“मुंबई महाराष्ट्राचीच, कुणाच्या बापाची नाही”; सर्वपक्षांनी कर्नाटकला ठणकावलं…

मुंबईत ज्या प्रमाणे सगळा देश गुण्यागोविंदाने नांदतो तसा प्रकार सीमाभागात मराठी भाषिकांबरबरोबर होता का. त्यामुळे बेळगाव सीमाभाग आधी केंद्रशासित करण्याची मागणी संजय राऊत यांनी केले.

मुंबई महाराष्ट्राचीच, कुणाच्या बापाची नाही; सर्वपक्षांनी कर्नाटकला ठणकावलं...
महादेव कांबळे | Updated on: Dec 28, 2022 | 7:41 PM

मुंबईः कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील काही गावांवर दावा केल्यानंतर सीमावाद पेटला आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या हिवाळी अधिवेशना अगोदरपासून सीमावाद विरोधकांचा महत्वाच्या मुद्यांवर राहिला आहे. हिवाळी अधिवेशनात सीमावादावर वादंग माजल असतानाच कर्नाटकचे मंत्री एन. अश्वथ्य नारायण आणि मधुस्वामी यांनी मुंबईला केंद्रशासित करण्याची मागणी त्यांनी केली.

त्यावर मात्र आता विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनी कर्नाटकच्या भूमिकेवर जोरदार आवाज उठवत सर्वपक्षांनी कर्नाटकच्या वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांचा निषेध केला आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार, ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत, चंद्रकांत खैरे यांनी महाराष्ट्राबाहेरील व्यक्तींनी जर मुंबईवर हक्क सांगितला तर तो खपवून घेतला जाणार नाही.

आणि तो त्यांचा अधिकारही नाही अशा शब्दात कर्नाटकच्या मंत्र्यांना राज्यातील सर्वपक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी सुनावले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे तक्रार करत मुंबईवर दावा सांगणं हे खपवून घेतलं जाणार नाही.

अशा बोलघेवड्या मंत्र्यांना आवार घालावा अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यामुळे मुंबई ही महाराष्ट्राचीच आहे, कुणाच्या बापाची नाही असा सज्जड दमही त्यांनी कर्नाटकच्या मंत्र्यांना भरला आहे.

राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी ज्या प्रमाणे कर्नाटकच्या मंत्र्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे नाव घेऊन तंबी दिली आहे. त्याप्रमाणेच आक्रमकपणे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही कर्नाटकच्या मंत्र्यांना दम भरला आहे.

मुंबई आमच्या हक्काची आहे, त्यामुळे मुंबईबद्दल कोणीही बोलू नये अशा शब्दात त्यांना सुनावण्यात आले आहे. मुंबई ही महाराष्ट्राचीच आहे, त्यामुळे मुंबईबाहेरील मंत्र्यांनी मुंबईविषयी बोलू नये असंही त्यांनी यावेळी सांगितले.

तर खासदार संजय राऊत यांनी ज्या प्रमाणे कर्नाटकामध्ये मराठी बांधवांवर कर्नाटककडून ज्या प्रमाणे अन्याय, अत्याचार केले जातात. त्याप्रमाणे मुंबईमध्ये कन्नड भाषिकांवर केले जात नाहीत.

त्यामुळे आधी बेळगाव केंद्रशासित करा अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. मुंबईमध्ये सारा देश सामावलेला आहे. मुंबईमध्ये सर्व लोकं गुण्यागोविंदाने राहतात.

तशी गुण्यागोविंदानं सीमाभागातील मराठी बांधवांबरोबर कर्नाटक राहते का. आणि गेल्या 75 वर्षापासून सीमाभागातील मराठी भाषिकांवर अन्याय केला जात आहे.

त्यामुळे मुंबईआधी बेळगाव सीमाभाग केंद्रशासित करा अशी मागणी त्यांनी केली आहे. तर माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मुंबई राज्य असल्यापासून बेळगाव, म्हैसूर हा प्रदेश कसा मराठी भाषिक होता ते त्यांनी पटवून दिले आहे. तसेच कर्नाटकातील मंत्री ज्या प्रमाणे मागणी करत आहेत. ती चुकीची आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us