सर्वात मोठी बातमी | मनोज जरागेंनी अर्धी लढाई जिंकली, सरकार ‘या’ तारखेला घेणार एकदिवसीय अधिवेशन

राज्यात आज ठिकठिकाणी मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर बंद पुकारण्यात आले होते. मराठा आंदोलकांचं आंदोलन आणखी चिघळण्याआधीच सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मराठा आरक्षणाच्या मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी राज्य सरकारने एक दिवसीय अधिवेशनाची तारीख निश्चित केली आहे.

सर्वात मोठी बातमी | मनोज जरागेंनी अर्धी लढाई जिंकली, सरकार या तारखेला घेणार एकदिवसीय अधिवेशन
CM EKNATH SHINDE AND MANOJ JARANGE PATIL
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Feb 14, 2024 | 7:51 PM

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागण्या मान्य केल्यावर कायदा करत त्याला मान्यता न दिल्याने मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस अजून त्यांची प्रकृती ढासळत चालली आहे. अशातच मोठी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने मराठा समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलावलं आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांनी अर्धी लढाई जिंकली आहे.

मराठा समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी मंगळवार 20 फेब्रुवारी रोजी विधिमंडळाचे एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्यास आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

10 फेब्रुवारीला उपोषणाला बसताना काय म्हणालेले?

मागासवर्ग आयोगाने अहवाल दिला असून तो स्वीकारुन तुम्ही त्याचे कायद्यात रुपांतर करा. यासाठी विशेष अधिवेशन बोलवा. सरकारने दोन दिवसात तातडीने अधिवेशन बोलवावं. आम्ही सांगितलं, त्याप्रमाणे सग्या-सोयऱ्यांची व्याख्या करावी. मागण्या मान्य होत नाही तो पर्यंत आमरण उपोषण सुरु ठेवणार आणि उपचार, अन्नपाणी काही घेणारच नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले होते.

दरम्यान, मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. मनोज जरांगे यांच्या नाकातून रक्त आलं होतं. त्यासोबतच त्यांचं पोटंही दुखू लागलं होतं. धाराशिव, परळी, हिंगोली, नगर,बारामती, लातूर, आळंदी आणि बीड, मनमाडसह राज्यात ठिकठिकाणी मराठा आंदोलकांनी कडकडीत बंद ठेवत सरकारलाच अल्टिमेटम दिले होते. लवकरात लवकर निर्णय नाही घेतला तर आणखी तीव्रपणे आंदोलन करू असा इशारा दिला होता.