राज ठाकरे यांनी सौम्य, पण स्पष्ट शब्दांत मोदी सरकारचे कान टोचले, पाहा नेमकं काय म्हणाले

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मणिपूर हिंसाचारावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना खडेबोल सुनावलं आहे. राज ठाकरे यांनी केंद्र सरकारला मणिपूरमधील हिंसाचारावर लवकरात लवकर मार्ग काढण्याचं आवाहन केलं आहे.

राज ठाकरे यांनी सौम्य, पण स्पष्ट शब्दांत मोदी सरकारचे कान टोचले, पाहा नेमकं काय म्हणाले
Chetan Patil | Updated on: Jul 01, 2023 | 8:14 PM

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मणिपूरमध्ये सुरु असलेल्या हिंसाचारावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मणिपूरच्या हिंसाचाराच्या घटनेवर देशभरातून चिंता व्यक्त केली जात आहे. काही जणांकडून या हिसाचाराच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत. राज ठाकरे यांनी देखील मणिपूरच्या हिंसाचाराच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवर चिंता व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना या प्रकरणात गांभीर्याने लक्ष देण्याचं आवाहन करत कान टोचले आहेत. भाजपचे दिवंगत नेते अटल बिहारी वाजपेयी यांनी ईशान्य भारतातील राज्यांसाठी जे प्रयत्न केले ते आता वाया जातील, अशी भीती राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

“ईशान्य भारतातील मणिपूर हे राज्य शब्दश: असंतोषणाने धुमसतंय. केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या एका मंत्र्याच्या घरावरच लोकांनी संतापाने हल्ला चढवला, इथपर्यंत परिस्थिती रसातळाला गेली आहे. हे सगळं गेले २ महिने सुरु आहे आणि तरीही परिस्थिती आटोक्यात आणण्यात केंद्र सरकारला अपयश का येतंय? हे कळत नाही”, असं राज ठाकरे म्हणाले.

‘…त्यानंतर तरी ठोस कृती होईल असं वाटलं होतं’

“पंतप्रधान नरेंद्र मोदी ईशान्य भारताकडे काँग्रेसने साफ दुर्लक्ष केलं म्हणून दूषणं द्यायचे पण आज त्यांच्याच कार्यकाळात ईशान्य भारतातील एक राज्य धुमसत असताना पंतप्रधानांनी मौन बाळगलं आहे. हे माझ्यासाठी अनाकलनीय आहे. मध्यंतरी देशाचे गृहमंत्री अमित शाह हे चार दिवस मणिपूरमध्ये जाऊन राहिले होते. तरीही परिस्थिती आटोक्यात का आली नाही? ह्या विषयावर काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने चिंता व्यक्त केली होती. किमान त्यानंतर तरी पंतप्रधानांकडून ठोस कृती होईल असं वाटलं होतं”, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली.

‘अटलजींचे प्रयत्न वाया जातील, अशी भीती’

“मणिपूरचं सध्याचं नेतृत्व जर परिस्थिती हाताळायला निष्प्रभ ठरत असेल तर योग्य निर्णय भारतीय जनता पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाने घ्यावा. ईशान्येकडील राज्यांना प्रवाहात आणण्यासाठी अटलजींनी खूप प्रयत्न केले होते. पण सध्या मणिपूरकडे ज्या पद्धतीने दुर्लक्ष होत आहे ते पाहून, हे सगळे प्रयत्न वाया जातील, अशी भीती वाटते”, असं राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.

‘…तर त्याला सरकार जबाबदार असेल’

“वेळीच मणिपूर शांत करुन तिथल्या दुखावलेल्या लोकांच्या मनांवर फुकंर नाही घातली तर मणिपूरच नाही तर ईशान्य भारतात, देशापासून विभक्त होण्याचा विचार जोर पकडेल आणि त्याला सरकार जबाबदार असेल. माझी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना विनंती आहे की, ठोस पावलं उचला. मणिपूर पूर्ववत होईल हे पाहा”, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us