महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाची तुफान बॅटिंग, उकाड्याने त्रस्त झालेले मुंबईकर सुखावले, बळीराजा हवालदिल

महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाने भयानक रूप धारण केले आहे. मुंबई-सोलापुरात उकाड्यापासून दिलासा मिळाला असला, तरी काही जिल्ह्यांमध्ये वादळामुळे होत्याचे नव्हते झाले आहे.

महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाची तुफान बॅटिंग, उकाड्याने त्रस्त झालेले मुंबईकर सुखावले, बळीराजा हवालदिल
mumbai rain
| Updated on: May 24, 2026 | 9:58 AM

Maharashtra Pre Monsoon Rain Updates : गेल्या काही दिवसांपासून असह्य उकाड्याने हैराण झालेल्या राज्यातील नागरिकांना अखेर दिलासा मिळाला आहे. मुंबई, कोकण, सोलापूरसह राज्याच्या विविध भागांत मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. अरबी समुद्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पुढील ३ दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचे संकेत आहेत. मात्र या पावसासोबत आलेल्या तीव्र वादळी वाऱ्यामुळे उत्तर पुणे, बीड आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतीचे आणि मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.

मुंबईकर सुखावले

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. त्यातच आता काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळताना दिसत आहे. मुंबईतील दादर, मुलुंड, बांद्रा आणि सांताक्रुज परिसरात रिमझिम पावसाने हजेरी लावली. तसेच मीरा-भाईंदर शहरातही सकाळी अचानक अवकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. त्यामुळे तापमानात मोठी घट झाली आहे. तसेच गेल्या काही दिवसांच्या प्रचंड उकाड्यापासून नागरिकांना तात्काळ आराम मिळाला आहे.

रत्नागिरीत पावसाची जोरदार बॅटिंग; आंबा पिकाला फटका

रत्नागिरी जिल्ह्यात सकाळपासूनच मान्सूनपूर्व पावसाचा वेग वाढला आहे. राजापूर, लांजा, संगमेश्वर या भागात दमदार सरी बरसल्या. लांजा तालुक्यातील सापुचेतळे आणि खानवली भागात ढगांच्या गडगडाटासह पावसाने जोरदार बॅटिंग केली. यामुळे ग्रामीण भागात शेतीकामांना वेग मिळणार आहे. मात्र ऐन मे महिन्यातील या पावसामुळे अंतिम टप्प्यात असलेल्या हापूस आंबा पिकाला मोठा फटका बसला आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवस कोकणात अशाच पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

सोलापुरात तुफान पाऊस; पुणे प्रशासनाला जाग

गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असलेल्या सोलापूर शहरात आणि परिसरात अचानक मुसळधार पावसाचे आगमन झाले. हवामान विभागाच्या अंदाजानुसार झालेल्या या जोरदार पावसामुळे कामानिमित्त बाहेर पडलेल्या सोलापूरकरांची धावपळ उडाली. पण उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला.

तर पुण्याच्या भोरमध्ये काल झालेल्या मुसळधार मान्सूनपूर्व पावसामुळे नीरा नदीवरील राणी लक्ष्मीबाई पुलावर गुडघाभर पाणी साचले होते. पाण्याचा निचरा होणारी छिद्रे मातीने बुजल्यामुळे पुलाला ओढ्याचे स्वरूप आले होते. यानंतर आज प्रशासनाला जाग आली असून, संबंधित ठेकेदाराकडून पुलावरील माती हटवून पाण्याचा निचरा करण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगरात वीज पडून बैलजोडी दगावली, कांदा उत्पादक संकटात

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्याला मान्सूनपूर्व पाऊस आणि जोरदार वादळाचा भीषण तडाखा बसला आहे. शिल्लेगाव, शिरेसायगाव, गोपालवाडी, वजनापूर आणि देवळीसह अनेक गावांमध्ये वादळामुळे घरांवरील पत्रे उडून गेले आहेत. तर सोलर पॅनल आणि शेतातील आखाडे जमीनदोस्त झाले. तर देवळी गावात वीज पडल्याने परसराम तायडे यांची ७५ हजार रुपयांची बैलजोडी जागीच दगावली. तर अनेक जनावरे जखमी झाली आहेत. महावितरणचे वीज खांब कोसळल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच शेतकऱ्यांनी काढून ठेवलेला कांदा पाण्यात भिजल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

बीड जिल्ह्यात घरांची पडझड आणि पिकांचे नुकसान

बीड, केज आणि पाटोदा तालुक्याला सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपून काढले. केज तालुक्यातील युसुफ वडगाव, सादोळा, भालगाव परिसरात अनेक घरांचे पत्रे उडाले. तसेच मोठमोठे वृक्ष उन्मळून पडले. विजेच्या तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. या वादळामुळे शेतकऱ्यांच्या आंबा बागा आणि कांदा पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यासोबत रात्री पुन्हा पाऊस झाल्यास नुकसान वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान अचानक आलेल्या या पावसामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. यामुळे प्रशासनाने तातडीने बाधित क्षेत्राचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी छत्रपती संभाजीनगर, बीड आणि पुण्यातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

Follow Us