हे पहिल्यांदा झालंय, सगळ्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांवर दबाव टाकला : जितेंद्र आव्हाड

| Updated on: Apr 20, 2021 | 7:15 PM

मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनबाबत आजच निर्णय घ्यावा यासाठी सर्व मंत्र्यांनी पहिल्यांदाच त्यांच्यावर दबाव टाकला, असं जिंतेद्र आव्हाड यांनी सांगितलं (Jitendra Awhad on Maharashtra Lockdown). Jitendra Awhad on Maharashtra Lockdown

हे पहिल्यांदा झालंय, सगळ्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांवर दबाव टाकला : जितेंद्र आव्हाड
Jitendra Awhad
Follow us on

मुंबई : ठाकरे सरकारने महाराष्ट्रात पुन्हा कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. या बैठकीनंतर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बातचित केली. यावेळी बैठकीत नेमकी कशी चर्चा झाली, कोणत्या विषयांवर चर्चा झाली, याबाबत माहिती दिली. राज्यात कडक लॉकडाऊन लावण्याबाबत मंत्री आग्रही होते. मुख्यमंत्र्यांनी याबाबत आजच निर्णय घ्यावा यासाठी सर्व मंत्र्यांनी पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांवर दबाव टाकला, असं जिंतेद्र आव्हाड यांनी सांगितलं (Jitendra Awhad on Maharashtra Lockdown).

जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?

“आज पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांवर मंत्र्यांनी दबावच टाकला. लॉकडाऊनबाबत आजच निर्णय घ्या असा दबाव टाकला. गेल्या वेळी लॉकडाऊन उघडा, असं काही मंत्रीच म्हणायचे. पण सगळं आता आऊट ऑफ कंट्रोल जातंय. पेटणाऱ्या चिता शांत झोप लागू देत नाहीयत. म्हणजे लागणारच नाही. ज्याला हृदय आहे त्याला या चिता बघून झोप लागणार नाही. त्यामुळे लॉकडाऊन करावं, असं मुख्यमंत्र्यांना सांगितलं. आता याबाबत काय नियम आणायचे त्याबाबत मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. लोकं घराच्या बाहेर पडले नाही पाहिजेत. यासाठी जे करता येईल ते करावं लागेल”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले (Jitendra Awhad on Maharashtra Lockdown).

‘कोरोनाचे आकडे कमी करण्यासाठी कठोर निर्बंध’

राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीही राज्यात कडक लॉकडाऊन लागणार असल्याचे सांगितलं. “राज्यातील कोरोनाचे आकडे कमी करण्यासाठी कठोर निर्बंध आवश्यक आहेत. कडक लॉकडाऊन हवा, ही जनतेची भावना आहे. उपचार मिळत नाहीत, ऑक्सिजन नाही, परराज्यातून ऑक्सिजन आणतोय. ही चेन ब्रेक करण्यासाठी कठोर निर्बंध हवेत. ऑक्सिजन प्लाँट उभारून हवेतील ऑक्सिजन कामी आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुख्यमंत्री उद्या निर्णय जाहीर करतील”, असंही एकनाथ शिंदे म्हणालेत.

राज्यातील दहावीची परीक्षाही रद्द

महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा रद्द निर्णय घेतल्याची माहिती दिली. मंत्रिमंडळातील सदस्य, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी देखील याविषयावर मत मांडले. महाराष्ट्रात कोरोना विषाणू संसर्गामुळं प्रत्यक्ष पद्धतीनं शाळा भरल्या नाहीत. वर्षभर ऑनलाईन शिक्षण सुरु होते. पण, देशातील इतर सात राज्यांमध्ये ती पुढे ढकलण्यात आली आहे त्याप्रमाणं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली. संपूर्ण मंत्रिमंडळानं तो निर्णय मान्य केला, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

संबंधित बातम्या :