MLC Election 2022: भाजपचे ‘लाड’ की जगताप? विधान परिषदेच्या ‘चमत्कारातून’ एकाचा गेम होणार, पण नक्की कुणाचा? आकडेवारीचा खेळ समजून घ्या

| Updated on: Jun 19, 2022 | 1:21 PM

MLC Election 2022: विधान परिषदेच्या निवडणुकीत जिंकण्यासाठी प्रत्येक उमेदवाराकडे 27 मते आवश्यक आहेत. आघाडीत सर्वाधिक मते शिवसेनेकडे आहेत. शिवसेनेकडे अपक्ष मिळून 62 मते आहेत. म्हणजे शिवसेनेकडे 8 मते अतिरिक्त उरतात.

MLC Election 2022: भाजपचे लाड की जगताप? विधान परिषदेच्या चमत्कारातून एकाचा गेम होणार, पण नक्की कुणाचा? आकडेवारीचा खेळ समजून घ्या
भाजपचे 'लाड' की जगताप? विधान परिषदेच्या 'चमत्कारातून' एकाचा गेम होणार, पण नक्की कुणाचा?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: उद्या होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत (Maharashtra MLC Election) 11 वा उमेदवार उतरल्याने या निवडणुकीची चुरस अधिक वाढली आहे. दहा जागांसाठीच्या या निवडणुकीत भाजपने पाचवा उमेदवार दिला आहे. त्यामुळे ही चुरस वाढली आहे. पाचव्या जागेसाठी भाजपचे प्रसाद लाड आणि काँग्रेसच्या भाई जगताप यांच्यात लढत होणार आहे. विशेष म्हणजे भाजपकडेही (bjp) मतांचा पुरेसा कोटा नाहीये. तर काँग्रेसकडेही (congress) पुरेसं संख्याबळ नाहीये. एमआयएमचा पाठिंबा सोडला तर काँग्रेसकडे अपक्ष आमदारांची मतेही नाहीयेत. मात्र, शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे अतिरिक्त मते असल्याने काँग्रेसला विजयाची खात्री वाटत आहे. परंतु, राज्यसभा निवडणुकीत झालेल्या क्रॉस व्होटिंगच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची धाकधुक वाढली आहे. त्यामुळे भाई जगताप विजयी होणार की प्रसाद लाड? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

काँग्रेसचं गणित सोप्पं… पण

विधान परिषदेच्या निवडणुकीत जिंकण्यासाठी प्रत्येक उमेदवाराकडे 27 मते आवश्यक आहेत. आघाडीत सर्वाधिक मते शिवसेनेकडे आहेत. शिवसेनेकडे अपक्ष मिळून 62 मते आहेत. म्हणजे शिवसेनेकडे 8 मते अतिरिक्त उरतात. राष्ट्रवादीकडे 53 मते आहेत. मात्र, देशमुख आणि मलिक तुरुंगात असल्याने मतांची ही संख्या दोनने घटून 51 झाली आहे. राष्ट्रवादीकडे तीन अपक्ष आणि सपाची दोन असे पाच आमदार आहेत. म्हणजे राष्ट्रवादीकडे एकूण 56 मते होतात. त्यामुळे राष्ट्रवादीकडे दोन मते अतिरिक्त उतरतात. म्हणजे शिवसेनेची 8 आणि राष्ट्रवादीची दोन अतिरिक्त मते एकत्रित केल्यास 10 अतिरिक्त मते उरतात. काँग्रेसकडे 44 मते आहेत. यात काँग्रेसचा एकच उमेदवार निवडून येऊ शकतो. दुसऱ्या उमेदवारासाठी काँग्रेसकडे केवळ 17 मते उरतात. एमआयएमे एक मत काँग्रेसला द्यायचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या दुसऱ्या उमेदवाराकडे 18 मते उरतात. तरीही काँग्रेसच्या भाई जगतापांना विजयासाठी 9 मतांची आवश्यकता आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीची अतिरिक्त 10 मते काँग्रेसला मिळाली तर काँग्रेसचे भाई जगताप सहज निवडून येऊ शकतात. तरीही कोणताही बेसावधपणा नको म्हणून भाई जगताप यांनी बविआचे नेते हितेंद्र ठाकूर यांची भेट घेऊन त्यांना मतदान करण्याची विनंती केली आहे. ठाकूर यांच्याकडे तीन मते आहेत. त्यामुळे ही मते आपल्याकडे खेचण्यासाठी काँग्रेसने हालचाली सुरू केल्या आहेत.

लाड यांना विजय कठिण

दुसरीकडे भाजपकडे 106 आमदार आहेत. पाच उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपला 135 मतांची गरज आहे. मात्र, चौथा आमदार निवडून आणतानाही भाजपची डोकेदुखी वाढणार आहे. भाजपच्या चौथ्या उमेदवाराला दोन मतांची गरज भासणार आहे. तर पाचव्या उमेदवाराला 27 मतांची गरज पडणार आहे. मात्र, राज्यसभा निवडणुकीत भाजपला 123 मते मिळाली होती. ही मते कायम राहिली तरी भाजपला बाहेरून 12 मते मिळवावी लागणार आहे. त्यासाठी प्रसाद लाड यांनी बविआचे नेते हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली होती. त्यांच्याकडील तीन मते आपल्याला देण्याची विनंती त्यांनी ठाकूर यांना केली होती. ही तीन मते लाड यांना मिळाली तरी त्यांना 9 मते मिळवावी लागणार आहेत. त्यामुळे ही मते लाड कशी मिळवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या निवडणुकीत लाड यांचाच गेम तर होणार नाही ना? असंही बोललं जात आहे.