मुंबईत मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू, शिवसेना आक्रमक, उपमहापौर संजय घाडी यांच्याकडून थेट आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी
मुंबईमध्ये कालपासून जोरदार पाऊस सुरू आहे, याचदरम्यान एक मोठी दुर्घटना घडली आहे. ती म्हणजे मुंबईतील साकीनाका परिसरात एका उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

मुंबईमध्ये कालपासून जोरदार पाऊस सुरू आहे, याचदरम्यान एक मोठी दुर्घटना घडली आहे. ती म्हणजे मुंबईतील साकीनाका परिसरात एका उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. अस्लम शेख असं या 55 वर्षीय व्यक्तीचं नाव असून, त्यांचा 25 फूट खोल उघड्या मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दरम्यान या घटनेनंतर आता याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहे. या दुर्घटनेनंतर वातावरण चांगलंच तापलं आहे. उपमाहापौर संजय घाडी यांनी या प्रकरणात आता थेट महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
नेमकं काय म्हणाले घाडी?
या घटनेसाठी मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे जबाबदार असल्याचा आरोप मुंबईचे उपमहापौर संजय घाडी यांनी केला आहे. ”चार-पाच दिवसांपूर्वी मी आयुक्त मॅडमना पत्र दिलं होतं. प्रेसला सुद्धा दिलं होतं. पण तुम्ही प्रसिद्ध केलं नाही. पुराव्यासकट मी सांगितलेलं, वॉर्ड स्तरावर मॅन होल्ससाठी काढलेले कॉन्ट्रॅक्ट आहेत, त्याची मुदत संपलेली आहे. संरक्षित जाळ्या लावल्या गेलेल्या नाहीत. आपण त्याची चौकशी करुन आदेश द्यावेत अशी मी मागणी केली होती” असं संजय घाडी यांनी म्हटलं आहे, तसेच त्यांनी या प्रकरणात थेट आयुक्त अश्विनी भिडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
अश्विनी भिडे यांची प्रतिक्रिया
दरम्यान या घटनेनंतर महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे. या दुर्घटनेबद्दल मनापासून खेद व्यक्त करून, कुटुंबीयाप्रती सहवेदना व्यक्त करते.मॅनहोल्सबाबतीत जी नियमावली आहे त्याचे काटेकोर पालन करण्याचा पालिका प्रयत्न करते. मुंबईत एक लाखाहून अधिक मॅनहोल्स आहेत. या सगळ्या मॅनहोल्सवर सुरक्षेच्या कारणास्तव जाळी बसवलेली आहे. जवळपास 96 हजार मॅनहोल्सवर जाळी बसवलेली आहे. ४ हजार मॅनहोल्सच्या जाळ्या कामासाठी काढण्यात आल्या आहेत. एल वार्डमध्ये ७५ मॅनहोल्सला जाळ्या आहेत, त्यातल्या ४ मॅनहोल्सच्या जाळ्या कामासाठी काढण्यात आल्या होत्या. त्यापैकी एका मॅनहोल्समध्ये आज ही व्यक्ती पडून दुर्घटना घडली आहे. मॅनहोल्सवरची जाळी काढल्यावर तिथे बॅरिगेटिंग करणे, माणूस ठेवून सूचना देणे अशी खबरदारी घ्यावी लागते, इथे दोन माणसे होती पण बाकी खबरदारी घेण्यात आली नव्हती असं अश्विनी भिडे यांनी म्हटलं आहे.