आतापर्यंत आवाज पाहिला, आता शांततेची ताकद दाखवू, मनसेचं 22 ऑगस्टला शक्तीप्रदर्शन

| Updated on: Aug 20, 2019 | 1:11 PM

मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मनसेच्या आंदोलनाचं स्वरुप आज पत्रकार परिषदेत सांगितलं. 22 ऑगस्टला राज्यभरातील कार्यकर्ते शांततेत ईडीच्या कार्यालयाबाहेर हजर राहतील, असं नांदगावकरांनी सांगितलं.

आतापर्यंत आवाज पाहिला, आता शांततेची ताकद दाखवू, मनसेचं 22 ऑगस्टला शक्तीप्रदर्शन
Follow us on

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना ईडीने बजावलेल्या समन्सनंतर मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज ठाकरे यांना चौकशीसाठी 22 ऑगस्टला ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याविरोधात मनसेने शांततेच्या आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. मनसेचे राज्यभरातील कार्यकर्ते ईडीच्या कार्यालयाबाहेर हजर राहून शांततेत आंदोलन करणार आहेत.

मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी मनसेच्या आंदोलनाचं स्वरुप आज पत्रकार परिषदेत सांगितलं. 22 ऑगस्टला राज्यभरातील कार्यकर्ते शांततेत ईडीच्या कार्यालयाबाहेर हजर राहतील, असं नांदगावकरांनी सांगितलं.

राज ठाकरेंना ईडीने 22 तारखेला साडे अकाराच्या सुमारास बोलावलं आहे, त्या दिवशी मनसेचे कार्यकर्ते शांततेत ईडी कार्यालयाबाहेर जमा होतील – बाळा नांदगावकर

बाळा नांदगावकर यांनी मनसेच्या पदाधिकारी बैठकीत आंदोलनाबाबतच्या सूचना सर्वांना दिल्या.  “लोकांनी आतापर्यंत आपल्या आवाजाची ताकद बघितली, आता आपल्या शांततेची ताकद दाखवून द्या. 22 तारखेला सर्वांनी ईडी कार्यालयाजवळ इथे उपस्थित राहा. पण शांततेत सर्व झालं पाहिजे”, असं नांदगावकर म्हणाले.

सरकारने शांत डोक्याने नोटीस पाठवली, आम्हालाही शांत डोक्यानेच सामना करावा लागेल – बाळा नांदगावकर

सत्ताधारी बदनाम करतील

महाराष्ट्रातील किंवा बाहेरील नागरिकांना ईडी कार्यालयाकडे यायचे असेल तर त्यांनीही शांतपणे यायचे आहे. सत्ताधारी पक्षातील कोणी तरी गर्दीत घुसून बदनाम करण्याचं काम करतील, अशी शंका नांदगावकरांनी उपस्थित केली.

मनसेच्या आंदोलनाचा कोणालाही त्रास होणार नाही, कामगार, व्यापारी किंवा कोणालाही त्रास न देता सर्व काही शांततेत होईल – बाळा नांदगावकर

 सर्वांचे फोन

राज ठाकरे यांना ईडी ची नोटीस आल्यानंतर देशातील वातावरण तापू लागलं. राज ठाकरे यांनी ईव्हीएमबाबत घेतलेल्या भूमिकेनंतर लोकांमध्ये प्रेम वाढले. ईडीची नोटीस आल्यापासून सगळ्या लोकांचे फोन येत आहेत, असं नांदगावकर म्हणाले.

प्रकाश आंबेडकर यांचा दहा दिवसापूर्वी कॉल आला होता, त्यांनी सांगितलं होतं नोटीसवर सही झाली आहे – बाळा नांदगावकर

सर्वांनी या

22 तारखेला कोणताही गोंधळ गडबड न करता ईडी कार्यालयात यायचं आहे. केवळ मनसे कार्यकर्ते नाही तर इतरही लोक येऊ शकतात. म्हणून मुद्दाम आमच्या पक्षाला गालबोट लावण्यासाठी किंवा जाणूनबुजून आमच्या पक्षला बदनाम करण्यासाठी कोणीही काहीही करू शकतात, अशी शंका त्यांनी व्यक्त केली.

मनसे कार्यकर्ते शांततेत ईडी कार्यालयात जाणार, आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना कंट्रोल करु, पक्षाची भूमिका कार्यकर्त्यांना मान्य असेलच, पोलिसांनीही सहकार्य करावं, अततायीपणा करु नये – बाळा नांदगावकर

पक्षादेश पाळा

पक्षाने निर्णय घेतला तर आमचे कार्यकर्ते तो पाळतात. 22 तारखेला मनसे कार्यकर्त्यांनी शांत राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. कायदा सुव्यवस्था पाळण्याचे आवाहन आहे. 22 तारखेला ईडी कार्यालयात येताना गोंधळ घालू नये, सामान्य लोकांना यायचं असेल तर येऊ शकतात. मात्र शांतता राखावी. सत्ताधारी पक्षातील कोणीही गोंधळ घालण्याचा प्रयत्न करू शकतो, म्हणून शांत राहण्याचं आवाहन आहे, असं नांदगावकर म्हणाले.

राज्यभरातील कार्यकर्ते मुंबईत येतील, आम्हाला पूर्ण कल्पना आहे की कार्यकर्ते पक्षाच्या आदेशाच्या बाहेर जाणार नाहीत – बाळा नांदगावकर