BREAKING : नितेश राणे, रवी राणा, बच्चू कडू यांना मंत्रीपद मिळणार? मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल सर्वात मोठी बातमी

| Updated on: Nov 30, 2022 | 8:50 PM

राज्य मंत्रिमंडळाच्या बहुप्रतिक्षित दुसऱ्या टप्प्यातील विस्तारासाठी अखेर मुहूर्त ठरल्याची माहिती खात्रालीयक सूत्रांकडून मिळाली आहे.

BREAKING : नितेश राणे, रवी राणा, बच्चू कडू यांना मंत्रीपद मिळणार? मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल सर्वात मोठी बातमी
Follow us on

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा बहुप्रतिक्षित दुसऱ्या टप्प्यातील विस्तारासाठी अखेर मुहूर्त ठरल्याची माहिती खात्रालीयक सूत्रांकडून मिळाली आहे. येत्या 12 किंवा 13 डिसेंबरला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. खात्रीलायक सूत्रांनी याबाबत ‘टीव्ही 9 मराठी’ला माहिती दिलीय. खरंतर मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तार हा गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित राहीला आहे. मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तारावरुन विरोधकांकडून राज्य सरकारवर अनेकदा निशाणा साधण्यात आलाय. सरकार स्थापन होऊन चार महिने होत आली तरी मंत्रिमंडळाचा विस्तार का झाला नाही? असा सवाल करत विरोधकांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत वेगवगळे दावे केले. काही नेत्यांनी तर शिंदे-फडणवीस सरकार कोसळून मध्यावधी निवडणुका लागण्याचं भाकीत केलंय. या सगळ्या दावे-प्रतिदाव्यांनंतर अखेर आता लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तारामध्ये एकूण 23 मंत्र्यांच्या समावेश होणार आहे. त्यामुळे एकूण 23 मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भाजप आणि शिंदे गटात 50-50 टक्क्यांचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आलीय.

हे सुद्धा वाचा

दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात भाजपकडून यावेळी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये आमदार संजय कुटे, नितेश राणे आणि रवी राणा यांना मंत्रिपद मिळण्याती शक्यता आहे. तर शिंदे गटाकडून बच्चू कडू, संजय शिरसाठ आणि भरत गोगावले यांना संधी मिळू शकते. शिंदे गटातील हे तीनही नेते मंत्रिपदासाठी आग्रही आहेत.

शिंदे गटातील काही आमदारांमध्ये मंत्रिपदावरुन नाराजी होती, अशा बातम्या समोर आल्या होत्या. त्यानंतर शिंदे गटाचे सर्व आमदार गुवाहाटीला गेले होते. हे सर्व आमदार गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गेले होते, असं सांगण्यात आलं होतं. तसेच या दौऱ्यादरम्यान मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाली नाही, असंही शिंदे गटाच्या नेत्यांकडून सांगण्यात आलंय.

दरम्यान, शिंदे गटाच्या गुवाहाटी दौऱ्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी चर्चा होती. अखेर ती चर्चा खरी ठरणार आहे. तर दुसरीकडे विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशीदेखील चर्चा होती.