सर्वात मोठी बातमी ! अखेर शेतकऱ्यांचा लाँग मार्च स्थगित, शेतकरी नेते जीवा पांडू गावित यांची आंदोलन मागे घेतल्याची घोषणा

| Updated on: Mar 18, 2023 | 11:29 AM

अखेर शेतकऱ्यांचं आंदोलन स्थगित झालं आहे. शेतकरी नेते जीवा पांडू गावित यांनी तशी घोषणा केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मागण्या मान्य झाल्याच्या सरकारच्या निवदेनाची प्रत दिली. त्यामुळे आम्ही आंदोलन स्थगित करत आहोत, असं गावित यांनी जाहीर केलं.

सर्वात मोठी बातमी ! अखेर शेतकऱ्यांचा लाँग मार्च स्थगित, शेतकरी नेते जीवा पांडू गावित यांची आंदोलन मागे घेतल्याची घोषणा
jiva pandu gavit
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेलं शेतकऱ्यांचं आंदोलन अखेर स्थगित झालं आहे. शेतकऱ्यांचे नेते जीवा पांडू गावीत यांनी ही घोषणा केली. राज्य सरकारने आमच्या 70 टक्के मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे आम्ही आमचा लाँग मार्च मागे घेत आहोत, असं जीवा पांडू गावित यांनी स्पष्ट केलं. जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला मागण्या मान्य झाल्याच्या सरकारच्या निवदेनाची प्रत दिली. त्यामुळे आम्ही आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे, असं सांगतानाच गावित यांनी पोलीस, जिल्हाधिकारी आणि राज्य सरकारचे आभार मानले.

शेतकरी नेते, माजी आमदार जीवा पांडू गावित यांनी मीडियाशी संवाद साधला. काही मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. काही मागण्या एक महिन्याने अंमलात येणार आहेत. तर काही मागण्या या केंद्राशी संबंधित असल्याने त्या केंद्राकडे पाठवण्यात येणार आहेत. या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या 70 टक्के मागण्या मान्य झाल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी तसे निवेदन आम्हाला दिले आहे. त्यामुळे आम्ही आंदोलकांना विश्वासात घेतलं. त्यानुसार आता आम्ही आंदोलन मागे घेत असल्याचं शेतकरी नेते जीवा पांडू गावित यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

गावागावात तो व्हिडीओ लावणार

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेलं निवेदन हे समाधानकारक आहे. मुख्यमंत्र्यांनीही विधानसभेतही निवेदन दिलं आहे. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ गावागावात दाखवला पाहिजे असं मोर्चेकऱ्यांचं म्हणणं आहे. मोर्चेकरी समाधानी आहे. काही उरलेल्या मागण्या लवकरच पूर्ण होणार आहे. त्यामुळे आम्ही हे आंदोलन स्थगित करत आहोत, अशी घोषणा त्यांनी केली.

पोलिसांचे विशेष आभार

जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकारी यांनी या आंदोलनाकडे जातीने लक्ष दिलं आहे. त्यामुळे आम्ही त्यांचे आभार मानतो. पोलीस अधिकाऱ्याने रात्री पाऊस असूनही रात्रभर जागे राहिले. एक महिला पाण्यात पडली. तिला ते दवाखान्यात घेऊन गेले. तिच्यावर उपचार केले. तसेच कोणताही अपघात होऊ नये म्हणून त्यांनी प्रचंड मदत केली. त्यामुळे या पोलीस अधिकाऱ्यांचेही आम्ही आभार मानतो, असंही ते म्हणाले.

काही घटना वेदनादायी

या आंदोलनात अनेक घटना घडल्या. एकाचा हात फ्रॅक्चर झाला. त्याच्यावर नाशिकमध्ये उपचार सुरू आहे. एक महिला वाशिंदमध्ये पाऊस आल्याने डकमध्ये पडली. तिच्यावर पोलीस हवालदार नाईक यांनी उपचार केले. तर एका महिलेला नाशिकमध्ये डिहायड्रेशनचा त्रास सुरू झाला होता. तिच्यावर उपचार करण्यात आले. उपचारानंतर ती परत आंदोलनात आली. एका व्यक्तीची तब्येत बिघडल्याने त्याला दवाखान्यात नेले. त्याला अटॅक आला होता. डॉक्टरांनी त्याला सांगितलं तुला सौम्य हृदयविकाराचा झटका आला. आंदोलनात जाऊ नको. तरीही तो आला. संध्याकाळी पुन्हा त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याचं निधन झालं. जनतेसाठी त्यांनी प्राण दिले, असंही त्यांनी सांगितलं.