स्पष्टच सांगितलं
जयंत पाटील
Jitendra Zavar | Updated on: Feb 13, 2023 | 3:44 PM

मुंबई : राज्यात आगामी काळात होणारी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढवणार आहे. या निवडणुकीसाठी तिन्ही पक्षांमध्ये जागा वाटप होणार आहे. त्यात सर्वात चांगला स्ट्राईक रेट करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. या निवडणुकीनंतर सत्तेत महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. परंतु मुख्यमंत्री कोण होणार? हे संख्याबळवर ठरेल. जर संख्याबळानुसार राष्ट्रवादी काँग्रेसकडे हे पद आले तर मुख्यमंत्री कोण असेल, हे पवार साहेब ठरवतील. त्यांचा शब्द आमच्यासाठी अंतिम असेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. टीव्ही 9 मराठीने आयोजित केलेल्या महाराष्ट्राचा महासंकल्प या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जयंत पाटील यांनी विविध प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली.

आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सत्तेवर का येणार? याचे विश्लेषण करताना जयंत पाटील यांनी सांगितले की, अलीकडे विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत आमचे उमेदवार निवडून आले. या निवडणुकीत पदवीधर आणि शिक्षकांनी मतदान केले. म्हणजेच राज्यातील सुशिक्षित मतदार महाविकास आघाडीच्या पाठिशी आहे. त्यामुळे आम्ही एकत्र असलो तर भाजपचा पराभव नक्कीच असणार आहे.

भाजपला ६० जागा मिळतील

आगामी विधासभा निवडणुकीत भाजपला जास्तीत जास्त ६० जागा मिळतील. भाजपकडे मोदींच्या नावाशिवाय काहीच नाही. परंतु राज्यात जे काही सुरु आहे, त्याबद्दल जनतेच्या मनात चिड आहे. हा राग मतपेटीतून उतरणार असून महाविकास आघाडी सत्तेवर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज ठाकरे यांनी माझी मिमिक्री चांगली केली

राज्यातील राजकीय व्यक्तीसंदर्भात बोलताना राज ठाकरे यांच्यांवर जयंत पाटील यांनी मत मांडले. माझी आणि राज ठाकरे यांची फारशी ओळख नाही. त्यांना मी फक्त टीव्हीवर बघतो. त्यांनी माझी मिमिक्री चांगली केली होती. त्यांची भाषणे चांगली असतात.

पवार साहेबांच्या पुण्यावर राष्ट्रवादी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले की, पवार साहेबांची आकलन शक्ती प्रचंड आहे. राज्यातील कानाकोपऱ्याची माहिती त्यांना आहे. देशातील सर्व घटनांची बारकाईने ते नोंद ठेवतात. त्यांचा अनुभवाचा प्रचंड फायदा सर्वांना होतो. राजकारणापेक्षा काम करणाऱ्यावर त्यांचा भर जास्त आहे.

नाविन्यांची आवड पवार साहेबांना प्रचंड आहे. ते कोणाला टाकून बोलत नाही. सर्वांना ते मान देतात. राज्यात त्यांनी माणसे जोडली आहेत. ज्या ठिकाणी पक्षाचा आमदार नाही, त्याठिकाणीही पक्षाची काम करणारे कमी कमी २०० ते ४०० लोक असतात. यामुळे म्हणतो. आमचा पक्ष पवार साहेबांच्या पुण्याईवर उभा आहे. त्यांच्यांकडून काम कसे करायचे, लोकांशी कसे बोलायचे, शब्द कसे वापरायचे, कशा पद्धतीने माणसे जोडावी, हे सर्व शिकायला मिळाले, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

 

Follow Us