Ajit Pawar | अजित पवार दिल्लीला रवाना, पडद्यामागे काही मोठं घडतंय?

महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी समोर आलीय. उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीच्या दिशेला रवाना झाले आहेत. राज्यात सध्याच्या घडीला अनेक राजकीय घडामोडी घडत आहे. या दरम्यान अजित पवार यांचा दिल्ली दौरा चर्चेला कारण ठरला आहे.

Ajit Pawar | अजित पवार दिल्लीला रवाना, पडद्यामागे काही मोठं घडतंय?
Chetan Patil | Updated on: Oct 19, 2023 | 6:38 PM

मुंबई | 19 ऑक्टोबर 2023 : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहे. राज्य मंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्प्यातील विस्तार अजूनही रखडलेला आहे. सध्याच्या नवरात्रीच्या दिवसांमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी चर्चा होती. पण नवरात्रीचा आज पाचवा दिवस उगवला तरी मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप पार पडलेला नाही. मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी सत्ताधारी पक्षातीन अनेक नेत्यांनी देव पाण्यात ठेवले आहेत. अनेक नेत्यांना मंत्रिपदाची आशा आहे. त्यामुळे आगामी मंत्रिमंडळ विस्तारात कुणाला संधी मिळेल? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार आज संध्याकाळी अचानक दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळे चर्चांना उधाण आलंय.

काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या नाराजीच्या चर्चा समोर आल्या होत्या. त्यावेळी अजित पवार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीलादेखील उपस्थित राहीले नव्हते. अजित पवार यांच्या पक्षाकडून ते आजारी असल्याचं सांगितलं गेलं होतं. त्याचदिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी दिल्लीला गेले होते. यावेळी अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत पालकमंत्र्यांबाबतचा निर्णय झाला होता. अजित पवार यांच्यासाठी पुण्याचं पालकमंत्रीपद देण्याचं या बैठकीत ठरलं होतं. त्यावेळी अजित पवार दिल्लीला न गेल्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा समोर आली होती.

अजित पवार दिल्लीला का गेले?

यावेळी अजित पवार हे एकटेच दिल्लीला रवाना झाले आहेत. तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस मुंबईत आहेत. अजित पवार अचानक दिल्लीच्या दौऱ्यावर का गेले? अशा चर्चांना आता उधाण आलंय. पण अजित पवार यांच्या दिल्लीला रवाना होण्यामागचं खरं कारणही समोर आलं आहे. अजित पवार हे राज्याचे अर्थ विभागाचे देखील मंत्री आहेत. दिल्लीला अर्थ विभागाची एक बैठक आयोजित करण्यात आलीय. या बैठकीसाठी अजित पवार दिल्लीला रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

दरम्यान, अजित पवार आज एका महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. महाराष्ट्रातील 511 ग्रामपंचायतींमध्ये कौशल्य विकास केंद्रांचं आज उद्घाटन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार देखील उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर अजित पवार दिल्लीच्या दिशेला रवाना झाले.  अजित पवार यांच्या दिल्ली दौऱ्याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. या दौऱ्यातून अजित पवार केंद्राकडून महाराष्ट्रासाठी काही भरीव रक्कमचा निधी आणतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us