भाजपने 6 हजारपेक्षा अधिक ग्रामपंचायती जिंकल्या; केशव उपाध्ये यांचा दावा

| Updated on: Jan 19, 2021 | 11:54 AM

कुणी कितीही दावा केला असला तरी माझ्याकडे आकडेवारी आहे. आम्ही राज्यातील निम्म्यापेक्षा अधिक म्हणजे सुमारे सहा हजार ग्रामपंचायती जिंकल्या आहेत, असा दावा भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे. (keshav upadhye claim BJP won more than 6000 gram panchayat)

भाजपने 6 हजारपेक्षा अधिक ग्रामपंचायती जिंकल्या; केशव उपाध्ये यांचा दावा
Follow us on

मुंबई: कुणी कितीही दावा केला असला तरी माझ्याकडे आकडेवारी आहे. आम्ही राज्यातील निम्म्यापेक्षा अधिक म्हणजे सुमारे सहा हजार ग्रामपंचायती जिंकल्या आहेत, असा दावा भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे. (keshav upadhye claim BJP won more than 6000 gram panchayat)

केशव उपाध्ये यांनी पत्रकार परिषद घेऊन हा दावा केला आहे. राज्यातील 1600 बिनविरोध ग्रामपंचायींपैकी आम्ही 580 ग्रामपंचायती बिनविरोध जिंकल्या आहेत. त्या वगळता आम्ही 6 हजारापेक्षा अधिक ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. गडचिरोली आणि इतर ग्रामपंचायतीचे निकाल यायचे बाकी असून त्यातही भाजपला घवघवीत यश मिळेल, असा दावा उपाध्ये यांनी केला आहे. प्रत्येक पक्षाने आम्हीच सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा केला आहे. आम्हीच कसे मोठे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. कुणाला काहीही दावा करू द्यात. माझ्या हातात आता आकडेवारी आहे. त्यानुसार आम्ही राज्यात सहा हजारपेक्षा अधिक जागा जिंकल्या आहेत. भाजपचे कार्यकर्ते अनेक पॅनलमधून उभे होते. त्यातून ते निवडून आले आहेत. आम्ही कुणाच्याही विजयावर क्लेम करत नाही. आमचे कार्यकर्ते किती निवडून आले, त्यावरून हा दावा करत आहे, असं सांगतानाच आम्ही बोलतो ते ठोस आकडेवारीवर बोलतो. उगाचच काहीही दावे करत नाही, असा टोला उपाध्ये यांनी लगावला.

तिथेही आम्हीच जिंकू

गडचिरोली आणि काही ठिकाणची आकडेवारी यायची बाकी आहे. त्यातही भाजपला यश मिळेल. एकूण ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला अभूतपूर्व यश मिळालं आहे. काँग्रेसने त्यांना चार हजार जागा मिळाल्याचा दावा केला आहे. त्यांना काहीही दावा करू द्या. त्यांचा दावा राष्ट्रवादी आणि शिवसेनेला तरी मान्य आहे का? काँग्रेसची राज्यातील अवस्था अत्यंत दयनीय आहे. त्यांना त्यांचे मित्र पक्षही विचारत नाहीत, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.

प्रदेशाध्यक्ष शोधण्याने जनतेचं मनोरंजन

यावेळी त्यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची नियुक्ती होणार असल्याच्या प्रश्नावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. ज्यांना गेल्या दीड वर्षांपासून राष्ट्रीय अध्यक्ष सापडत नाही. त्यांना राज्यातही अध्यक्ष शोधावा लागत आहे. सध्या काँग्रेस जनतेचं मनोरंजन करत आहे. लोकांनाही एन्जॉय करू द्या, असा चिमटाही त्यांनी काढला.

रामाला मानणाऱ्यांचं राज्य नाही

हिंदुत्वाच्या मुद्दावरून उपाध्ये यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं. हिंदुत्वाच्या वल्गना केल्या म्हणजे हिंदूत्व स्वीकारलं असं होत नाही. हिंदूत्व बोलण्याने होत नसतं. ते कृतीत उतरावं लागतं. ज्या राज्यात प्रभू रामाचे पोस्टर फाडले जातात, त्यावरू हे रामाला मानणाऱ्यांचं राज्य नाही, हे स्पष्ट होतं, अशी टीकाही त्यांनी केली. (keshav upadhye claim BJP won more than 6000 gram panchayat)

 

संबंधित बातम्या:

मुक्ताईनगरात ग्रामपंचायती 51, सेना-राष्ट्रवादी-भाजपच्या दाव्या-प्रतिदाव्यांमुळे टोटल 90 वर

महाराष्ट्राला एक इंचही जमीन मिळू देणार नाही; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

भाजपचे दावे खोटे, ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचा सुपडा साफ : नवाब मलिक

(keshav upadhye claim BJP won more than 6000 gram panchayat)