
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, मनसे आणि शिवसेनेचे ठाकरे-शिंदे गट सध्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांगलेच कामाला लागले आहेत. आगामी काळात येणाऱ्या स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या निवडणुकिचा फायदा हा आगामी विधानसभा निवडणुकीत होणार आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष कंबर कसून तयारीला लागला आहे. या दरम्यान अनेक वेगवेगळ्या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु आहेत. शिवसेनेला पडलेलं खिंडार, राष्ट्रवादी पक्षात विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नाराजीच्या असलेल्या बातम्या, काँग्रेसची भारत जोडो यात्रा या सगळ्या घटना एकीकडे घडत असताना राज्य निवडणूक आयोगाकडून मोठी घोषणा करण्यात आलीय. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील तब्बल 7 हजार 751 ग्रामपंचायतींचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलाय.
राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील विविध जिल्ह्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या निवडणुकांसाठी 18 डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आलीय. या निवडणुकीचा निकाल हा दोन दिवसांनी म्हणजे 20 डिसेंबरला समोर येईल. कारण 20 डिसेंबरला मतमोजणी होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिलीय.
निवडणुकीचा कार्यक्रम असा असेल :
ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या; तसेच नव्याने स्थापित या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी 18 नोव्हेंबर 2022 रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील.
नामनिर्देशनपत्र 28 नोव्हेंबर 2022 ते 2 डिसेंबर 2022 या कालावधीत दाखल करण्यात येतील.
नामनिर्देशनपत्रांची छाननी 5 डिसेंबर 2022 रोजी होईल.
नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 7 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल.
मतदान 18 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल.
नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल.
मतमोजणी 20 डिसेंबर 2022 रोजी होईल.
विविध जिल्ह्यांत निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हा व तालुकानिहाय संख्या:
अहमदनगर- 203, अकोला- 266, अमरावती- 257, औरंगाबाद- 219, बीड- 704, भंडारा- 363, बुलडाणा- 279, चंद्रपूर- 59, धुळे- 128, गडचिरोली- 27, गोंदिया- 348, हिंगोली- 62, जळगाव- 140, जालना- 266, कोल्हापूर- 475, लातूर- 351, नागपूर- 237, नंदुरबार- 123, उस्मानाबाद- 166, पालघर- 63, परभणी- 128, पुणे- 221, रायगड- 240, रत्नागिरी- 222, सांगली- 452, सातारा- 319, सिंधुदुर्ग- 325, सोलापूर- 189, ठाणे- 42, वर्धा- 113, वाशीम- 287, यवतमाळ- 100, नांदेड- 181 व नाशिक- 196. एकूण- 7,751.