वांद्रे येथील रंगशारदा हॉटेलवर ईडीची धडक कारवाई, तब्बल 500 कोटींची मालमत्ता जप्त
वांद्रे येथे असणाऱ्या रंगशारदा हॉटेलवर ईडीने मोठी कारवाई करत प्रभुदास लोटिया यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. एवढंच नाहीतर, या धडक कापवाईत ईडीने तब्बल 500 कोटी रुपयांचा मालमत्ता देखील जप्त केली आहे.

वांद्रे परिसरात असणाऱ्या प्रसिद्ध रंगशारदा हॉटेलवर ईडीने धडक कारवाई केले आहे. कारवाई दरम्यान रंगशारदा हॉटेलची 332 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केल्याची माहिती ईडीने दिली आहे. रंगशारदा हॉटेल्स प्रकरणात प्रभुदास लोटिया यांच्यावर ही फसवणूक केल्याचा आरोप आहे. ईडीने रंगशारदा प्रकरणातील कथित मनी लॉन्डरिंग तपासात कारवाई करत मालमत्ता जप्त केली. म्हाडाने सांस्कृतिक उपक्रमांसाठी सवलतीच्या दरात दिलेल्या जमिनीचा व्यावसायिक वापर झाल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. .
ईडीच्या (ED) म्हणण्यानुसार, मराठी नाट्य, साहित्य आणि सांस्कृतिक उपक्रमांना चालना देण्याच्या उद्देशाने म्हडाने हा भूखंड ‘रंगशारदा प्रतिष्ठान ट्रस्ट’ला सवलतीच्या दरात वितरित केला होता. संबंधित व्यक्तींनी या जमिनीचा वापर व्यावसायिक कारणांसाठी करून भूखंड वाटपाच्या अटींचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे.
तपासादरम्यान ईडीला असं देखील आढळून आलं आहे की, ‘रंगशारदा हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड’ने नियमानुसार नाट्यगृह आणि कलाकारांच्या निवासाची जागा ट्रस्टकडे हस्तांतरित केली नाही. त्याऐवजी, त्याच जागेवर आवश्यक कायदेशीर मंजुरीशिवाय हॉटेल, लॉज, रेस्टॉरंट, बार, बँक्वेट हॉल आणि इतर व्यावसायिक आस्थापने चालवली गेली.
ईडीच्या म्हणण्यानुसार, प्रभुदास वीरचंद लोटीया यांनी ‘ट्रस्ट’च्या जमिनीवर उभारलेल्या व्यावसायिक जागांची अनधिकृतपणे विक्री केली आणि त्यातून मिळालेल्या रकमेचा वापर प्रभादेवी येथे दुसरी मालमत्ता खरेदी करण्यासाठी केल्याचा आरोप आहे. ईडीने केलेल्या दाव्यानुसार, आतापर्यंतच्या तपासात निष्पन्न झालेली प्रोसीड्स ऑफ क्राईम अंदाजे 512 कोटी रुपये इतकी आहे. यापूर्वी, ईडीने अनिल अंबानी समूहाविरुद्धही कारवाई केली होती आणि 3 हजार 84 कोटी रुपये मूल्याच्या 40 हून अधिक मालमत्ता जप्त केल्या होत्या. आता या प्रकरणी पुढे काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
